लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुण्यातील एल्गार परिषदेत काही आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले किंवा नाही याबाबतचा व्हिडीओ मागविण्यात आला आहे. आक्षेपार्ह वक्तव्य तपासले जात आहे. त्यानंतरच पुढची कारवाई केली जाईल, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची सध्या विदर्भात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरू आहे. सोमवारपासून ते नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी सकाळी दीक्षाभूमी येथून या दौऱ्याला सुरुवात झाली. त्या वेळी जयंत पाटील यांच्यासोबत गृहमंत्री अनिल देशमुख होते. या वेळी त्यांना पत्रकारांनी एल्गार परिषदेत अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी असलेल्या शरजील उस्मान याने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत विचारणा केली असता त्या कार्यक्रमातील भाषणाचा व्हिडीओ मागवला आहे. त्याची रीतसर तपासणी करू. त्यानंतर काही आक्षेपार्ह आढळले तर कारवाई करू, असे देशमुख यांनी सांगितले.