शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

महाराष्ट्राची खरी ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 06:00 IST

महाराष्ट्राची स्वओळख एकारलेली आहे.  ती सर्वसमावेशक आणि प्रातिनिधिक नाही.  महाराष्ट्राची खरी ओळख करून देण्याची इच्छा  ही या पुस्तकामागील प्रेरणा आहे.

ठळक मुद्दे‘महाराष्ट्र दर्शन’ हा एक पुस्तकप्रकल्प आहे. तो एक पुस्तक-प्रय}ही आहे. हा प्रय} का करावासा वाटला, त्याची ही पार्श्वभूमी.

- सुहास कुलकर्णी

‘महाराष्ट्र दर्शन’ हा एक पुस्तकप्रकल्प आहे. तो एक पुस्तक-प्रय}ही आहे. हा प्रय} का करावासा वाटला, त्याची ही पार्श्वभूमी.महाराष्ट्राचे भौगोलिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्याही किमान पाच-सात भाग पडतात. मुंबई, कोकण, पश्चिम-दक्षिण महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, वर्‍हाड आणि झाडीपट्टी. या विभागांच्या पोटात इतर उपविभाग आहेतच. या भागांचं एकमेकांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष किती आदानप्रदान होतं? उदाहरणार्थ, सोलापूरचे लोक पुण्याशी आणि कोल्हापूरशी भौगोलिक जवळिकीमुळे थोडे जोडलेले असू शकतात; पण ते यवतमाळ-अमरावती किंवा चंद्रपूर-गोंदियाशी किती जोडलेले असतात? कोणी तरी दूरचा नातेवाईक नोकरीमुळे वगैरे तिकडे असेल, तर त्या भागाशी त्यांचे जुजबी संबंध असतात एवढंच. दुसरीकडे, बुलढाणा-परभणी हे विदर्भ-मराठवाड्यातले शेजारी जिल्हे. त्यांच्यात भौगोलिक जवळिकीमुळे संबंध असतात; पण त्यांचा सांगली-कराडशी संबंध येण्याचं कारण काय? त्यांच्या सोयरिकी आपापल्या परिसरात होत असणार, किंवा जास्तीत जास्त त्यांची नोकरी करणारी मुलं-मुली पुण्या-मुंबईत असतील तर ते या भागाशी जोडलेले असणार. पण सांगली-कराडशी त्यांचा जैवसंबंध निर्माण होण्याचं अन्यथा काही कारण नसतं. तळ-कोकणच्या सिंधुदुर्गातल्या माणसांना राज्याच्या दूर पूर्वेकडच्या गडचिरोलीतले आदिवासी कोणती भाषा बोलतात आणि ते काय खातात-पितात हे कळण्याचा काही मार्गच नाही, इतकं त्यांच्यात अंतर असतं. महाराष्ट्रात धुळे-नंदुरबार-नाशिक-पालघर या पट्टय़ाशिवाय मेळघाट (अमरावती) आणि गडचिरोली-गोंदिया भागात आदिवासींची वस्ती आहे. पण त्यातल्या नंदुरबारच्या आदिवासींचा गडचिरोलीतल्या आदिवासींशी किती संबंध येतो, हा संशोधनाचा विषय आहे. गोंड, माडिया, कोलाम या विदर्भातील आणि वारली, भिल्ल, पावरा, कोकणा या उत्तर महाष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमाती आहेत. पण त्यांना आपसातल्या चालीरीती, परंपरा कितपत माहीत असतील, कोण जाणे ! एक वेळ विदर्भातल्या जमातींना आसपासच्या अन्य जमातींबद्दल काही माहिती असेल. तेच धुळे-नंदुरबार नि नाशिक-ठाण्याबाबत लागू असेल. पण दंडकारण्यातील मंडळींना सातपुड्यातील भाईबंदांबद्दल नीट माहिती असण्याची शक्यता अगदीच कमी. आदिवासींनाच आपापसाची माहिती नसेल तर कोल्हापूरच्या ऊसवाल्याला किंवा सांगलीतल्या मध्यमवर्गीय नोकरदाराला ती असण्याची अपेक्षा कुणी का धरावी? शिवाय लोकांना माहिती असतात ती त्या त्या जिल्ह्याचं केंद्र असलेली शहरं. त्या जिल्ह्यातल्या तालुक्यांमधली विविधता, त्यामधला विरोधाभास कुणाला माहिती असतो? उदा. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पीक-पाण्याने समृद्ध भाग असं उर्वरित महाराष्ट्राला वाटतं. पण याच पश्चिम महाराष्ट्रातले आटपाडी, जत, माण, खटाव असे कित्येक तालुके वर्षानुवर्षं पर्जन्यछायेखाली अभावग्रस्त जगणं जगताहेत, याची त्यांना कुठे कल्पना असते?थोडक्यात, भौगोलिक अंतरांमुळे आणि लोक आपापल्या भागांतील सांस्कृतिक वातावरणात रममाण असल्यामुळे बहुतेकांची समज र्मयादित राहते.गेल्या वीस वर्षांत जग बरंच जवळ आलेलं असलं, तरी आपल्याकडे ती प्रक्रिया तेवढीशी वेगवान झालेली नाही. पुण्या-मुंबईच्या लोकांना लंडन-न्यू यॉर्क जवळचं वाटतं; पण ही माणसं अख्ख्या जन्मात धारणी-भामरागड तर सोडाच, हिंगोली आणि बीडपर्यंतही पोहोचू शकत नाहीत. या लोकांना पॅरिस नि बर्लिनमधील गल्ल्या माहीत असतात; पण त्यांना अक्कलकुव्याला सोडलं तर ते स्वत:च्या घरी पोहोचण्याची खात्री कुणी देऊ शकत नाही. जग जवळ येण्याची आपली कथा ही अशी आहे !