योगेश पांडेनागपूर : आदिवासी भागांमध्ये धर्मांतरणाचा मुद्दा गंभीर आहे. संस्कृतीचे मूळ आदिवासी समाजातच असून त्यांनी देशाची परंपरा जपली आहे. मनापासून जर कुणी पुजेची पद्धती बदलत असेल तर त्याला कुणीच आक्षेप घेण्याचा प्रश्न नाही. मात्र विविध आमिषे दाखवून व जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच आहे. धर्मांतरण ही हिंसाच आहे. जर अशा पद्धतीने धर्मांतरण झालेला व्यक्ती घरवापसी करत असेल तर त्याचा स्वीकार करायला हवा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयच्या समारोपप्रसंगी गुरुवारी ते बोलत होते.
रेशीमबाग मैदानावर झालेल्या कार्यक्रमाला कॉंग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री अरविंद नेताम, प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, महानगर संघचालक राजेश लोया, वर्गाचे सर्वाधिकारी समीरकुमार महांती प्रामुख्याने उपस्थित होते. आदिवासी हे आपल्या समाजाचाच हिस्सा आहे. धर्मांतरण व इतर समस्यांसंदर्भात आदिवासी समाजाला सोबत घेऊन आम्ही शक्य ते सहकार्य करू. शासन, प्रशासन सहाय्यक असू शकतात, मात्र संबंधित लोकांनीदेखील कामात सहभागी झाले पाहिजे, असे सरसंघचालक म्हणाले.
सैन्याची क्षमता व सरकारच्या दृढतेचे दर्शनपहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सरकार व सैन्याने आवश्यक ती कारवाई केली. या प्रसंगाने सैन्याची क्षमता व वीरता जगासमोर आली. संरक्षणविषयक विविध संशोधन किती आवश्यक व कामाचे आहेत हे सिद्ध झाले. तसेच केंद्र शासनाची दृढता दिसून आली. महत्त्वाचे म्हणजे सर्व पक्षांच्या नेत्यांनी समजूतदारपणा व परस्पर सहयोगदेखील जगाने पाहिला. संपूर्ण समाजाने आपल्या एकतेचे उदाहरण प्रस्तुत केले. जर अशी भावना चिरंतर राहिली तर सुदृढ लोकशाहीचे दृष्य यातून समोर येईल,असे मत सरसंघचालकांनी व्यक्त केले.
संरक्षणासंदर्भात आत्मनिर्भरतेवरच भर हवापहलगाम हल्ल्यानंतर आपण कारवाई केली म्हणजे समस्या दूर झाली असे नाही. युद्धाचे प्रकार बदलले आहेत. दहशतवादाला खतपाणी घालत त्यामाध्यमातून लढण्यात येत आहे. सायबर वॉरपासून अगदी प्रॉक्सीवॉर सातत्याने सुरू आहे. आता घरी बसून एका क्लिकवर ड्रोन नियंत्रित करून युद्ध केले जाऊ शकते. त्यामुळे आपल्या सुरक्षेच्या बाबतीत आपल्याला आत्मनिर्भर व्हावेच लागेल. यासाठी सेना, शासन, प्रशासनासोबतच समाजानेदेखील एकत्रित यायला हवे,असे आवाहन सरसंघचालकांनी केले.
सरसंघचालकांचे इतर प्रमुख मुद्दे- देशहितासमोर इतर सर्व स्वार्थ गौण असले पाहिजेत- एकमेकांसोबत सद्भावना कायम असली पाहिजे- भावनावेगात वाहून जाऊन वाट्टेल तसे वागणे व त्याच्या प्रतिक्रियेत कायदा हातात घेऊन मनमानी करणे योग्य नाही.- समाजात हिंसा करणे, विनाकारण शिवीगाळ करणे, प्रतिक्रिया देताना काहीही बोलणे हे आपल्याला सोडावे लागेल.- समाज तोडणारे भाषण करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकू नका