योगेश पांडे/ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 5 - आगामी महानगरपालिका निवडणुकांत मिशन-१२५ अंतर्गत भाजपाची प्रचारयंत्रणा कामाला लागली आहे. मात्र केवळ परंपरागत व तरुण मतदारांवर भिस्त ठेवली तर हे लक्ष्य गाठता येणार नसल्याची पक्ष पदाधिकाऱ्यांना जाणीव आहे. त्यामुळेच सबका साथ भूमिका पक्षाने घेतली असून, दलित व अल्पसंख्यक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. यातूनच दलित चळवळीतील पक्ष तसेच अल्पसंख्यकांपर्यंत पक्षाचे धोरण पोहोचविण्याची जबाबदारी ज्येष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे.संघभूमी व विधानसभा निवडणुकांतील यशानंतर मनपा निवडणुकांत मोठा विजय मिळविण्याचे पक्षासमोर आव्हान आहे. निवडणुकांसाठी भाजपाच्या संचालन समितीची बुधवारी घोषणा करण्यात आली. आमदार, खासदारांचा समावेश असलेल्या या टीमचे नेतृत्व आ.अनिल सोले यांच्याकडे देण्यात आले आहे. उत्तर, मध्य, दक्षिण नागपुरातील बऱ्याच प्रभागांमध्ये दलित व अल्पसंख्यक समाजाच्या मतदारांची संख्या मोठी आहे. व्होटबँकेच्या राजकारणात या दोघांचेही महत्त्व मोठे आहे. आपले टार्गेट गाठायचे असेल तर पक्षाच्या परंपरागत मतदारांसोबतच नवीन मतदार जोडणे आवश्यक आहे. यासंदर्भात पक्ष पदाधिकाऱ्यांचे सखोल मंथन झाले. यातूनच आंबेडकरी विचारपक्ष संपर्क तसेच अल्पसंख्यक संपर्क या दोन्ही मुद्यांसाठी स्वतंत्र टीम च तयार करण्यात आली. आंबेडकरी विचारपक्ष संपर्क समितीची जबाबदारी निवडणूक संचालन समितीचे प्रमुख आ.अनिल सोले यांनी स्वत:कडे ठेवली आहे. त्यांच्यासोबत आ.मिलिंद माने, महापौर प्रवीण दटके व संदीप जाधव यांचा समावेश आहे. तर अल्पसंख्यक संपर्क समितीत पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी श्रीकांत देशपांडे, भोजराज डुंबे, जमाल सिद्दीकी, फिरोज शेख यांचा समावेश आहे.या समितीच्या माध्यमातून दलित चळवळीतील विविध पक्ष तसेच अल्पसंख्यक पक्ष व संघटनांना भाजपासोबत जोडण्याचा प्रयत्न होणार आहे. शिवाय निवडणूक काळात संबंधितांशी समन्वय राखण्याची जबाबदारी या समितीवर राहणार आहे. यादृष्टीने मागील अनेक दिवसांपासून विविध कार्यक्रमदेखील राबविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भाजपला हवा 'सबका साथ'
By admin | Updated: January 5, 2017 21:29 IST