हा झाला मुद्दा क्रमांक एक : महाराष्ट्रातील लोक एकमेकांपासून सुटे आणि एकमेकांना अनभिज्ञ का आहेत याबद्दलचा. आता मुद्दा क्रमांक दोन मराठी माणसांच्या मनात रुजलेल्या स्वप्रतिमेविषयीचा.महाराष्ट्राचा गौरवाचा काळ म्हणजे शिवकाळ. छत्रपती शिवाजी महाराज हे अखिल महाराष्ट्राचे ऑल-टाइम हीरो आहेत. असा राजा चांद्यापासून बांद्यापर्यंत झाला नाही, असं म्हटलं जातं. खरं तर शिवराय हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशाच्याही इतिहासातले महत्त्वाचे आणि एकमेवाद्वितीय राजे आहेत. अर्थातच महाराष्ट्राचा इतिहास त्यांच्या काळातले गड-किल्ले, सह्याद्रीचे कडे, तोफांचे गडगडाट नि तलवारींचे खणखणाट, तुतार्‍या नि चौघडे, भवानी तलवार, तुळजापूरची आई भवानी आणि शिवकालातील वीरकथांनी भारलेला आहे.महाराष्ट्रावर दुसरा प्रभाव आहे भागवत परंपरेचा, वारकरी संतांचा. या संतपरंपरेमुळे देहू-आळंदीहून निघणारी पंढरपूरची वारी, ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव आणि अन्य महान संत, त्यांचे अभंग; या परंपरेशी नातं जोडलेल्या भीमा, इंद्रायणी वगैरे नद्या; वारकरी संतांनी घडवलेली मराठमोळी वाणी, अशा बाबी मराठी मनामध्ये कायम वस्तीला असतात. त्यामुळेच वारकर्‍यांचा आणि शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा महाराष्ट्र सतत उंचावत असतो. पण आपलं दुर्दैव असं की ज्या भूमीत शिवाजी महाराजांसारख्या थोर राजाने एक मोठा आदर्श घालून दिला, त्या भूमीत इतक्या वर्षांनंतरही त्यांच्या जीवनाचा संदेश काय याबद्दल मतैक्य नाही. याबाबतीत दोन टोकांच्या मांडणींमध्ये महाराष्ट्र विभागला गेलेला आहे. वारकरी परंपरेतील संतांच्या संदेशाच्या वाचनाबाबतही अशीच गोची होऊन बसली आहे. या परंपरेने आपल्याला सामाजिक विषमता, अंधर्शद्धा आणि रूढीदास्य यांपासून मुक्ती मिळवण्याचा मार्ग सांगितला. पण त्याचं आपण काय केलं? सामाजिक संदेशांचं सोडा, आध्यात्मिक संदेशही आपण पुरेसा पचवू शकलेलो नाही.शिवकाळानंतर पेशवाई, देशाच्या स्वातंत्र्याचा लढा आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हे महाराष्ट्राच्या इतिहासातले पुढचे तीन महत्त्वाचे टप्पे. गेल्या सात-आठशे वर्षांच्या या काळावरून ओझरती नजर टाकली, तर आपला इतिहास कमी-अधिक फरकाने सह्याद्रीच्या कुशीत आणि विशेषत: पुण्याच्या आसपास फिरताना दिसतो. किमान तसं सांगितलं तरी जातं. मराठय़ांच्या इतिहासात पेशवाईच्या काळात पुणे हे महत्त्वाचं केंद्र बनलं. पुढे देशाच्या स्वातंत्र्यलढय़ातही लोकमान्य टिळकांमुळे पुणे अग्रभागी राहिलं. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ालाही मुंबईपाठोपाठ पुण्याचंच नेतृत्व लाभलं होतं. प्रबोधनात्मक चळवळीतही लोकहितवादी, महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, आगरकर, विठ्ठल रामजी शिंदे, साने गुरुजी यांच्यामुळे पुण्याचा बोलबाला राहिला. हा सर्व इतिहास पाहता महाराष्ट्राच्या अलीकडच्या इतिहासावर छाप दिसते ती एकाच भूभागाची. पुण्याच्या अवतीभोवतीच्या प्रदेशाची. एखाद-दुसरा अपवाद सोडला तर गौरव-गीतांमधून महाराष्ट्राचं वर्णन असंच दिसतं. सह्याद्रीच्या पलीकडे सातमाळाचे, अजिंठय़ाचे, हरिश्चंद्र-बालाघाटचे आणि महादेवाचे डोंगर आहेत याचा पत्ताच जणू आपल्या कवींना नाही. सह्याद्रीच्या आसपास उगम पावणार्‍या नद्यांपलीकडील तापी, पूर्णा, वैनगंगा, पैनगंगा, वर्धा या नद्यांबद्दल कुणी अभिमानाने सांगायला तयार नाही. अजिंठा-वेरूळ-लोणार या जगप्रसिद्ध आश्चर्यांबद्दल चकार शब्द नाही. जैन, बौद्ध, शीख, मुसलमान, लिंगायत, कबीरपंथी, महानुभाव आदी संप्रदायांच्या मानचिन्हांचा उल्लेखही नाही. असं असेल तर महाराष्ट्राची स्वओळख एकारलेली आहे आणि ती सर्वसमावेशक आणि प्रातिनिधिक नाही, असं म्हणावं लागेल. त्यामुळे महाराष्ट्राची खरी ओळख करून देण्याची इच्छा ही या पुस्तकामागील प्रेरणा आहे. - (ज्येष्ठ पत्रकार सुहास कुलकर्णी यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा संपादित सारांश) महाराष्ट्र दर्शन - समकालीन प्रकाशन