- सचिन जवळकोटे
चंद्रभागा नदीवर विसावलेली पंढरी इतिहासात प्रथमच ‘चैत्री’नंतरचा ‘आषाढी’ सन्नाटा अनुभवतेय. घाटावरच्या पायर्याही एवढा शुकशुकाट पहिल्यांदाच पाहताहेत. खरंतर, आषाढी एकादशीची आदली रात्र कशी भारावलेली असायची. वारुळात मुंग्या जमाव्यात तशी लाखोंची गर्दी पंढरीत व्हायची. दुसर्या दिवशीची सायंकाळही कशी वेगावलेली असायची. मधाच्या पोळ्याला धक्का लागल्यानंतर मधमाशा जशा झप्कन बाहेर पडाव्यात, तशी हीच गर्दी पुन्हा आपापल्या गावाकडे झेपावयाची. एकादशी अवघ्या एक दिवसाची; मात्र वारीचा माहोल राहायचा तब्बल वीस-पंचवीस दिवसांपर्यंतचा.यंदा या वारीचं सारं वर्णन भूतकाळात लिहिण्याची वेळ आणलीय कोरोनानं. ‘फिजिकल डिस्टन्स’नं. होय. चैत्री वारीनंतर आषाढी यात्राही रद्द झाल्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा अन् मध्यप्रदेशातील लाखो वारकर्यांच्या काळजाचा जणू ठोका चुकलाय. गेल्या तीन महिन्यांपासून पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिराचा दरवाजा भाविकांसाठी बंद झालाय. ‘उघड दार देवा आता SS’ ही वारकर्यांची आर्त हाक अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणतेय.खरंतर महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा यंदा खंडित झाली, एवढय़ापुरताच हा विषय इथं संपत नाही. पंचवीस दिवसांतल्या वारीच्या उत्पन्नातून वर्षभराचा संसार चालविणारी हजारो कुटुंबंही यंदा उद्ध्वस्त होत चालली आहेत. कारण आषाढी एकादशी यात्रा ही पंढरीत साजरी होत असली तरी देहू-आळंदी ते पंढरपूरपर्यंतच्या मार्गावरील कैक गावांमध्येही होत असते लाखोंची उलाढाल. दीड लाख वारकर्यांपासून सुरू झालेली वारी पंढरपुरात पोहोचते, तेव्हा तो आकडा गेलेला असतो बारा लाखांच्या घरात. या पंचवीस दिवसांतली उलाढाल असते शंभर कोटींपेक्षा अधिक.केवळ दोन जोड कपडे घेऊन वारकरी घरातून निघतो. गुरफटलेल्या संसारातून बाहेर पडण्याची ‘तुका गाथा’ ऐकत-ऐकत चालू लागतो. भौतिक भोगातून आत्मिक सुखाकडे नेणारी ‘ज्ञानेश्वरी’ वाचत तो पुढं वाटचाल करू लागतो. मात्र त्या बिचार्यालाही कदाचित माहीत नसतं की, आपण जसं एक गाव मागं टाकत जातोय, तसं हजारो लोकांचा संसार आर्थिक स्थैर्यानं फुलत जातो.
कधी काळी गल्ल्यात लाखो रुपयांच्या नोटा दाबून-दाबून भरणारे हात सध्या एका हिरव्या नोटेलाही मोताद झाल्याची वेदना अनेकांच्या डोळ्यांत तरळत होती. पुढे महाद्वार रोडवर भेट झाली धनंजय लाड यांची. ते अगरबत्त्यांचे व्यापारी. शंभर वर्षांपेक्षाही अधिक काळ त्यांचं घराणं याच व्यवसायात. पणजोबांनी इथं दुकान टाकलेलं. ते माहिती देऊ लागले, ‘पूर्वी रोज पंधरा ते वीस हजारांचा व्यवसाय व्हायचा. एकादशीला तर दोन लाखांच्या खाली कधीच नाही. पंढरपूरच्या मसाला अगरबत्तीला अख्ख्या देशभरातून मागणी. खूप वेळ जळत राहणारी. हालमड्डी नावाची जंगली जडीबुटी त्यात वापरली जाते. ही अगरबत्ती आम्ही घराच्या पाठीमागंच कारखान्यात तयार करतो. कामाला सार्या बायकाच. एक बाई दिवसाला हजारो अगरबत्त्या तयार करायची. इथल्या प्रत्येक व्यापार्याचा स्वत:चा असा ब्रॅण्ड. मात्र यंदा सारेच झालेत बेकार. महाराष्ट्रातल्या सार्याच यात्रा यंदा रद्द झाल्यानंतर आमचा माल इथंच पडून.’धुरकटलेल्या भविष्याचा शोध घेत ही अगरबत्तीवाली मंडळी वारकर्यांच्या प्रतीक्षेत निवांत बसलेली. अशीच अवस्था पंढरीतील या सार्याच व्यापार्यांची. यंदा इथले साखर-फुटाणे कडवट झालेत तर मूर्तिकारांच्या मूर्तीही खर्या अर्थानं निर्जीव ठरल्यात. जिथं महाराष्ट्रातलं सर्वात मोठ्ठं ‘देऊळ बंद’ झालंय, तिथं मूर्तींसाठी नवी मंदिरं कधी तयार होणार? प्रश्नच प्रश्न. भक्तीच्या महापुराची सवय झालेला हा प्रदक्षिणा मार्गही सन्नाटाच्या वाळवंटाला पुरता सरावलेला. पुढं जाताना कुठल्या तरी अर्धवट बंद असलेल्या दुकानातून एक गाणं ऐकू येऊ लागलेलं, ‘नको देवराया SS अंत आता पाहू.’
ठप्प1. आषाढी एकादशी यात्रा ही पंढरीत साजरी होत असली तरी खरं अर्थकारण फिरतं ते वारीच्या मार्गावर!2. देहू-आळंदी ते पंढरपूरपर्यंतच्या मार्गावरील कैक गावांमध्ये दरवर्षी लाखोंची उलाढाल होते.3. दीड लाख वारकर्यांपासून सुरू झालेली वारी पंढरपुरात पोहोचते, तेव्हा तो आकडा जातो बारा लाखांच्या घरात!4. आषाढी एकादशी एक दिवसाची; पण वारीचं अर्थचक्र तब्बल वीस-पंचवीस दिवसांचं असतं.5. या काळात शंभर कोटींपेक्षा अधिक उलाढाल होते!- यावर्षी हे अर्थचक्र पूर्ण ठप्प आहे!!
sachin.javalkote@lokmatil.com(लेखक लोकमतच्या सोलापूर आवृत्तीचे निवासी संपादक आहेत.)
छायाचित्रे : संकेत उंबरे, पंढरपूर