करवाही : देवलापार परिसरातील तब्ब्ल ७0 गावांमधील वीजपुरवठा बुधवारी रात्री ८ वाजता खंडित करण्यात आला. मंगळवारी सकाळी १0 वाजताच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याने ग्रामस्थांना अख्खी रात्र अंधारात व गरमीमध्ये काढावी लागली. ब्रेक डाऊनमुळे हा प्रकार घडल्याचे कारण महावितरणच्या अधिकार्यांनी पुढे केले आहे. बुधवारी दिवसभर परिसरातील वातावरण नीरभ्र होते. दिवसभर व रात्री वादळी परिस्थिती नसताना रात्री ८ वाजताच्या सुमारास या परिसरातील ७0 गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. रात्रभर वीजपुरवठा सुरळीत करण्यात न आल्याने लहान मुलांसह अंदाजे ६0 हजार ग्रामस्थांना डासांचा सामना करीत गरमीमध्ये रात्रा काढावी लागली. यासंदर्भात देवलापार येथील कनिष्ठ अभियंता धाबेकर यांच्याशी कारण विचारण्यासाठी संपर्क साधला असता, त्यांनी उर्मटपणे उत्तर दिल्याचे अनेकांनी सांगितले. शिवाय, रात्री ११ नंतर त्यांनी फोन घेणही बंद केले. योग्य कारण न कळाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती होती. काहींनी महावितरणच्या रामटेक व नागपूर येथे कार्यालयांत संपर्क साधला, मात्र कुणीही समाधान केले नाही. हा संपूर्ण परिसर जंगलव्याप्त व आदिवासीबहुल आहे. या भागात अधिक काळ भारनियमन न करण्याचे निर्देश संबंधितांनी महावितरणच्या कर्मचार्यांना दिले आहे. हा परिसर भारनियमनमुक्त करण्यासाठी सिंगल फेज लाईनची व्यवस्था करण्यात आली. त्यासाठी मोठमोठे स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर उभारले आहेत. यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. मात्र, ही संपूर्ण व्यवस्था या भागात कुचकामी ठरली असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात सर्वाधिक भारनियमन हे देवलापर परिसरात केले जाते. या परिसरातील करवाही, मानेगाव (टेक), बांद्रा, खुर्सापार यासह काही गावांमध्ये ब्रेक डाऊनच्या नावावर दोन-दोन दिवस वीजपुरवठा खंडित केला जातो. येथील आदिवासीबांधव आधीच विविध मूलभूत सुविधांपासून वंचित असताना महावितरण कंपनीही परिसरातील ग्रामस्थांना वेठीस धरत असल्याचा आरोप काहींनी केला. या भागात ब्रेक डाऊनच्या नावावर नेहमीच वीजपुरवठा खंडित केला जातो. हा प्रकार बंद करून हा परिसर भारनियमनमुक्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली असून, आंदोलनाचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)
७0 गावे रात्रभर अंधारात
By admin | Updated: May 16, 2014 00:52 IST