लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच खरे विदर्भद्वेष्टे असून त्यांनी विदर्भप्रेमाचे नाटक करू नये, या शब्दांत विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे टीका करण्यात आली आहे. नागपुरात विधिमंडळ सचिवालय कक्ष स्थापन झाल्यानंतर विदर्भ माझ्या हृदयात आहे व या भूमीवर अन्याय होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून विदर्भवाद्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले आहेत.
नागपुरात विधिमंडळ सचिवालय कक्ष दिला. मात्र असे करून फार मोठे उपकार केले असल्याचा आवा मुख्यमंत्र्यांनी आणू नये. जनतेची भलावण करण्याचा प्रयत्न आहे. विदर्भाच्या जनतेला विधिमंडळ कक्ष दिल्यामुळे कोणताही फायदा होणार नाही. हा सचिवालय कक्ष म्हणजे विदर्भाच्या जनतेसमोर महाराष्ट्रवाद्यांनी फेकलेला तुकडा आहे. दोन-चार अधिकारी येथे येऊन विदर्भाचा विकास होणार नाही, असे समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांना विदर्भावर प्रेम असते तर अतिवृष्टीत १० हजार कोटीचे नुकसान झालेले असताना पॅकेजमध्ये विदर्भाला केवळ ७ कोटी व उर्वरित महाराष्ट्राला ९,९९३ कोटी दिले असते का, असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला. कोरोना काळात वीज बिल दिलासा न देता दरवाढ केली. विदर्भाच्या विकास निधीत ६९ टक्के कपात केली. तेव्हा विदर्भहित आठवले नाही का, असा प्रश्नदेखील समितीतर्फे उपस्थित करण्यात आला.