नागपूर : आपल्या मालकीच्या कालवडीला वाघिणीने ठार केले, यामुळे बदल्याच्या भावनेतून विषप्रयोग करून वाघिण आणि तिच्या तीन बछड्यांना ठार करणाऱ्या दिवाकर दत्तू नागेकर या आरोपीला जामीन नामंजूर झाला आहे. त्याची रवानगी १० फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील कऱ्हांडला वनक्षेत्रात ही घटना घडली होती. नववर्षदिनी ही घटना उघडकीस आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एका बछड्याचे शव आढळले होते. नवेगाव साधू या गावातील दिवाकर दत्तू नागेकर या व्यक्तीने हे कृत्य केल्याचे वन विभागाच्या आणि पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली होती.
प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी उमरेड यांच्याकडे आरोपीने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र हे कृत्य अत्यंत भीषण असून एकाच वेळी चार वाघांचा यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे या घटनेत सहानुभूती दाखविल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल, असे न्यायालयाने सांगत त्याचा जामीन अर्ज फेटाळला. १० फेब्रुवारीपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी शासनाच्या वतीने विशेष सल्लागार कार्तिक शुक्ल यांनी भक्कमपणे बाजू मांडली. सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) डॉ. अजित साजणे हे याप्रकरणी तपास करीत आहेत.