‘कोरोना’ची तयारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 06:01 AM2020-03-22T06:01:00+5:302020-03-22T06:05:02+5:30

महाराष्ट्रात कोरोनाची लागण सुरू झाल्याच्या  बातम्या येऊ लागल्या तसे राज्य सरकार  किती पातळ्यांवर काम करत होते  याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.  कोणत्याही सामान्य माणसाने थक्क व्हावे  एवढे काम या काळात आपल्या सगळ्या यंत्रणांनी केले. तरीही काही ठिकाणी त्रुटी आहेत, त्या सुधाराव्या लागतील, कमतरता तातडीने दूर कराव्या लागतील, नागरिकांनाही अधिक जबाबदार व्हावे लागेल, तरच या संकटाचा सर्मथपणे मुकाबला करता येईल.

Preparing for 'Corona'!.. | ‘कोरोना’ची तयारी!

‘कोरोना’ची तयारी!

Next
ठळक मुद्देलोकांनी जबाबदारी पाळली नाही तर मात्र सरकारला अवघे राज्य बंद करावे लागेल अशी स्थिती आहे.

- अतुल कुलकर्णी 

सुरुवातीला किरकोळ वाटणार्‍या कोरोना व्हायरसनं सगळीकडेच आपले पंजे आणखी आवळायला सुरुवात केली आहे. त्याच्याशी लढायचे असेल तर तिसरा आणि चौथा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यातून उदभवलेल्या ‘कोविड- 19’ या आजाराच्या आज आपण दुसर्‍या टप्प्यात आहोत. जे लोक परदेशातून आले आणि त्यांना या आजाराची लक्षणे दिसून आली, त्यांना संसर्ग झाला तो या आजाराचा पहिला टप्पा. अशांच्या सहवासात आल्यामुळे परदेशात न जाताही ज्यांना हा आजार झाला तो दुसरा टप्पा. महाराष्ट्राने हे दोन टप्पे जवळपास पूर्ण केले आहेत. तिसरा टप्पा जास्त घातक आहे. परदेशातून आलेल्या प्रवाशांच्या सहवासात आल्यामुळे ज्यांना आजार झाला ते लोक इतरत्र फिरू लागल्याने त्यांच्यामुळे इतरही अनेकांना हा आजार झाला, जनतेमधून असे रुग्ण आढळून येऊ लागले तर तो या आजाराचा तिसरा टप्पा. सुदैवाने आपण अजून त्या टप्प्यात पोहोचलो नाहीत; पण सध्या आपल्याकडे जे सुरू आहे ते धक्कादायक आहे. (लेखात शहरांची आणि व्यक्तींची नावे मुद्दाम वगळली आहेत.) 
एक प्राध्यापिका नुकत्याच दुबईहून आल्या. त्यांना कोरोनाची लक्षणे दिसत असतानाही त्यांनी कोणालाही न सांगता, त्यांच्या कॉलेजला भेट दिली. सगळ्यांशी गप्पा मारल्या. नंतर त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. 
एक आजी परदेशातून आल्या. कौतुकाने सगळ्या नातेवाइकांना ट्रिप कशी झाली हे सांगत सुटल्या. नंतर कळाले की त्या कोरोना पॉझिटिव्ह आहेत. एक ज्येष्ठ दांपत्य फ्रान्सहून आले. विमानात त्यांना त्यांचे वय लिहायला सांगितले. ते ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांना तीन दिवस क्वारंटाइनमध्ये पाठविण्यात आले. तेथून ते सुखरूप परत आले, मात्र त्यांच्या विमानात त्यांच्याबरोबर जे इतर प्रवासी होते, ते मात्र कोणतीही तपासणी न करता राज्यात सर्वत्र फिरत आहेत. 
एक प्रवासी लंडनहून आला. विमानतळाहून टॅक्सी करून तासभर दूर असलेल्या एका भागात गेला. तेथून दुसर्‍या दिवशी घरगुती समारंभासाठी रेल्वेने दुसर्‍या शहरात गेला. समारंभ आटोपून, नातेवाइकांना भेटून परत त्याच्या मूळ शहरात रेल्वेने आला. परदेशातून आलेल्या प्रवाशांची ही काही प्रातिनिधिक उदाहरणे. 
