नागपूर : नागपूर सकल जैन समाजातर्फे आर्यनंदजी महाराज यांचे शिष्य मुनीश्री सुवीरसागरजी महाराज यांच्या प्रवचनमालेला मंगळवारपासून चिटणीस पार्कवर प्रारंभ झाला. मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून या प्रवचनाचा लाभ घेतला. मुनीश्रींनी याप्रसंगी श्रावकांना संबोधित करताना स्पष्ट केले की, परिस्थिती कशीही असो, कुठलेही युग असो, नेहमीच सत्याची विजय झाला आहे आणि पुढेही होत राहील. आपल्या प्रवचनात त्यांनी एका पौराणिक कथेचा दृष्टांत दिला. यात सत्य हेच सर्वात मोठे धन आहे. सत्याचा मार्गावर आपण चालत असाल तर लक्ष्मीसुद्धा तुमच्याजवळ येईल. ते म्हणाले की, दिंगबर संतांच्या शरीरावर कुठलेही वस्त्र नसतात. जिथे कपडे असतात, तिथे लफडेही असतात. जसे चेहरा स्वच्छ करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. तसेच चरित्र स्वच्छ ठेवण्यासाठी संतांच्या वाणीची आवश्यकता असते. मी विचार नाही, संस्कार घेऊन आलो आहे. सत्य हे देवाचे दुसरे नाव आहे. मानवात सत्याची भावना नसल्यामुळे शेजाऱ्या-शेजाऱ्यात भांडणे आहे. कुणाचा कुणावरही विश्वास राहिला नाही. जीवनात एखादी हरविलेली वस्तू मिळू शकते. मात्र हरविलेला विश्वास परत मिळविणे शक्य नाही. त्यामुळे मानवाने ‘सत्यमेव जयते’ समजणे आवश्यक आहे. प्रवचनापूर्वी मंडपाचे उद्घाटन राजेश सरावगी यांनी केले. मंगल कलशाची स्थापना रमेशचंद्र जैन गोंदियावाले यांनी केली. प्रवचनमालेचे दीपप्रज्वलन महापौर प्रवीण दटके यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आ. विकास कुंभारे, माजी मंत्री अनिस अहमद,अतुल लोंढे, अतुल कोटेचा, दिलीप जैन, विवेक सोईतकर, संतोष पेंढारी, नितीन महाजन, महेश नाईक, प्रकाश मारवडकर, पंकज बोहरा, प्रवीण भेलांडे उपस्थित होते.(प्रतिनिधी)
सत्याचा नेहमीच विजय
By admin | Updated: September 17, 2014 00:55 IST