नागपूर: राज्याताल शेतकऱ्यांसाठीच्या पीक विमा योजनेत मोठे घोटाळे झाल्याचा आरोप विधानसभेत झाल्यानंतर या प्रकरणी विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या समितीकडून सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी विधानसभेत केली.
या घोटाळ्यांमध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे फडणवीस म्हणाले. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील पीक विमा घोटाळ्याचे प्रकरण विधानसभेत उचलले. या घोटाळ्याचा पर्दाफाश करताना त्यांनी अनेक उदाहरणे दिली आणि विमा कंपन्यांनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केले असे ते म्हणाले. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना धस यांनी उचललेल्या घोटाळ्यावर फडणवीस यांनी सांगितले की, आधी बीडमध्ये ही योजना इतकी चांगली चालविली गेली की त्यातून बीड पॅटर्न तयार झाला; मात्र आता धस यांनी दिलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. केवळ बीडच नाही तर राज्याच्या इतर भागातही असे घोटाळे झाले आहेत का, याची माहिती घेऊन चौकशी केली जाईल.
सुरेश धस यांनी दिली धक्कादायक माहिती
भाजप आमदार सुरेश धस म्हणाले की, एक रुपयात पीक विम्याचा फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही.
भलतेच लोक मलई खात आहेत. हे राज्यभरात घडत आहे. याचे पुरावे आपल्याकडे आहेत, असे म्हणत त्यांनी ते सादरही केले.
या घोटाळ्यात एक रॅकेट सक्रिय आहे, पीक विमा माफिया फोफावले आहेत. २०२३-२४ या काळातील कृषी मंत्र्यांचीही पीक विम्यासंदर्भातील भूमिका संशयास्पद होती, असा आरोपही त्यांनी केला.