लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार मोहन मते, कीर्तिकुमार ऊर्फ बंटी भांगडिया, सुधीर मुनगंटीवार व देवराव भोंगळे यांनी स्वतःविरुद्धच्या निवडणूक याचिका फेटाळून लावण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठामध्ये दाखल केलेले अर्ज अर्थहीन व गुणवत्ताहीन आहेत, असा दावा निवडणूक याचिकाकर्त्यांनी केला आहे. याचिकाकर्त्यांनी सोमवारी या अर्जावर प्रत्युत्तर सादर केले.
निवडणूक याचिकाकर्त्यामध्ये पराभूत उमेदवार प्रफुल्ल गुडधे, गिरीश पांडव, सतीश वारजूरकर, संतोषसिंग रावत व सुभाष धोटे यांचा समावेश आहे. दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून जिंकलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध गुडधे, दक्षिण नागपूरमधून जिंकलेले मते यांच्याविरुद्ध पांडव, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरमधून जिंकलेले भांगडिया यांच्याविरुद्ध वारजूरकर, बल्लारपूरमधून विजयी झालेले मुनगंटीवार यांच्याविरुद्ध रावत, तर राजुरा येथून जिंकलेले भोंगळे यांच्याविरुद्ध धोटे यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे. फडणवीस व इतरांनी या निवडणूक याचिकांना दिवाणी प्रक्रिया संहितेतील सातव्या ऑर्डरमधील नियम ११ आणि लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम ८६ (१) अंतर्गत विरोध केला आहे. या निवडणूक याचिका लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम ८१ (१) मधील निकष पूर्ण करीत नाही. त्यामुळे या याचिका सुरुवातीच्या टप्प्यातच फेटाळून लावा, अशी विनंती फडणवीस व इतरांनी न्यायालयाला केली आहे.
याचिका कायद्यानुसारचनिवडणूक याचिकाकर्त्यांनी त्यांच्या याचिका कायद्यानुसारच दाखल केल्या गेल्या आहेत, असे प्रत्युत्तरात नमूद केले आहे. फडणवीस व इतरांनी याचिकांवर घेतलेले आक्षेप निराधार आहेत. याचिकांवर वेगात कार्यवाही होऊ नये, हा त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे ते संबंधित अर्जाद्वारे अडथळा निर्माण करीत आहेत, असा आरोपही याचिकाकर्त्यांनी केला आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. आकाश मून यांनी बाजू मांडली.