शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

नाटक पाहाताना मोबाइल का वाजतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 08:00 IST

नाटक सुरू असताना मोबाईल वाजतात, गाण्याच्या मैफलीतही चुळबूळ!. का?

-कौशल श्री. इनामदार 

गेले काही दिवस नाट्यप्रयोगात मोबाइलमुळे व्यत्यय येण्यावरून विविध माध्यमांतून चर्चा सुरू आहे. मलाही संगीताच्या कार्यक्र मांतून हा अनुभव सातत्याने येतो. मोबाइलची घंटी वाजली नाही तरी समोरच्या श्रोत्यांमध्ये काही श्रोते व्हॉट्सअँप किंवा फेसबुकमध्ये गुंतले असतात आणि त्यांच्या मोबाइलचा दिवा समोरच्या कलाकाराची एकाग्रता भंग करतच असतो. पण मला वाटतं की, मोबाइल हे केवळ लक्षण आहे, खरा रोग वेगळाच आहे !‘रसिकश्रोते हो’.

कार्यक्र माची ही सुरुवात आपण सर्वांनीच असंख्य वेळा ऐकली आहे. बालगंधर्व त्यांच्या श्रोत्यांना ‘रसिक मायबाप’ म्हणत असत. हे केवळ पोकळ शब्द नव्हते. बालगंधर्व या रसिकतेचं मोल ओळखून होते. श्रोता संगीतकलेला पूर्णत्व देत असतो. काही प्रतिभावंत तर असंही म्हणाले आहेत की, ‘रसिक हा मूक कलाकारच असतो !’ माझ्यासारख्या प्रत्येक कलाकाराच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक म्हणजे श्रोता ! यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक कलाकाराला श्रोत्याच्या या भूमिकेतून जाणं - किंबहुना श्रोत्याच्या भूमिकेत राहाणं - केवळ अनिवार्य आहे. मी पाहिलेले अनेक उत्तम गायक, वादक, संगीतकार फार उत्तम ऐकतात. 

पण जितकी चर्चा वाचनसंस्कृतीबद्दल होते तितकी या श्रवण संस्कृतीबद्दल होताना दिसत नाही. मला वाटतं याला एकच कारण आहे. आपण आपल्या या गुणाला काहीसं गृहीत धरतो. लहान मुलांनासुद्धा ‘बोलायला’ शिकवण्याची आपल्याला जबाबदारी वाटते; पण ऐकायला ते आपोआप शिकतील, असं आपल्याला वाटतं !

‘रसिक श्रोते हो’ हे शब्द आपण असे एकत्न ऐकत असलो तरीही श्रोत्यापासून रसिक होण्याचा प्रवास हा कारागिरापासून कलाकार होण्याच्या प्रवासाइतकाच खडतर असतो. रसिकत्व कुणी बहाल करू शकत नाही, ते कमवावं लागतं. बालगंधर्वांसारखा कलाकार जेव्हा ‘रसिक मायबाप’ म्हणून समोरच्या श्रोत्याला संबोधतात तेव्हा ते माणसातल्या रसिकत्वाला संबोधत असतात.प्रत्येक कलाकाराला दाद हवी असते. आरती प्रभू म्हणतात - ‘दाद द्या अन् शुद्ध व्हा !’ आणि एकीकडे कवी अशोक बागवे म्हणतात - ‘कलाकाराचं मरण दोनदा ! एक-  हवी तिथे दाद आली नाही की आणि दोन - नको तिथे दाद आली की !’ थोडक्यात - नुसती वाहवा कलाकारालाही नकोच असते. ती योग्य ठिकाणी आली तरच त्याची किंमत असते.कला आणि संगीत अशाच ठिकाणी बहरतात जिथे उत्तम, चोखंदळ आणि जाणकार रसिकता बहरते. या पिढीचा एक संगीतकार म्हणून एक तक्रार सतत माझ्या कानावर पडत राहते -‘‘हल्लीच्या संगीताचा दर्जा आता पूर्वी इतका राहिला नाही. त्यामुळे हल्लीची गाणी दीर्घकाळ रसिकांच्या मनात दरवळत नाहीत जशी जुनी गाणी दरवळतात.’’

