न्यायालय : राजकमल चौक खून खटलानागपूर : बहुचर्चित राजकमल चौक खून खटल्यात बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाने दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर अन्य नऊ आरोपींची सबळ पुराव्याअभावी संशयाचा लाभ देऊन निर्दोष सुटका केली. सुमित रमेश चिंतलवार(२५)रा. विश्वकर्मानगर आणि अमर ऊर्फ छोटू रमेश लोहकरे (२५) रा. बजरंगनगर, अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. गणेश ऊर्फ पिंकू मारोती घोंगडे (२६) रा. रघुजीनगर पोलीस क्वॉर्टर, असे मृताचे नाव होते. निर्दोष सुटका झालेल्यांमध्ये शुभम ऊर्फ बबलू मनोहर फुलझेले (२२) रा. रामबाग, श्रीकांत ऊर्फ मामा चिंतामण इंगोले (३०) रा. बजरंगनगर, अमर नामदेव धरमारे(२८) रा. ज्ञानेश्वरनगर, प्रवीण ऊर्फ जॉन पूरण कालिंदी (२६) रा. वसंतनगर झोपडपट्टी, सॅबेस्टियन ऊर्फ शिबू राफेल अँथोनी (२२) रा. इंदिरानगर जाटतरोडी, रितेश रमेश सेलोकर (२३) रा. जाटतरोडी, निशांत ऊर्फ गब्बर चंद्रकांत सहारे (२८) रा. कुकडे ले-आऊट,ललित ऊर्फ लाडी विलास ठाकरे (२४) रा. विश्वकर्मानगर आणि प्रवीण महादेव मुरारकर (२६) रा. इमामवाडा यांचा समावेश आहे. थरारक सूडनाट्यसरकार पक्षानुसार या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, धंतोली संगम चाळसमोरून होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीवरून एप्रिल २०११ मध्ये बबलू सहारे आणि राजू कांबळे या दोघांचा खून करण्यात आला होता. या खुनात पिंकू घोंगडे हा आरोपी होता.आपल्या मित्रांच्या खुनाचा सूड म्हणून सुमित चिंतलवार आणि साथीदारांनी १० आॅगस्ट २०११ रोजी सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास राजकमल ते जादूमहल चौकादरम्यानच्या श्रद्धा अपार्टमेंटसमोर पिंकू घोंगडे याचा तलवार, चाकू, चॉपरने हल्ला करून आणि दगडाने ठेचून निर्घृण खून केला होता. त्याच्यावर शस्त्रांचे ४८ घाव होते. घटनेच्या वेळी पिंकूची एका जुन्या प्रकरणात न्यायालयात तारीख होती. त्यामुळे तो आपला भाऊ राजेश घोंगडे याच्या सोबत जात होता. दोघेही वेगवेगळ्या मोटरसायकलींवर होते. न्यायालयाकडे जाण्यापूर्वी हे दोघे चंद्रमणीनगर येथील आपली बहीण सोनू अनिल पाटील हिला भेटण्यासाठी जात असतानाच सुमित चिंतलवार याने श्रद्धा अपार्टमेंटसमोर आवाज देऊन पिंकूला थांबवले होते. त्यानंतर सुमित आणि इतरांनी पिंकूला घेराबंदी करून त्याचा खून केला होता. राजेश घोंगडे याच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी भादंविच्या ३०२, १४३, १४७, १४८, १४९, १२० (ब), शस्त्र कायद्याच्या ४/२५ आणि मुंबई पोलीस कायद्याच्या १३५ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. १२ आॅगस्ट २०११ रोजी या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक पी. एच. बडा यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने ११ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी २ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाले. रासायनिक परीक्षणात आरोपींच्या कपड्यांवरील मृताचे रक्त जुळले होते.फरारच राहिला नयनया खून प्रकरणात एक महत्त्वाचा आरोपी नयन दादाजी चिंतलवार हा फरारच राहिला. तो मुख्य आरोपी सुमित चिंतलवार याचा पुतण्या आहे. नयनला त्यावेळचे तदर्थ न्यायालयाचे न्यायाधीश दुनेदार यांच्या न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. या आदेशाविरुद्ध सरकारने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने सत्र न्यायालयाचा जामिनाचा आदेश रद्द केला होता. या आरोपीला अटक झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध वेगळा खटला चालेल. अशी आहे शिक्षा न्यायालयाने सुमित चिंतलवार आणि अमर लोहकरे यांना भादंविच्या ३०२, १४९ कलमांतर्गत जन्मठेप, २ हजार रुपये दंड, १४७ कलमांतर्गत ६ महिने कारावास, ५०० रुपये दंड, १४८ कलमांतर्गत १ वर्ष कारावास, ७५० रुपये दंड, शस्त्र कायद्याच्या कलम ४/२५ अंतर्गत १ वर्ष कारावास, ५०० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. या सर्व शिक्षा आरोपींना एकत्र भोगाव्या लागतील. न्यायालयाने या सर्व आरोपींची गुन्हेगारी कट (भादंवि १२०-ब) यातून निर्दोष सुटका केली. न्यायालयात सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे, आरोपींच्या वतीने अॅड. चंद्रशेखर जलतारे, अॅड. आर. के. तिवारी, अॅड. राम मासूरके आणि अॅड. चेतन ठाकूर यांनी काम पाहिले. सरकार अपिलात जाणारनिर्दोष सुटलेल्या आरोपींपैकी शुभम फुलझेले, प्रवीण कालिंदी, श्रीकांत इंगोलेविरुद्ध सरकार उच्च न्यायालयात अपील दाखल करणार असल्याचे सरकार पक्षाकडून सांगण्यात आले.(प्रतिनिधी)
दोघांना जन्मठेप - नऊ जण निर्दोष
By admin | Updated: September 25, 2014 01:33 IST