शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या धगधगत्या आंदोलनातलं जिद्दी आयुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 06:05 IST

हाडं गोठवणारी दिल्लीतली थंडी, आंदोलनकारी शेतकऱ्यांनी तिथेच आपली पालं ठोकलेली. कोणी पुलाखाली, कोणी रस्त्याच्या कडेला.. शेकोटी पेटवून कशीबशी रात्र काढायची. उपाशी लोकांसाठी कोणी लंगर लावलेला, कोणी भाजीपाला पाठवलेला.. तेवढ्या वेळातही आपल्या मुलांचं ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या बायका.. असा सारा इथला माहौल..

ठळक मुद्देउत्तर प्रदेशाच्या पश्‍चिमेकडचं मेरठ, मुजफ्फरनजर, सहारनपूर, आग्रा, मथुरा, अलीगढमधले काही जिल्हे आणि उत्तराखंडाच्या सखल प्रदेशातून लहानमोठे शेतकरी गेले पंधरा दिवस इथं ठिय्या ठोकून आहेत. शेतीवरचं संकट हा सगळ्यांच्याच वेदनेचा विषय!

-नितीन अग्रवाल व एस.के. गुप्ता

दिवस भर थंडीचे, त्यातही दिल्लीतल्या... आणि हाडं गोठवणार्‍या या गारठ्यात शेतकर्‍यांचं आंदोलन चालूय. राजकीय वाटाघाटींचा पारा थंडीसारखाच टिपेला पोहोचलेला. दिल्लीपर्यंत पोहोचणार्‍या प्रत्येक लहान-मोठ्या रस्त्यांवर शेतकर्‍यांनी आपली पालं ठोकलेली आहेत. उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या गाझीपूरच्या सीमेवर तर हा गलबला जरा जास्तीच आहे. हायवे, फ्लाय ओव्हर जिथं जागा दिसते तिथं दिवस-रात्र कशाची तमा न बाळगता आंदोलक शेतकर्‍यांचे जथ्थे जमत आहेत. कायद्यावर उलटसुलट चर्चा होऊन आंदोलनाची दिशा ठरते आहे. गारठ्याचा बोचरेपणा वाढला की जागा मिळेल तशी शेकोटी पेटवायची नि रात्र काढायची ! कुणी टेम्पो-ट्रकात, कुणी फ्लायओव्हरच्या खाली, कुणी रस्त्याच्या कडेला मिळेल.. तशी ताडपत्री किंवा चादरी टाकून तात्पुरता निवारा उभारला आहे. त्यात मिळेल तशी बसल्या बसल्या किंवा उभ्याउभ्या डुलकी काढायची आणि आखडलेली कंबर जरा सरळ करून घ्यायची. जे किडुकमिडुक सामान आहे त्यातच सकाळचा चहा, दुपार-रात्रीचं जेवण कसंबसं आटपायचं.

गाजीपूरमध्ये सुमारे पंधरा दिवस दिसत आलेलं हे दृश्य थोडं वेगळं आहे. इथं धावत्या शहरांचा दिसतो तसा चमकधमकवाला माहौलही आहे आणि लहान गावांमध्ये आढळणारा साधेपणाही आहे. एका बाजूला गाझियाबाद व नॉयडाच्या थेट आकाशाशी स्पर्धा करणार्‍या उंच राहात्या नि ऑफिसेसच्या इमारती, तर दुसर्‍या बाजूला कडाक्याच्या थंडीत आपली शेती वाचवण्यासाठी, ‘काळ्या’ कायद्यांना रद्द करावं ही मागणी घेऊन जिवाच्या करारानं संघर्ष करणारे शेतकरी. त्यांचे रस्त्याकडेचे, पुलांखालचे, ट्रॅक्टरट्रॉल्यांमधले धुळीनं माखलेले तात्पुरते निवारे! शेतकरी नेत्यांच्या भाषणासाठी उभारलेले लहानमोठे मंच नि सतत बदलत राहाणारी तिथली वर्दळ. राजकीय पेच नि खाचाखोचांच्या बदलत्या सोंगट्यांमुळं एखाद्या नव्या नेत्याचं आंदोलनाच्या ठिकाणी आगमन होतं तेव्हा डीजे वाजतो... वातावरणातला ताण त्या दणक्यामुळं किंचितसा हलका होतो, इतकंच.

सिंधू बॉर्डरजवळ थोड्याफार फरकानं हेच चित्र. तिथं बायकापोरांची संख्या विलक्षण आहे. विचारलं तर बायका सांगतात, ‘सगळंच हातचं जायची वेळ आली तेव्हा आम्ही घरी बसलो होतो असं कसं सांगू शकणार पुढच्या पिढ्यांना. जर हा संघर्ष दीर्घकाळ चालला तर मुलांना कळायला नको हे? आयुष्यावरच बेतलंय तर मागं राहाणार कसं?’ भविष्यात पोटासाठी मजुरीची वेळ येऊ नये व शेतकर्‍यांचा हक्क नि सुरक्षितता जपली जावी म्हणून खडा आवाज लावायला लागतो याचं शिक्षण मुलांना देऊ पाहणार्‍या आईबापाच्या कळकळीची कल्पनाच करता येईल ! प्रचंड संख्येनं जमलेल्या आंदोलनकर्त्यांची पोटाची सोय म्हणून इथं लंगर सुरू झालाय.

