श्री सूर्या घोटाळा : काहींना घसघशीत परतावा अजय डांगे - अकोला श्री सूर्या इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीने गुंतवणूकदारांना चार योजनांच्या माध्यमातून गुंतवणुकीचे आमिष दाखविले. या योजनांमध्ये पैशांची गुतंवणूक करुन काही ठेवीदारांना कमी कालावधीत फायदा झाल्याची माहितीही उजेडात आली आहे. अकोल्यातील १६ गुतंवणूकदारांना ४३ लाख ३0 हजार ६00 रुपयांचा लाभ या योजनेतून झाल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात सादर केली आहे. नागपूर श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीने स्वत:चे औद्योगिक प्रकल्प सुरु केले. यामध्ये ऑईल मिल, पर्यटन आणि वाहतुकीसह इतरही प्रकल्पांचा समावेश होता. या उद्योगांसाठी कंपनीला पैशांची गरज भासली. त्यामुळे कंपनीने गुंतवणूकदारांमार्फत भांडवल उभे करण्याचा निर्णय घेतला. गुतंवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने योजना तयार केल्या. या योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी कंपनीने नागपूर, अमरावती, अकोला आणि पुण्यासह अन्य शहरांमध्ये मेळावे घेतले. तत्पूर्वी, कंपनीने स्थानिक परिचितांना हाताशी धरुन त्यांची बिझनेस असोसिएट्स (एजंट) म्हणून नेमणूक केली. एजंटांनी मेळावे आयोजित करुन गुंतवणूकदरांना प्रोत्साहित करण्याची कामगिरी चोखपणे बजावली. अकोल्यातील अनेक मोठय़ा गुंतवणुकदारांनी १ कोटीपेक्षा जास्त रक्कम गुंतविली. अशा होत्या फसव्या योजना.. -३ महिन्यांकरिता १ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारास १३ ते १५ टक्के व्याज देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. बिझनेस असोसिएट्सला (एजंट) ३ ते ५ टक्के कमिशनही दिले जाणार होते. -दोन वर्षाच्या योजनेत किमान १ लाख रुपयांची गुतंवणूक करण्याचे बंधनकारक होते. तीन महिने पूर्ण झाल्यानंतर संबंधित एजंटला कमिशनही देण्यात आले. -तिसर्या योजनेमध्ये १८ महिन्यांकरिता १ लाख रुपये गुंतविल्यास गुंतवणूदाराला मुदतीनंतर २ लाख रुपये देण्यात येते होते; मात्र मुदत संपण्यापूर्वीच रक्कम काढल्यास गुंतवणूकदारास व्याज दिले जात नव्हते.
आकर्षक योजनांनी पाडली होती भुरळ!
By admin | Updated: May 16, 2014 00:07 IST