लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अगरबत्तींच्या काड्या, फर्निचर, कापड, बायो इथेनॉल आणि बांधकाम क्षेत्रातही बांबूचा मोठ्या प्रमाणात होणारा उपयोग लक्षात घेता भविष्यात बांबूची अर्थव्यवस्था ही ३० हजार कोटींची बनू शकते. महामार्ग बांधताना रस्त्याशेजारी ‘क्रॅश बॅरियर’साठी बांबूचा उपयोग भविष्यात होणार आहे, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ''आयएफजीई'' (इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी) तर्फे बांबू तंत्रज्ञान, साहित्य आणि सेवा या विषयावरील प्रदर्शनाच्या ''ऑनलाइन'' उद्घाटन करताना ते बोलत होते.
बांबूची विकसनशील प्रक्रिया आता गती घेत आहे बांबूपासून आकर्षक साहित्य बनविले जाते. या साहित्याची मागणी वाढवली, तर बांबूची लागवड आणि उत्पादन वाढेल. न्यूज प्रिंटसाठी लागणारा बांबू आपल्याला आयात करावा लागतो. या बांबूची लागवड देशात करून न्यूज प्रिंटची आयात कमी करता येऊ शकते काय, यावर अभ्यास करणे आवश्यक आहे. उत्तर-पूर्व भारतातील राज्यांमध्ये बांबूपासून अगरबत्तीच्या काड्या बनविण्याचा उद्योग आहे. या भागातून चार हजार टन काड्या देशाच्या विविध राज्यांमध्ये पाठविल्या जाऊ शकतात. बांबूपासून निघणार्या कचर्यापासून ‘ऑरगॅनिक कार्बन’ बनविता येतो. हा ऑर्गेनिक कार्बन शेतकर्यांसाठी वरदान ठरला आहे. यामुळे शेतकर्याचे उत्पन्न अनेक पटींनी वाढल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच बांबूच्या कचर्यापासून बायो इथेनॉल बनते. उत्तर पूर्व राज्यांमध्ये बायो इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प सुरू होऊ शकतात. बांबूच्या अशा सर्व उद्योगांना एमएसएमईतर्फे प्रोत्साहन आणि मदत करण्याची आमची भूमिका आहे, असे गडकरी यांनी सांगितले.
बांबूच्या आपल्याकडे १८० जाती आहेत. पण आपल्याला उत्पादनाच्या दृष्टीने कोणती जात आवश्यक आहे, त्यावर संशोधन करून त्या जातीच्या बांबूची लागवड झाली पाहिजे, असा सल्लादेखील त्यांनी दिला.