कामठी : जलसंधारणाचे महत्त्व लक्षात घेत शेतकऱ्यांनी शेतकरी दिनानिमित्त कृषी विभागाच्या मार्गदर्शनात गादा (ता. कामठी) शिवारात श्रमदानातून बंधाऱ्याची निर्मिती केली आहे. या बंधाऱ्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास मदत हाेणार असून, बंधारा व जमिनीतील पाण्याचा फायदा या भागातील शेतकऱ्यांना हाेणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी मंजूषा राऊत यांनी दिली.
शेतकरी दिनानिमित्त गादा येथे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज व गाडगेबाबा यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी मंजूषा राऊत, सरपंच निर्मला शेंडे, कृषी सहायक मीनाक्षी राठोड, सुधाकर जुनघरे, उपसरपंच मधुकर ठाकरे, दिलीप चकोले, घनश्याम चकोले, आनंदराव खुरपडी, वामन जुनघरे, मनोहर भोयर, मनोहर बावणे, वसंतराव ठाकरे, नरेंद्र जुनघरे, देवीदास ठाकरे, अंकुश जुनघरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम आटाेपताच शेतकऱ्यांनी गादा शिवारात श्रमदान करीत बंधाऱ्याची निर्मिती केली.