न्यायालय : नंदनवन तिहेरी खूनप्रकरण नागपूर : नंदनवन भागातील तिहेरी खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना रविवारी नंदनवन पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्तात अवकाशकालीन प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी जी. आर. पाटील यांच्या न्यायालयात हजर करून त्यांचा २६ जूनपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला. दिलीप विठ्ठलराव कोसूरकर (२५) रा. जुना बगडगंज, रॉबिन राहुल बोरकर (२१) रा. गरोबा मैदान, गणेश ऊर्फ गोल्डी जन्मजय कुटे (२२) रा. व्यंकटेश कॉलनी आणि दीपक ऊर्फ मुन्ना बालकदास गिले (२५) रा. गंगाबाई घाट स्विपर कॉलनी, अशी आरोपींची नावे आहेत. रशीदखान जसीमखान (२५) रा. हिवरीनगर, अब्दुल बेग कादीर बेग (२१) रा. वसंतराव नाईक झोपडपट्टी आणि रोहित युवराज नारनवरे (१५) रा. पडोळे ले-आऊट हिवरीनगर , अशी मृताची नावे आहेत. या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, मंजु काशीकर खुनातून निर्दोष सुटलेल्या गज्जू वंजारी याच्या लग्नाचा स्वागत समारंभ २० जून रोजी सक्करदरा तलावाजवळील हॉटेल बॉलिवूड सेंटर पॉर्इंट येथे होता. या समारंभात हिवरीनगर भागातील कुख्यात गुन्हेगार राहुल ऊर्फ चपट्या मेश्राम आणि कुख्यात कोसूरकर बंधू हे आपापल्या टोळक्यांसह आले होते. दिलीप कोसूरकर हा गुन्हेगारीपासून अलिप्त राहू इच्छित असल्याने राहुल चपट्या हा नेहमी हिणवून मोबाईलवरून त्याला शिवीगाळ करायचा. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वैमनस्य निर्माण झाले होते. विवाह स्वागत समारंभात या दोन्ही टोळ्या आमोरासमोर येताच कोसूरकर टोळीने राहुल चेपट्यावर तलवार,चाकू, सुरी आदी शस्त्रे उगारली होती. त्यामुळे चेपट्याच्या टोळीने शस्त्रे काढली होती. परंतु कासूरकर टोळी वरचढ झाल्याने चेपट्यासह टोळीतील सदस्य आपापल्या वाहनांनी पसार झाले होते. रशीदखान, अब्दुल, रोहित आणि प्रदीप भारत घोडे रा. जुना बगडगंज हे चौघे एकाच फ्रिडम मोटारसायकवर बसून पळून जात असताना सशस्त्र कोसूरकर टोळीने स्कार्पिओने त्यांचा पाठलाग केला. २० जूनच्या रात्री ११.३० वाजताच्या सुमारास हसनबागेतील मकदूम अशफाक चौक ते श्रीकृष्णनगर दरम्यान त्यांनी मोटरसायकलला जोरदार धडक मारून दोघांना घटनास्थळीच चिरडून ठार केले. तर दोघांना जखमी केले. त्यापैकी रोहितचा मेडिकल इस्पितळात उपचार घेताना मृत्यू झाला. प्रदीप घोडे याच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी भादंविच्या ३०२, ३०७, १२० (ब), १४१, १४३, १४४, १४८, १४९, ५०६ (ब), शस्त्र कायद्याच्या ४/२५ आणि मुंबई पोलीस कायद्याच्या १३५ कलमान्वये गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. आरोपींपैकी स्कार्पिओतील दोन जण एका ट्रकवर धडकल्याने जखमी झाले आहेत. आज तपास अधिकारी पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवाई यांनी चारही आरोपींना न्यायालयात हजर करून २८ जूनपर्यंत पोलीस कोठडी रिमांडची मागणी केली. बचाव पक्षाने पोलीस कोठडीस विरोध केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपींना २६ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. न्यायालयात आरोपींच्या वतीने अॅड. प्रफुल्ल मोहगावकर, अॅड. पराग उके यांनी काम पाहिले. (प्रतिनिधिी)
चौघांना २६ पर्यंत पीसीआर
By admin | Updated: June 23, 2014 01:17 IST