तिथल्या कामाचं वेळापत्रक जसं या बायांनी सांभाळलंय तसंच मुलांच्या ऑनलाइन अभ्यासाचंही त्या बघताहेत. आजूबाजूचे मोठे शेतकरी रेशन नि भाजीपाला धाडताहेत. इथं काही ‘नाट्य’ घडायला नको म्हणून पोलिसांचे ७५० घोडेस्वार तलवारी घेऊन सज्ज आहेत. श्रमलेल्या शेतकर्‍यांचं मनोरंजन म्हणून ते दिवसभरात कधीतरी तलवारबाजी करून दाखवतात. संत निरंकारी समुदायानं आंदोलनस्थळी वैद्यकीय उपचारांची सज्जता ठेवलेली आहे.

जात, धर्म, पंथ, लहान-थोर असा कुठलाच भेद या गर्दीला शिवत नाही. उत्तर प्रदेशाच्या पश्‍चिमेकडचं मेरठ, मुजफ्फरनजर, सहारनपूर, आग्रा, मथुरा, अलीगढमधले काही जिल्हे आणि उत्तराखंडाच्या सखल प्रदेशातून लहानमोठे शेतकरी गेले पंधरा दिवस इथं ठिय्या ठोकून आहेत. शेतीवरचं संकट हा सगळ्यांच्याच वेदनेचा विषय!

देशाचं पोट चालवणार्‍या अन्नदात्या या शेतकर्‍यांच्या कहाण्या इतक्या त्रासदायक की ऐकूनही घायाळ व्हावं. दलपत सिंग नि त्यांच्या भावाच्या वाट्याला आलेल्या अवघ्या १७ बिघा जमिनीच्या तुकड्यावर त्यांचं अकरा जणांचं कुटुंब कसंतरी गुजराण करतं. फेब्रुवारीत मुलीचं लग्न ठरलेलं; पण हुंड्यापायी मोडलं.

आयटी कंपनींच्या नि कॉलसेंटर्सच्या उंच चकचकीत इमारतींकडं डोळे वळवून अलीगढहून आलेले फहीम सांगतात, उद्योगपती नि सरकार खिसे भरतात खरंय; पण तुमचं पोट कोण भरतं? शेतकरीच ना? माझ्या पोरानं तीन वर्षांपूर्वी एमबीबीएसची एन्ट्रन्स दिलेली. रँक थोडक्यात हुकली. आता खाजगी कॉलेजात प्रवेश घ्यायचा तर दहा लाख मागतात. रक्कम मी उभी करू शकलो नाही, बँकेनं लोन दिलं नाही. संधी हुकली!

सावकार असो की बँका, शेतकर्‍याच्या जिवावरच चालतात; पण अडचणीच्या वेळी हातात जमिनीचा तुकडा असेल तर तोच विकून नड भागवावी लागते. आईच्या बायपास ऑपरेशनच्या तीन लाखांची सोय तशीच केली कारण बँक म्हणाली, आधी पहिलं चुकतं करा.

हापुडचे रामकिशन म्हणतात, शेती म्हणजे घाट्याचा सौदा झालाय. ११ गुंठे जमिनीत कुटुंबाचं भागत नाही. चारपैकी एकही मुलगा शेती करू म्हणत नाही. सगळं विका, आम्ही नोकर्‍या शोधतो म्हणतात. किती दिवस वाचवणार मी जमिनीचा तुकडा?

जाहिरातीत फुललेली शेती दाखवून शेतकर्‍याच्या सुखाची द्वाही फिरवतात; पण वास्तवात शेतकऱ्याच्या हालांना सीमा उरलेली नाही. त्यानं शेती सोडावी अशीच परिस्थिती तयार केली जातेय. शेतकर्‍यानं जमीन पिकवली नाही तर तुमचे पिझ्झाबर्गर नि चिप्ससुद्धा असणार नाहीयेत. काय घालणार पोटात?

शेतीमाती न कळणार्‍या माणसांनी बंद खोलीत बसून शेतीबद्दल अन्यायकारी निर्णय घ्यावेत नि प्रत्यक्ष राबणार्‍यांनी ते मान्य करावेत हे कसं चालेल? हा सगळ्यांचाच सवाल आहे. आम्ही खलिस्तानी अन्नदाता शेतकरी आंदोलक आहोत, टेररिस्ट नव्हे ! आमची भाकरी, जमीन आणि पगडी वाचवायला रस्त्यावर उतरलो आहोत... न्याय मिळाल्याशिवाय आता हटणार नाही.

(लेखक दिल्ली लोकमतचे प्रतिनिधी आहेत.)