माझ्या कलेचा आणि व्यवसायाचा एक प्रतिनिधी म्हणून मी या तक्रारीकडे गांभीर्याने बघतो. या तक्र ारीमध्ये तथ्य असलं तरी त्याची कारणमीमांसा अनेकदा एकांगी होते आणि याचा संपूर्ण दोष हा संगीतकारांवर लादला जातो. पण याचं निराकारण करायचं असेल तर या प्रश्नाचा थोडा खोलवर जाऊन विचार करायला हवा.  

काळ बदलला की संगीत बदलतं हे निर्विवाद सत्य आहे. पण या बदलाचं प्रतिबिंब जितक्या लवकर आणि थेट भावसंगीतात किंवा चित्रपट संगीतात दिसतं तितकं ते अभिजात संगीतात किंवा लोकसंगीतात दिसत नाही. किंबहुना भावसंगीत किंवा चित्नपटसंगीत हा समाजमनाचा आरसा आहे असं आपण म्हणू शकू. लोकसंगीतामध्ये काळ जवळ जवळ गोठून राहिलेला असतो आणि अभिजात संगीत काळाच्या या बदलांपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करीत असतं. तरीही आज शास्रीय संगीताच्या मैफलीचं स्वरूपही बदललं आहे हे मान्य करावंच लागेल. अगदी वीस वर्षांपूर्वीपर्यंत तीन-तीन तास चालणार्‍या मैफलींचा वेळ आता दीड-दोन तासांवर आला आणि एका कार्यक्र मात एका कलाकाराऐवजी आता तीन-तीन कलाकार दिसू लागले. भावसंगीतात आणि चित्नपटसंगीतात मात्र हे बदल झपाट्याने आणि तितक्याच ठळकपणे प्रतिबिंबित झाले. जागतिकीकरणाने आणि गेल्या काही वर्षांमध्ये संगीतातही तंत्नज्ञानाचा अमल वाढला. तंत्रज्ञान बदललं, जग बदललं; पण आणखी एक महत्त्वाचा घटकही बदलला आणि तो म्हणजे श्रोता आणि श्रवणसंस्कृती!

गाण्याचा आस्वाद घेण्याच्या पद्धतीत आणि प्रक्रियेत फरक पडल्यामुळेही संगीताचा पोत बदलतो, असा माझा अनुभव आहे.  बालगंधर्व चित्रपटावर काम करत असताना त्या काळातल्या संगीताचाच अभ्यास केला नाही तर त्या निमित्ताने तेव्हाच्या श्रवणसंस्कृतीबद्दलही जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. त्यावेळी मराठी मध्यमवर्गीय माणसाचं संगीत ऐकण्याचं एकमेव स्थान म्हणजे कीर्तनं. अण्णासाहेब किर्लोस्करांनी आपल्या नाटकांचं संगीत देताना प्रामुख्याने कीर्तनपरंपरेतल्या चालींचा उपयोग केला. साकी, दिंडी, कामदा, या छंदांमध्ये नाटकाची पदं रचून ती रंजक केली.

संगीत सौभद्रचं संगीत पं. भास्करबुवा बखले यांनी केलं आणि त्यांनी अनेक उंबर्‍याबाहेर ठेवलेले संगीतप्रकार नाट्यसंगीतात आणून मराठी संगीतर्शोत्यांचा अनुभव अधिक समृद्ध केला. उदा. ‘नेसली पितांबर जरी’सारख्या लावणीला ‘वद जाऊ कुणाला शरण गं’च्या रूपात आणून त्यांनी एरवी माडीवर जाऊन कधीही लावणी न ऐकू शकणार्‍या रसिकांना एक वेगळं दालन उघडून दिलं. प्रथम नाट्यसंगीताच्या निमित्तानं आणि नंतर चित्रटसंगीताच्या रूपानं अनेक संगीतप्रकार गोविंदराव टेंबे आणि मास्तर कृष्णराव यांच्यासारख्या संगीतकारांनी हाताळले. ‘शंभो शिवहर करु णाकर हे विश्वेशा’ या ब्रिटिश बॅण्ड पथकाच्या धुनेवर आधारलेल्या नांदीपासून ‘नाही मी बोलत नाथा’ हे ‘हमसे न बोलो राजाजी’ या ठुमरीवरून घेतलेल्या पदापर्यंत नाट्यसंगीत आपल्यामध्ये नवनवीन प्रवाह सामावतच राहिलं.

