सुमेध वाघमारे
नागपूर : गरोदरपणात मधुमेहावर नियंत्रण ठेवणे हे केवळ आईच्या आरोग्यासाठीच नाही, तर बाळाच्या भविष्यातील आरोग्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे. यातून पुढील पिढीमध्ये मधुमेह टाळता येऊ शकतो. त्या दृष्टीने व्यापक जनजागृती व्हायला हवी. सोबतच आदर्श जीवनशैलीचा स्वीकार करून मधुमेहापासून दूर राहता येणे शक्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले.
रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबिटीज इन इंडिया, इंडियन पोडियाट्री असोसिएशन, इंडियन असोसिएशन ऑफ क्लिनिकल एंडोक्राइनोलॉजिस्ट, असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया आणि ऑल इंडिया असोसिएशन फॉर ॲडव्हान्स्ड रिसर्च इन ओबेसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने 'हॅलो डायबिटीज' या बाराव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनील गुप्ता, डॉ. रती मकर, पद्मश्री डॉ. शशांक जोशी, पद्मश्री डॉ. कमलाकर त्रिपाठी, डॉ. ए. के. दास, डॉ. बन्शी साबू, डॉ. विंकी रुघवानी, डॉ. कविता गुप्ता उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. सुनील गुप्ता यांनी केले तर आभार डॉ. कविता गुप्ता यांनी मानले.
अशा जनजागृतीवर परिषदांची गरज
भारतात पसरत असलेला मधुमेह आणि ओबेसिटी ही गंभीर व चिंतेची बाब असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारत ही मधुमेहाची राजधानी होऊ नये यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या अशा जनजागृतीपर परिषदांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया मूव्हमेंट यासारखे विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यातून आरोग्यविषयक जनजागृतीला प्राधान्य दिले जात आहे.
मधुमेहावर जनजागृती हाच प्रथम व प्रभावी उपचारमधुमेह या आजारावर अधिक सखोल संशोधन होणे ही काळाची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या परिषदेच्या माध्यमातून मधुमेह जडण्याची कारणे, उपाय व आदर्श जीवनशैली या विषयांवर जनजागृती होणे गरजेचे आहे. मनुष्याच्या शारीरिक क्षमता क्षीण करणाऱ्या या आजारावर जनजागृती हाच प्रथम व प्रभावी उपचार आहे.
ही परिषद मधुमेहाच्या उपचारासाठी दिशादर्शक ठरेलया परिषदेतील डायबिटीस आजाराविषयीचे देशभरातील तज्ज्ञ व चिकित्सकांचे विचारमंथन उपचारांसाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. मधुमेह रोखण्यासाठी डॉ. सुनील गुप्ता सातत्याने जनजागृती करत असून त्यांनी आतापर्यंत असंख्य कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विविध माध्यमातून ते संशोधन प्रसिद्ध करत आहेत. हे कार्य त्यांनी अविरत सुरू ठेवावे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला.