शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

आम्हाला जातीत घ्या..

By admin | Updated: October 14, 2016 15:12 IST

६५ वर्षांपूर्वीची घटना. समाजातील एकाने दुसऱ्या जातीत विवाह केला. बस. तेव्हापासून अनेकांना वाळीत टाकलं गेलं. पंचांसमोर त्यांनी नाक घासलं, ‘चुकलो’ म्हणून माफी मागितली, काहींनी लाखो रुपये दंडही भरला..

 - अरुण वाघमोडे 

६५ वर्षांपूर्वीची घटना.समाजातील एकाने दुसऱ्या जातीत विवाह केला. बस. तेव्हापासून अनेकांना वाळीत टाकलं गेलं. पंचांसमोर त्यांनी नाक घासलं, ‘चुकलो’ म्हणून माफी मागितली, काहींनी लाखो रुपये दंडही भरला..पण काहीही फरक पडला नाही. समाजातल्या कुठल्या कार्यक्रमात गेलं तर त्यांना हाकलून लावलं जातं, घरातल्या मौतीलाही कुणी येत नाही. शिकून सवरूनही या कुटुंबांतल्या मुलींची लग्नं होत नाहीत..मुलांना कोणी मुली देत नाहीत. त्यांचं मागणं अगदी साधं आहे, पण तेही कोणी ऐकत नाही..

 

गोंदा (जि़ अहमदनगर) तालुक्यातील ढोकराई येथील गावकुसाला असलेल्या जोशी वस्तीत भटक्या विमुक्त समाजातील ४०० कुटुंबं गेली अनेक वर्षं वास्तव्यास आहेत़ मजुरी, बाजारात खेळणी विकणे, शेतकऱ्यांची जनावरे सांभाळणे अशी कामे ही कुटुंबे करतात. या वस्तीतील तिरमली (नंदीवाले) जातीतील ३० कुटुंबांना जातपंचायतीने ६० ते ६५ वर्षांपूर्वी वाळीत टाकले आहे. बहिष्कृत केले आहे. इतक्या वर्षांपूर्वीची ही घटना. मुळात त्यांना बहिष्कृत करण्यासारखे काही ठोस ‘कारण’ही नव्हते, पण त्याची सजा त्यांच्या कुटुंबियांना आजही भोगावी लागत आहे. त्याविरोधात मध्यंतरी या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आंदोलनही केले. ‘जिल्हाधिकारी साहेब, आम्हाला जातीत घ्यायला सांगा’ अशी विनवणी त्यांनी केली. काय आहे या कुटुंबांचे म्हणणे? का त्यांना वाळीत टाकले गेले? इतक्या वर्षानंतर आणि आजच्या ‘आधुनिक’ म्हणवल्या जाणाऱ्या काळातही ‘बहिष्कृत’ करण्याची ‘परंपरा’ का सुरू आहे?.. या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी या कुटुंबीयांच्या वस्तीला भेट दिली..त्यांच्याशी बोलल्यावर कळले, तिरमली समाजातील काही मुलांनी इतर जातीतील मुलींशी विवाह केला़ मुळात हे आंतरजातीय विवाह प्रेमप्रकरणातून नव्हे, तर पर्यायच नसल्याने झाले़ पण त्यांना जातीबाहेर लग्न का करावे लागले, त्यालाही मोठ्ठा इतिहास आहे. ६० ते ६५ वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील मंचर या गावातील एका कुटुंबापासून ही कथा सुरू होते. ताराबाई नावाच्या पाच वर्षांच्या मुलीच्या आईने विहिरीत उडी मारून आत्महत्त्या केली़ बाप दारूच्या आहारी गेलेला़ या बापाने पाच वर्षांच्या ताराबाईला धामणगाव (ता़ आष्टी) येथील नंदीवाल्याच्या पदरात टाकले़ पुढे काही वर्षांनी याच ताराबाईसमवेत ढोकराई येथील तिरमली कुटुंबातील बापू गायकवाड या तरुणाने विवाह केला़ ताराबाई दुसऱ्या जातीची होती. ही बातमी तिरमली समाजातील पंचांना समजताच त्यांची जातपंचायत बसली आणि बापू गायकवाड यांच्यासह त्यांच्या नातेवाइकांनाही वाळीत टाकले गेले. या कुटुंबांना वाळीत टाकल्याने त्यांच्याच जातीतील इतरांनी त्यांच्याशी संबंध तोडून टाकले़ पुढे या कुटुंबांतील मुले लग्नाच्या वयात आल्यानंतर त्यांना कुणी मुली द्यायला तयार होईना़ शेवटी भटक्या विमुक्त समाजातीलच, पण इतर जातीच्या मुलींशी विवाह करण्याची वेळ काही मुलांवर आली.. जोशी वस्तीवर भेटलेली सगळी माणसं, बायका ही कहाणी सांगत होत्या. त्यांच्यात ताराबाईही बसलेली होती. तिनंही आपली मंचरपासूनची कहाणी सांगितली. तिरमली कुटुंबातील मुलांनी पुन्हा आंतरजातीय विवाह केल्याने जातपंचायतीतील पंचांचा पारा चढला आणि त्यांच्यावर पुन्हा ठपका ठेवण्यात आला़ जोशी वस्तीतील कुटुंबांशी नातं असलेल्या, पण इतर ठिकाणी वास्तव्यास असलेल्या बारा कुटुंबांनाही पंचायतीने वाळीत टाकलं आहे़ यामध्ये नगर व बीड जिल्ह्यातील कुटुंबांचाही समावेश आहे. कोपरगाव ३, आष्टी १, संगमनेर २, पाटसरा ४, तर शेवगाव येथील २ कुटुंबांना वाळीत टाकले गेले आहे़ या कुटुंबांना पंचायतीने वाळीत टाकल्याने त्यांच्याच जातीतील इतरांनीही त्यांच्याशी साराच संपर्क तोडला आहे. या कुटुंबांतील कुणालाच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी करून घेतले जात नाही़ कोणी कार्यक्रमाला गेले, तर तेथून त्यांना हाकलून लावले जाते़ या कुटुंबांतील कुणाचे निधन झाले, तर त्यांच्या अंत्यविधीलाही कुणी येत नाही़ सर्वात मोठी अडचण म्हणजे या कुटुंबांतील मुला-मुलींशी कुणी नाते जोडत नाही़ या कुटुंबांतील अनेक मुली दहावी, बारावी, तर दहा ते बारा तरुण पदवीचे शिक्षण घेत आहेत़ अनेकांची पक्की घरेही आहेत़ मात्र केवळ जातपंचायतीने बहिष्कृत केल्याने या कुटुंबांतील मुले आणि मुलींची कुठेच सोयरीक जमेना़ यांच्याशी नाते जोडले तर आपल्यालाही पंच बहिष्कृत करतील, अशी या समाजातील लोकांना भीती आहे; तर ज्यांनी या बहिष्कृत कुटुंबांशी नाते जोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना धमकी देऊन नाते तोडण्यास भाग पाडले गेले. पुन्हा जातीत घ्यावे, म्हणून या कुटुंबांनी अनेक वेळा पंचांना विनवणी केली़ पंचांसमोर फक्त म्हणणे मांडण्यासाठी सुरुवातीला दहा हजार रुपये द्यावे लागतात़ नंतर बोलण्याची संधी दिली जाते़ गत ५ सप्टेंबर रोजी पाथर्डी तालुक्यातील (जि़ अहमदनगर) टाकळी मानूर येथे तिरमली समाजाची जातपंचायत भरली़ येथे दहा हजार रुपये भरून ढोकराईच्या कुटुंबांनी पंचांसमोर आपले म्हणणे मांडले़़.