लोक नाटकांना गर्दी करू लागले ते केवळ नाट्यासाठी नव्हे तर त्यातल्या संगीतासाठी. बालगंधर्वांसारख्या प्रतिभावंत गायकाचं गाणं ऐकण्याकरिता लोक मैलोंमैल प्रवास करून यायचे. त्यावेळी संगीत ऐकायचं असेल तर प्रत्यक्ष ऐकणं हाच एक पर्याय होता !

या  श्रवणसंस्कृतीत पहिली क्र ांती केली ती रेडिओ आणि ग्रामोफोन या दोन यंत्रांनी. ग्रामोफोन घरी बाळगण्याची चैन सगळ्यांनाच उपलब्ध नव्हती त्यामुळे रेडिओ हे सामान्य लोकांचं श्रवणाचं साधन बनलं. त्याच दरम्यान गजाननराव वाटवे, जे.एल. रानडे आणि जी.एन. जोशींसारख्या गायक-संगीतकारांनी भावगीत हा गायनप्रकार लोकप्रिय केला. वाटवेंच्या कार्यक्र माला अलोट गर्दी व्हायची असं आम्ही आजही ऐकतो. भावगीताने गीतकाव्य हा प्रकार लोकप्रिय केला आणि नाट्यसंगीताच्या पदांमधून वापरल्या जाणार्‍या काहीशा क्लिष्ट भाषेपासून मराठी गीताने फारकत घेतली. उत्तम कविताही संगीतबद्ध होऊ लागली. यशवंत, अनिल, गिरीश, ना.घ. देशपांडे असे कवी गाण्याच्या रूपाने घरोघरी पोहचले.रेडिओ भारतात साधारण 1930 साली आला आणि टीव्ही येईपर्यंत म्हणजे साधारण 1972 पर्यंत - जवळ जवळ चाळीस वर्षं रेडिओने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. गाणारा कलाकार दिसत नसे; पण त्याचा आवाज एखाद्या कुटुंबीयाइतकाच परिचित वाटायचा ! 

टीव्ही आल्यानंतरही रेडिओचा अंमल पुरा उतरला नव्हता; पण कमी झाला. आवाजाला चित्राची जोड मिळाली आणि या श्रवणसंस्कृतीला पहिला मोठा धक्का बसला. गाणं ऐकण्याबरोबर ते पाहणं हा गाणं अनुभवायचा एक अविभाज्य भाग झाला. एकीकडे छायागीत, चित्रहार अशा कार्यक्र मांतून चित्रपटात चित्रित केलेली गाणी दिसायची आणि ‘शब्दांच्या पलीकडले’सारख्या कार्यक्र मांतून प्रत्यक्ष गायक, संगीतकार मंडळी दिसू लागले. आता काय बदललं?आज आपली संगीत ऐकण्याची पद्धत आणि  प्रक्रिया पूर्णत: बदलली आहे आणि याचा परिणाम संगीतनिर्मितीवरही पडताना दिसतो. माध्यमांचा स्फोट झाला. जुनी माध्यमं तर निकालात निघालीच; पण नव्याने येणारी माध्यमंही झपाट्याने कालबाह्य होऊ लागली. सीडी हे माध्यम रुजे रुजेपर्यंंत कालबह्यही झालं होतं. 10-10 गाण्यांच्या सीडीज, तबकड्या, कॅसेट गेल्या आणि हजारो गाणी एमपी थ्री रूपाने छोट्याशा पेन ड्राइव्हवर उपलब्ध होऊ लागली. टीव्हीच्या एकाच वाहिनीची सत्ता संपली आणि  हजारो वाहिन्यांनी आसमंतात गर्दी केली ! याचा परिणाम असा झाला की र्शोत्याचा लक्ष-कालावधी (अटेन्शन स्पॅन) कमी झाला. आता र्शोता अधिक चंचल आणि काही प्रमाणात अधीरही झाला. त्याचं लक्ष वेधून घेण्याकरिता अनेक माध्यमांमध्ये झटापट सुरू झाली.

