आॅटोचालकांचा आरटीओवर रोष : विद्यार्थी प्रवाशांचे मात्र हालनागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आॅटोचालकांवर करीत असलेल्या अन्यायाच्या विरोधात तीन सीटर आॅटोरिक्षा चालक संयुक्त संघर्ष समितीने आजपासून दोन दिवसीय संप पुकारला आहे. पहिल्याच दिवशी या संपात साधारण ८० टक्के आॅटोचालक सहभागी झाले. याचा फटका आॅटोने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह प्रवाशांना बसला. शहरात जे आॅटो धावत होते त्यांनी आपले भाडे दुप्पट केले होते. विशेष म्हणजे एकीकडे कारवाईच्या विरोधात संप सुरू असताना दुसरीकडे आरटीओचा आॅटोवरील कारवाईचा धडाका सुरूच होता. समितीचे सदस्य हरिश्चंद्र पवार यांनी सांगितले,‘आॅटोरिक्षा शेअर योजने’ला ५ मे २०१२ रोजी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली. त्यानुसार ठरवून दिलेल्या प्रवासभाड्यानुसार रेल्वे स्थानक, मेडिकल, अजनी रेल्वेस्थानक, मोरभवन, गणेशपेठ, मेयो हॉस्पिटल या मार्गावर आॅटोचालकांची रहदारी सुरू होती. परंतु आरटीओच प्राधिकरणाच्या निर्णयाला डावलून मीटरची सक्ती करून आॅटो जप्तीची कारवाई केली जात आहे. दुसरीकडे आॅटो मीटरमध्ये आवश्यक बदल (कॅलिब्रेशन) करण्यापूर्वीच दंडात्मक कारवाई केली जात आहे आणि महत्त्वाचे म्हणजे, शहरात स्टार बस क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जात असताना कारवाई होत नाही, अवैध वाहतुकीकडेही दुर्लक्ष झाले आहे, याकडे लक्ष वेधण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. मंगळवारीही हा संप सुरू राहील. आॅटोचालकांच्या मागण्यांना घेऊन उद्या जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलविली आहे. दरम्यान, आज आमदार प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) विजय चव्हाण व ग्रामीणचे रवींद्र भुयार यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी वाहतूक विभागाचे निरीक्षक रवींद्र चव्हाणही उपस्थित होते. (प्रतिनिधी)आॅटोवरील कारवाई थांबविण्याची मागणीगजभिये यांनी आॅटोवरील कारवाई थांबविण्याची मागणी करीत तीन प्रवासी असलेल्या आॅटोंवर कारवाई करू नये, तीन ते चार हजार रुपये दंड आकारू नये, शेअर आॅटोकरिता वेगळी व्यवस्था करावी, रेल्वेस्थानकावर नव्याने आॅटो थांबा देण्याची व शहरात आॅटो थांबा ठरवून देण्याच्या मागणीचे निवेदन दिले. यावेळी शिष्टमंडळात अध्यक्ष मोहनदास नायडू, हरिश्चंद्र पवार, मोहन बावणे, चरणदास वानखेडे, अजय उके, इसराईल खान, नासीर खान, शाहनू खान, कैलाश श्रीपतवार, महादेव खोडे आदी उपस्थित होते. पालकांची तारांबळविद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या आॅटोचालकांनी संपाची माहिती एक दिवसापूर्वीच पालकांना दिली होती. यामुळे काही पालकांनी तात्पुरती उपाययोजना केली होती, परंतु ज्या पालकांनी याकडे दुर्लक्ष केले, त्यांची तारांबळ उडाली. शाळेची वेळ होऊनही आॅटोचालक आला नसल्याने पालकांना विद्यार्थ्यांना स्वत: शाळेत सोडावे लागले. रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे हालमध्यवर्ती रेल्वे स्थानकावर पाच-सहा आॅटोरिक्षे उभे होते. यामुळे बाहेरगावावरून येणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. अनेकांना बसमधून प्रवास करावा लागला, तर काहींना जवळच्या नातेवाईक किंवा मित्रांशी मोबाईलने संपर्क करून बोलवावे लागले. शहराच्या अनेक महत्त्वाच्या चौकातही असेच दृश्य होते. ज्या आॅटोरिक्षा धावत होत्या, त्यांनी आपले भाव दुप्पट केले होते.आॅटोवर कारवाई सुरूचआरटीओच्या कारवाईच्याविरोधात आॅटोचालकांचा संप असताना दुसरीकडे मीटरने न चालणाऱ्या आॅटोंवर कारवाई सुरू होती. आज तीन आॅटोंवर जप्तीची कारवाई करण्यात आली. ही कारवाई अशीच सुरू राहील असे आरटीओचे म्हणणे आहे. आॅटोचालकांचे गडकरींच्या घरापुढे धरणेशहरात १०९९० विना परवाना आॅटोचालक प्रवासी वाहतूक करतात. आरटीओच्या माध्यमातून या आॅटोचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यांचे नवीन शोरुम आॅटो जप्त करण्यात येत आहे. अनेक आॅटोचालकांनी कर्ज घेऊन आॅटो खरेदी केले आहेत. आरटीओच्या कारवाईमुळे आॅटोचालकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. येत्या दोन दिवसात आरटीओने आॅटो जप्तीची कारवाई थांबवावी, अशी मागणी प्रायव्हेट आॅटो चालक मालक संघटनेतर्फे करण्यात आली आहे. ही कारवाई न थांबल्यास संपूर्ण प्रायव्हेट आॅटोचालक कुटुंबीयांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरापुढे धरणे देणार असल्याचा इशारा संघटन प्रमुख नासिर खान यांनी पत्रपरिषदेत दिला.
आॅटो बंदचा फटका
By admin | Updated: September 16, 2014 02:17 IST