‘मायबाप, झालं गेलं विसरून जावा़़़ आम्हाला पुन्ह्यादा तुमच्यात घ्यावा,’ अशी हात जोडून विनवणी केली. पंच म्हणाले, ‘मेलेल्या लोकांना उठवा, त्यांची मढी उकरा, त्यांची हाडं एकत्र करा आन् त्यांच्यासमोर विनवणी करा़ आमच्याकडे पुन्हा यायचं काम नाही.’ आता सांगायचं कुणाला? सरकारकडंच अर्ज, विनवण्या केल्याशिवाय आता पर्याय नाही़ पंचायतीसमोरचा असा अनुभव बहिष्कृत कुटुंबातील तरुण अण्णा गायकवाड सांगत होता. ढोकराई येथील ३० कुटुंबांतील तीन पिढ्यांनी पंचांच्या निर्णयामुळे वाट्याला आलेली उपेक्षा सहन केली़ या कुटुंबांतील चौथी पिढी आता संघर्ष करते आहे़ आम्ही आणि आमच्या आई-वडिलांच्या जन्माच्या आधी घडलेल्या काही घटनांमुळे पंचायतीने वाळीत टाकले, त्यात आमची काय चूक़, असे या तरुणांचे म्हणणे आहे़ पंचायतीच्या या निर्णयाविरोधात आता कायदेशीर मार्गानेच लढा देण्याचा निर्धार या वस्तीत राहणाऱ्या अण्णा गायकवाड, मंगल गायकवाड, सुरेश पालवे, राहुल गायकवाड, चंदर पालवे या सुशिक्षित तरुणांसह गंगाराम गायकवाड, अक्काबाई गायकवाड, नर्साबाई फुलमाळी, मालन पालवे, औसाबाई जाधव या ज्येष्ठ महिलांनीही केला आहे़ तब्बल चौथ्या पिढीला या संघर्षाला सामोरे जावे लागत आहे. जो गुन्हा आपण केलाच नाही, कायद्यानंही ज्याला काहीच आधार नाही अशा ‘गुन्ह्याचा’ जाच या लोकांना सहन करावा लागत आहे. त्यांच्याकडून सारे प्रयत्न थकले. पंचांच्या आणि ज्येष्ठांच्या हातापाया पडून झाल्या, नाक रगडून झालं, पण तरीही त्यांच्या हालअपेष्टांत आणि खड्यासारखं वेचून बाजूला फेकल्याच्या त्यांच्या आयुष्यात काहीच फरक पडलेला नाही. आपल्याच समाजातील लोकांनी वाळीत टाकल्यानंतर, बहिष्कृत केल्यानंतर आता करायचं तरी काय, असा गंभीर पेचप्रसंग त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. कायदा तरी आपल्याला त्यातून वाचवेल का, सोडवेल का याच आशेनं आपल्या जगण्याचा गाडा ते कसाबसा ओढताहेत..जातीत घेण्यासाठी दिले १५ लाख जोशी वस्तीतील एका कुटुंबाला जातपंचायतीने वाळीत टाकले होते़ त्या कुटुंबाला पुन्हा जातीत घेण्यासाठी पंचांनी तब्बल १५ लाख रुपये घेतले़ वाळीत टाकलेल्या ३० कुटुंबांनी जातीत घेण्यासाठी पंचांना तब्बल २० लाख रुपये देण्याचे मान्य केले. पण पंचांनी त्यांना जातीत घेण्याचे मान्य केले नाही, असे जोशी वस्तीतले अण्णा गायकवाड, गंगाराम गायकवाड हे तरुण सांगत होते.मुला-मुलींचा संसार वाढणार कसा?बहिष्कृत केलेल्या गायकवाड, फुलमाळी, पालवे आणि गुंडाळे कुटुंबातील २५ मुली आणि ३० मुले लग्नाच्या वयात आलेली आहेत़ त्यांच्याशी मात्र, या जातीतील कुणी नाते जोडायला तयार नाहीत़ सोयरीकच स्वीकारली जात नसल्याने एका तरुणाने तर भाचीसोबतच लग्न केले. पंचासमोर ही व्यथा मांडली तेंव्हा पंचानी सांगितले, ‘मुलींना विहिरीत ढकलून द्या आणि मुलांना संन्याशी बनवा’. आता आमच्या मुलांचे संसार वाढणार कसे, असा सवाल या कुटुंबातील ज्येष्ठांनी केला आहे़ पंचांच्या विरोधात भूमिका घेतली तर थेट जिवे मारण्याची धमकीही दिली जाते, असा अनुभव येथील तरुणांनी सांगितला़न्यायासाठीचा लढा बहिष्कृत केलेल्या तिरमली कुटुंबातील मंगल गायकवाड ही तरुणी श्रीगोंदा येथील महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत आहे़ लोकअधिकारी आंदोलनाच्या मदतीने तिने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या कुटुंबाची व्यथा मांडली़ या कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकअधिकारी आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड़ अरुण जाधव, प्रमोद काळे व सुभाष शिंदे यांनीही पाठपुरावा सुरू केला आहे. आता कायदेशीर लढाईही सुरू आहे.पंचांची परंपरा नगर जिल्ह्यात तिरमली जातीत नऊ पंच पारंपरिक पद्धतीने जातपंचायत भरवतात़ त्यांच्याकडे हे पंचपद वंशपरंपरेने चालत आलेले आहे़ यातील एखाद्या पंचाचे निधन झाले तर त्याच कुटुंबातील पंचाची नियुक्ती केली जाते़