योगेश पांडे नागपूर : इंदिरा गांधी व पी.व्ही.नरसिंहराव यांच्या कार्यकाळात केंद्रीय राज्यमंत्री राहिलेले माजी कॉंग्रेस नेते अरविंद नेताम हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंचावरून काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. नेताम यांनी यावेळी राजकीय भाषण टाळले. मात्र त्यांनी आदिवासी समाजासमोरील समस्या संघस्थानावरून संघ धुरिणांसमोर मांडल्या. धर्मांतरण ही आदिवासी समाजासमोरील सर्वात मोठी समस्या आहे. आदिवासींना धर्मांतरणाचा सर्वात मोठा धोका आहे व कोणत्याही राज्य शासनाने याला गंभीरतेने घेतले नाही. मात्र आता धर्मांतरणविरोधी कायदा झाला पाहिजे. संघाने या मोहिमेला गती द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यानंतर संघस्थानी येणारे ते कॉंग्रेसशी संबंधित दुसरे मोठे नेते ठरले. नेताम यांनी त्यांच्या भाषणात आदिवासी समाजाचेच मुद्दे मांडले. देशात आदिवासी समाजासमोर अनेक आव्हाने आहेत. अनेकदा सरकार-प्रशासनासमोर गेल्यावर सुनावणीच होत नाही. त्यामुळेच मी संघाकडेच आशेने पाहतो आहे. धर्मांतरणासोबतच आदिवासींचे विस्थापन हीदेखील मोठी समस्या आहे. विकासाच्या नावावर केंद्र शासनाकडून उद्योगपतींना मदत होत आहे. संघाने सर्वांना समान भागीदारी मिळेल यासाठी पुढाकार घ्यावा. आदिवासींच्या जमिनी नेहमीसाठी अधिग्रहित न करता लीजवर घ्याव्या. काम झाल्यावर संबंधित जागा आदिवासींना परत कराव्या. छत्तीसगडमध्ये मागील अनेक वर्षात पैसा कायद्याचे पालन झाले नाही. संघाने हा विषय गंभीरतेने घ्यावा, असे नेताम म्हणाले. डिलिस्टिंग धर्मातरण रोखण्यासाठी मोठे अस्त्र ठरू शकते. त्याच्या समर्थनार्थ वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न हवा, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले.
नक्षलवाद डोके काढणार नाही असे धोरण हवेछत्तीसगडमध्ये नक्षलवादाला ठेचण्याचे काम सुरू आहे. मात्र नक्षलवादाची विचारधारा अनेकांमध्ये कायम आहे. भविष्यात नक्षलवादी परत डोके वर काढण्याचा धोका आहे. त्यामुळे त्यादृष्टीने धोरण तयार झाले पाहिजे, अशी मागणी नेताम यांनी यावेळी केली.
आदिवासींसाठी हवा धर्म कोडआम्हालादेखील धर्म कोड मिळावा अशी आदिवासींची मागणी समोर येत आहे. आम्हाला नविन सामाजिक विचारधारा तयार करायची नाही. मात्र आदिवासींनादेखील मान्यता मिळायला हवी. देशात आदिवासी समाजाची ओळख हळूहळू संपत आहे. धर्म कोड असला तर पुढील पिढ्यांना भूतकाळ व ओळख कळेल, असे नेताम म्हणाले.
संघावर स्तुतिसुमनेयावेळी नेताम यांनी संघावर स्तुतिसुमने उधळली. संघभूमीत येऊन बरेच काही शिकण्याची संधी मिळाली. संघाच्या शताब्दी वर्षात येथे येणे हा माझ्यासाठी गौरवाचा क्षण आहे. देशाची अखंडता व सामाजिक समरसतेसाठी देशात संघ वगळता कुठल्याही संघटनेने काम केलेले नाही. आदिवासींच्या विकासासाठी संघच पुढाकार घेऊ शकतो, असे ते म्हणाले.