रिकामटेकड्यांनो सावधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:09 AM2021-04-16T04:09:20+5:302021-04-16T04:09:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनामुळे सर्वत्र धास्ती निर्माण झाली असल्याने दंडा चालवून कडक धोरण राबविण्याऐवजी आवाहन करण्यावर भर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे सर्वत्र धास्ती निर्माण झाली असल्याने दंडा चालवून कडक धोरण राबविण्याऐवजी आवाहन करण्यावर भर देण्याचा प्रकार रिकामटेकड्यांच्या लक्षात येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता पोलिसांनी विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांच्या बंदोबस्ताची तयारी केली आहे. शहरातील विविध भागांत चाैकाचाैकात तात्पुरते तंबू उभे केले असून गुरुवारी सर्वत्र व्हेईकल रूट मार्च करून कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.
कोरोनाचा झपाट्याने होत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेत सरकारने लॉकडाऊन घोषित केले आहे. सर्वच जीवनावश्यक दुकाने सुरू ठेवून आवश्यक तेव्हाच घराबाहेर पडा, गर्दी करू नका, असे पोलीस वारंवार आवाहन करीत आहेत. मात्र, बेशिस्त मंडळी त्याला दाद द्यायला तयार नाही. कोरोनाबाधितांची भयावह आकडेवारीही लक्षात घ्यायला तयार नाही. जागोजागी गर्दी केली जात आहे. ते लक्षात घेऊन पोलिसांनी आता कडक उपाययोजनांच्या अंमलबजावणीची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर, विविध चौकांत पोलिसांचे तात्पुरते तंबू उभारले असून शहरात गस्त वाढवण्यात आली आहे. आता रिकामटेकडे फिरताना दिसले की त्यांचा योग्य प्रकारे पोलीस बंदोबस्त करणार आहेत. त्यासाठी तीन हजार पोलिसांनी मदतीला एसआरपीएफच्या दोन कंपन्या आणि होमगार्ड घेतले आहे. शीघ्र कृती दल, दंगा नियंत्रण पथकही सज्ज करण्यात आले आहे.
----
१७६ जणांवर कारवाई
पोलिसांनी आज विना मास्क फिरणाऱ्या ६७, गर्दी करणाऱ्या ५२ आणि विनाकारण फिरणाऱ्या ५७ वाहनचालक अशा एकूण १७६ जणांवर कारवाई केली.
----