संगीत ऐकणं हा येता-जाता करण्याचा व्यवहार होऊ लागला. प्रवासात, गाडीत, बसमध्ये, काम करता करता, असं संगीत आता जास्त ऐकलं जातं. शिवाय पूर्वी मित्र किंवा आप्तांबरोबर बसून एकत्र संगीत ऐकलं जायचं ते आता एका इयरफोनवर एकट्याएकट्यानं ऐकू जाऊ लागलं. संगीत ‘शेअर’ करणं म्हणजे फेसबुक किंवा व्हॉट्सअँपवर ! एकत्र  ऐकणे नव्हे ! मैफलींचे ‘इव्हेण्ट’ होऊ लागले तशी फक्त घोषणांच्या पोताचं संगीत जास्त वाजू लागलं. हळुवार - या हृदयीचे त्या हृदयी - असं हितगुज करणारं संगीत ऐकायला मंचच उरला नाही !

आज तुम्ही शहरातल्या एखाद्या कॉफी शॉपमध्ये डोकावलंत तर तुमच्या लगेच लक्षात येईल की, एक नसून चार चार टीव्हीचे पडदे असतात. प्रत्येक पडद्यावर एक वेगळी वाहिनी सुरू असते आणि जे संगीत वाजत असतं त्याचा या चारही पडद्यांवरून दाखवण्यात येणा-या दृश्याशी सुतराम संबंध नसतो. एका अर्थानं आपल्या शहरांच्या स्किझोफ्रेनिक व्यक्तिमत्त्वाचं हे द्योतक आहे. 

पंधरा वर्षांपूर्वी टीव्ही मालिकांमधलं पार्श्वसंगीत आणि आजच्या टीव्ही मालिकांमधलं पार्श्वसंगीत याची आपण तुलना केली तर आपल्या लक्षात येईल की, आजच्या मालिकांमध्ये पार्श्वसंगीताचा वापर वाढलाय. आता एपिसोडमध्ये क्वचितच तुम्हाला एखादी शांत जागा सापडेल. पूर्वी 22 मिनिटांच्या एपिसोडमध्ये 10-14 मिनिटं संगीताचा ऐवज असायचा. आज 22 मिनिटांमध्ये किमान 21 मिनिटं पार्श्वसंगीत वाजतं. कारण प्रेक्षकांचं लक्ष सतत धरून ठेवणं हा अतिरिक्त भारही आता पार्श्वसंगीत सांभाळतंय.गाण्यांचीही तीच गत. गाणं चांगलं आहे की वाईट यापेक्षाही ते लक्षवेधी आहे का याकडे संगीत निर्मात्यांचं लक्ष असतं. याचा परिणाम असा झाला की छोट्या स्वरवाक्यांची आणि हुकलाइन असलेली गाणी जास्त निर्माण होऊ लागली. ज्या स्वरवाक्याची पुन: पुन: पुनरावृत्ती होत राहते त्याला हुकलाइन म्हणतात. उदा. ‘माउली माउली’ किंवा ‘कजरारे कजरारे’ या हुकलाइन्स आहेत. शिवाय तालप्रधान गाणी जास्त बनू लागली. 

आज तुम्हाला उत्तेजित करणारी किंवा उत्तेजित ठेवणारी गाणी जितकी बनतात त्या प्रमाणात तुम्हाला शांत करणारी गाणी कमी तयार होतात याचं कारण हेच.  श्रवणसंस्कृती टिकून राहण्याकरिता जसे प्रयत्न संगीतकार, गीतकारांनी करणं आवश्यक आहे तसं त्यांना एक सकारात्मक साथ ही श्रोत्यांकडूनही मिळायला हवी.  श्रवण ही केवळ एक निष्क्रिय घटना नसून संगीताला दिलेला एक सकारात्मक प्रतिसाद आहे हे आपण कायम ध्यानात ठेवलं तर ही श्रवणसंकृती बहरेल आणि ‘रसिक श्रोते हो’ या शब्दप्रयोगाला पुन्हा एकदा अर्थाची झळाळी प्राप्त होईल !

ksinamdar@gmail.com(लेखक ज्येष्ठ संगीतकार आहेत.)