- डॉ. एम.आर. रमेश कुमार
उर्वरित जगाची कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे तगमग होत असताना मॉन्सूनचे वारे भारतीय उपखंडासाठी पावसाचे आश्वासक वरदान घेऊन येतात. मे ते ऑक्टोबर या काळात उपखंडातल्या उत्तर भागात आणि आसपासच्या प्रदेशात तापमान भलतेच वाढलेले असते. त्यामुळे तिथे कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असतो, त्याचवेळी किनारपट्टीनजीक समुद्रसपाटीवरील शीतलतेमुळे उच्च दाबाचा पट्टा तयार होतो. वारे नेहमीच उच्च दाबापासून कमी दाबाच्या दिशेने धाव घेत असतात. ते आपल्यासोबत भारतीय महासागराच्या दक्षिण क्षेत्रातली आद्र्रताही वाहून नेतात. विषुववृत्त पार करताच ते पश्चिमगामी होत भारतीय उपखंडाची वाट धरतात. अर्थातच सोबत मुबलक पाऊस असतो.मूलत: मॉन्सून याचा अर्थ दरवर्षी होणारा वार्यांचा दिशाबदल, मात्र सामान्य माणूस या घटनेकडे आपल्या गरजांच्या पूर्ततेच्या कोनातून पाहात असतो, पिण्यासाठी, शेतीकामासाठी आणि वीज निर्माणासाठी त्याला पाण्याची आवश्यकता भासत असते. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात भारतातला 75 टक्के पाऊस आणणारे मॉन्सूनचे वारे या देशाच्या अर्थव्यवस्थेचे वर्तमान निश्चित करत असतात. एखादे वर्ष कमी पावसाचे किंवा अवर्षणाचे निघाले तर देशाच्या अर्थव्यवस्थेत हाहाकार माजू शकतो.प्रत्येक मॉन्सूनची स्वत:ची अशी वैशिष्ट्ये असतात; पण साधारणत: केरळच्या किनार्यावरले त्याचे आगमन, 122 दिवसांच्या मोसमातला चढउतार आणि उपखंडातल्या 36 पूर्वनिर्दिष्ट उपविभागातले एकंदर पर्जन्यमान यावरून दरेक मोसमाचे महत्त्व अधोरेखित होत असते. पाऊस आणि महासागरपॅसिफिक समुद्राच्या विषुववृत्ताकडील क्षेत्रात निर्माण झालेली उष्णता ‘एल निनो’च्या निर्मितीला हातभार लावत असते. याउलट ‘ला निना’ची निर्मिती शीतलतेतून होत असते. एल निनोच्या प्रभावक्षेत्रात आता सारे जगच येऊ लागले आहे. त्यात आता भर पडलीय ती ‘एल निनो मोडकोई’ या आणखीन एका अनोख्या घटनेची. पॅसिफिकच्या उष्ण कटिबंधातील भागात उद्भवणार्या एल निनो मोडकोईची वैशिष्ट्ये एन निनोपेक्षा बरीच वेगळी असतात. पॅसिफिकच्या मध्यवर्ती क्षेत्रात उष्णता तर किनार्याच्या भागात शीतलता असे परस्परविरोधी तापमान येथे निर्माण होत असते. भारतीय महासागरात समुद्रसपाटीच्या तापमानात प्रचंड बदल होऊ लागतात, ज्याला इंडियन ओशन डायपोल (आयओडी) असे संबोधले जाते. महासागराच्या पश्चिम क्षेत्रात सरासरीपेक्षा कितीतरी प्रमाणात तापमान वाढते व बाष्पीभवनाची प्रक्रियाही गतिमान होते, तर पूर्वेकडील क्षेत्रात तापमान बरेच खाली येते. परिणामत: इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या समुद्रसान्निध्य असलेल्या भागात दुष्काळ पडतो. कधीकधी याच्या अगदी उलट परिस्थिती निर्माण होते. पूर्वेकडे तापमान वाढून बाष्पीभवनाची प्रक्रिया वेग घेते तर पश्चिमेकडे शीतल तापमानाचा अनुभव येतो. या दोन्ही प्रक्रिया कधी घडून येतील, याचे अनुमान काढता येत नसते. या प्रक्रियाच शेवटी भारतीय उपखंडात किती पाऊस पडेल याची निश्चिती करत असतात.आपल्याकडला पाऊस एल निनोने प्रभावीत आहे का?2018च्या शिशिर ऋतूदरम्यान एल निनो मोडकोईचा उद्भव झाला आणि त्याचा प्रभाव जुलै 2019पर्यंतच्या भारतीय उपखंडातल्या पावसावर पडला. 2019च्या जून महिन्यातला पाऊस सरासरीपेक्षा कमी होता. जुलैनंतर भारतीय महासागराचे उष्ण कटिबंधातील क्षेत्र सकारात्मक आयओडीच्या प्रभावाखाली आले. पर्जन्यकालाच्या सुरुवातीचा एल निनो मोडकोईचा प्रभाव आणि नंतर सकारात्मक आयओडीचा प्रभाव यामुळे गतवर्षी अनेक वादळांचा सामना करावा लागला. यातली दोन वादळे (वायू : 10 ते 17 जून) व हिक्का (22 ते 25 सप्टेंबर) अरबी समुद्रात होताना आपण अनुभवली. गतवर्षी केरळात मॉन्सूनचे आगमन झाले 8 जून रोजी. पण वायू वादळामुळे मॉन्सूनचे अभिसरण शिथिल झाले व त्यामुळे 1 ते 18 जूनदरम्यानच्या कालावधीत एरवीपेक्षा 45 टक्के कमी पाऊस झाला.यंदाच्या मोसमात केरळात मॉन्सून दाखल झालाय 1 जून रोजी. त्याच दरम्यान तयार झालेल्या निसर्ग वादळाचा परिणाम 3 जूनपर्यंत दिसला. पण त्यामुळे मॉन्सूनची गती मंदावली व गोव्यात तो 11 जून रोजी पोहोचला. एरवीची गोव्यात येण्याची त्याची तारीख साधारणत: 5 किंवा 6 जून असते.यंदा तापमानात विशेष चढउतारांविना आहे तसेच राहाण्याची आणि परिणामी जून ते ऑगस्टदरम्यान नेहमीच्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता 60 टक्के असून, ला निनाच्या प्रभावाची शक्यता 30 टक्के तर एल निनोच्या प्रभावाची शक्यता 10 टक्के असल्याचे अनुमान काढण्यात आले आहे. विविध मॉडेल्सच्या आधारे व्यक्त होणारे अंदाज सप्टेंबर- नोव्हेंबर दरम्यानही पूरक पाऊस पडेल असेच सुचवताहेत. तसे पाहिल्यास पॅसिफिक महासागरात ला निना अवतरणे म्हणजे भारतीय उपखंडात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणे.
(लेखक गोव्यातील राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेत गेली अनेक वर्षे संशोधक- शास्रज्ञ म्हणून कार्यरत होते. प्रमुख शास्रज्ञ पदावरून ते हल्लीच निवृत्त झाले आहेत.)