कवाडे यांचा प्रवास अपेक्षा वाढल्या नागपूर : लोकसभा निवडणुकी दरम्यान काँग्रेस हायकमांडने दिलेला आपला शब्द पाळला आणि प्रा. जोगेंद्र कवाडे याची विधान परिषदेचे सदस्य म्हणून नियुक्ती केली. काँग्रेसपासून दुरावलेल्या आंबेडकरी-दलित समाजाला पुन्हा आपल्यासोबत जोडण्याच्या दृष्टीने या नियुक्तीकडे पाहिले जात आहे. आंबेडकरवादी सामाजिक चळवळीमध्ये प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नावाची गौरवपूर्ण नोंद केली जाते. मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यासाठी त्यांनी काढलेला लाँगमार्च हा ऐतिहासिक असून मार्टीन ल्युथर किंगच्या लॉंगमार्चशी त्याची आजही तुलना केली जाते. विद्यार्थी अवस्थेपासूनच रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनमध्ये आणि विद्यार्थी आंदोलनात सक्रिय असलेले प्रा. कवाडे हे ‘मास लीडर’ म्हणून ओळखले जातात. नामांतरासह अनेक सामाजिक आंदोलनात सक्रिय असलेल्या प्रा. कवाडे यांनी अनेकदा तुरुंगवासही भोगला. महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्ष विविध गटात विभागला गेला असला तरी त्यांची राजकीय ताकद आजही महत्त्वाची मानली जाते. प्रा. कवाडे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांचा पक्ष रिपाइंचा प्रमुख गटापैकी एक मानला जातो. लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रा. जोगेंद्र कवाडे आणि बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या मुख्य संयोजिका अॅड. सुलेखा कुंभारे यांनी काँग्रेसला साथ दिली. त्यावेळी काँग्रेस हायकमांडने दोघांनाही काही राजकीय आश्वासन दिले होते. विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती करून ते आश्वासन पाळण्यात आले असे मानले जात आहे. काँग्रेसचा पारंपरिक मतदार असलेला दलित समाज पक्षापासून दुरावल्यानेच काँग्रेसचा अशा मानहानीकारक पद्धतीने पराभव झाल्याचे मानले जाते. तसेच रिपाइंचे ज्येष्ठ नेते रामदास आठवले यांनी आधीच महायुतीची साथ धरली. तसेच ऐन निवडणुकीत रामविलास पासवान यांच्यासारख्या राष्ट्रीय दलित नेत्यानेसुद्धा भाजपाला जवळ केले. इतकेच नव्हे तर काँग्रेसचा सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने प्रकाश गजभिये यांना विधान परिषदेवर घेऊन दलित समाजाला जोडण्याचा प्रयत्न केला. या सर्व बाबी विचारात घेऊन काँग्रेसने प्रा. कवाडे यांना दिलेला शब्द पाळून दलित समाजाला जोडण्याचा प्रयत्न केला आहे. (प्रतिनिधी)खैरलांजीच्या मुद्यावरून राजीनामा प्रा. जोगेंद्र कवाडे हे यापूर्वी चिमूर मतदारसंघातून लोकसभेसाठी निवडून गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून ते विधान परिषदेवरही निवडून गेले होते. परंतु डिसेंबर २००७ मध्ये त्यांच्या सदस्यत्वाची मुदत संपायला काही महिने शिल्लक असताना त्यांनी खैरलांजी हत्याकांडाच्या निषेधार्ह विधान परिषदेच्या सभासदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि आंदोलनात भाग घेतला होता. कितपत होणार लाभ? प्रा. जोगेंद्र कवाडे हे कधी राष्ट्रवादी, कधी काँग्रेस तर कधी भाजपसोबतही राहिले आहेत. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी तत्कालीन उमेदवार नितीन गडकरी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. तसेच छत्तीसगड आणि मध्य प्रदेशामध्ये भाजपा उमेदवारांसाठी प्रचार सुद्धा केला होता. इतकेच नव्हे तर त्यांनी त्यांचा मुलगा जयदीपलाही विधानसभेच्या निवडणुकीत उतरविले होते. दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा दलितबहुल मतदारसंघ आहे. परंतु त्यावेळी त्यांच्या मुलाला अवघी १४३८ मते मिळाली होती. लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. प्रा. कवाडे यांच्या माध्यमातून काँग्रेस निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. परंतु याचा कितपत लाभ होईल, हे येणारा काळच सांगेल.
आव्हान अन् संघर्षही
By admin | Updated: June 17, 2014 00:52 IST