दुसरा प्रकार स्थानिक पातळीवरचा. राज्य शासनाने संसर्ग टाळण्यासाठी म्हणून शाळा, महाविद्यालयांना सुट्या दिल्या. तरीही अनेक विद्यार्थी गल्लोगल्ली भटकत होते, गाड्यांवर भेळ खात फिरत होते. काही प्राध्यापक, शिक्षक बंद हॉटेलसमोर खुच्र्या टाकून गप्पा मारत चहा पीत बसल्याचेही दिसले. अनेक गावांमध्ये आजही आठवडी बाजार भरगच्च गर्दीने भरलेले आहेत. गरज नसताना अनेक लोक उगाचच इकडे-तिकडे फिरताना दिसत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला उद्देशून संदेश दिल्यानंतरही यात फारसा फरक पडलेला दिसला नाही. कोरोनाच्या तिसर्‍या टप्प्यात जर आपण गेलो तर त्याला आपणच जबाबदार असू. आपल्या दुराग्रही आणि हटवादी भूमिकेमुळे आपण अवघे राज्य धोक्यात आणत आहोत याचा विचारही अनेकांच्या मनाला शिवत नाही, हे त्यापेक्षा जास्त गंभीर आहे.
देशात 200 च्या आसपास रुग्ण आढळून आलेले आहेत. मात्र या आजारावर उपचार सांगणार्‍यांची संख्या करोडोंच्या घरात गेली आहे. व्हॉट्सअँप विद्यापीठाचे विद्यार्थी मोकाटपणे ज्ञान वाटत सुटले आहेत. या आजाराची सोशल मीडियातून अत्यंत हिणकस थट्टा सगळ्यांनी चालविली आहे. जर का हा आजार वाढला तर तो किती आक्राळविक्राळ रूप धारण करेल याची कल्पनाही यातल्या कोणाला नाही. इटलीसारख्या देशाने आधी सरकारी सूचनांकडे दुर्लक्ष केले. त्यातून काही हजार लोकांचे जीव गेल्यानंतर हा देश सावरला. आता सरकारी सूचनांचे तंतोतंत पालन तिथले लोक करत आहेत. आपणही तीच वेळ आपल्यावर आणायची का, हा खरा प्रश्न आहे.
सरकार पातळीवर नेमके काय घडत होते.?
राज्यात कोरोना व्हायरसवर नियंत्रण ठेवण्याची सुरुवात कशी झाली हे जाणून घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. विधिमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोरोनाच्या बातम्या येत होत्या. गर्दीपासून काळजी घेतली पाहिजे असे सांगण्यात येत होते, मात्र विधानभवनातून मंत्र्यांना चालताही येणार नाही एवढी गर्दी होती. अधिवेशन लवकर संपवावे, अशी मागणी सगळे करत होते. अधिवेशन गुंडाळले तर राज्यात भीतीचे वातावरण पसरेल अशा शंका होत्या. अधिवेशन 20 मार्चपर्यंत चालवायचे ठरले. तशी घोषणा झाली. मात्र त्याचदरम्यान एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला. आपली आरोग्य यंत्रणा जर अधिवेशनाच्या कामातच अडकली तर शासकीय यंत्रणेवर ताण पडेल असे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही ‘आपण कामकाजच करत बसलो तर उशीर होईल आणि मग वेळ हातातून निघून गेलेली असेल’ असे सर्वपक्षीय बैठकीत स्पष्टपणे सांगितले. 
शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशा बड्या नेत्यांची चर्चा झाली आणि अधिवेशन 14 मार्च रोजीच संपवण्यात आले. 
‘अधिवेशन जर 20 मार्चपर्यंत चालले असते तर ज्या गोष्टी सरकारने गेल्या सात दिवसांत केल्या, त्या करता आल्या असत्या का’, असा प्रश्न विचारल्यावर टोपे म्हणाले, ‘आता त्यावर बोलून कोणाला दोषी ठरवणे योग्य नाही; पण आम्ही पूर्ण ‘अँक्शन’मध्ये आहोत. परिस्थिती आजतरी नियंत्रणात आहे..’
महाराष्ट्रात जेव्हा कोरोनाची लागण सुरू झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या तसे राज्य सरकार किती पातळ्यांवर काम करत होते याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही सामान्य माणसाची मती गुंग व्हावी एवढे काम या दहा ते बारा दिवसांत आपल्या सगळ्या यंत्रणांनी केले आहे. अनेक पातळ्यांवर कामे सुरू असताना कोणत्यातरी एका विभागाने यात लीड, पुढाकार घेणे आवश्यक होते. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाने लीड घ्यायचे ठरले. मात्र राज्याच्या सगळ्या विभागांमध्ये हस्तक्षेप करण्याचे अधिकार त्या विभागाला पाहिजे होते. त्यासाठी काय करायचे अशी चर्चा सुरू असताना ‘साथरोग अधिनियम 1897’ या 123 वर्षे जुन्या कायद्याची आठवण काही अधिकार्‍यांनी करून दिली.
हा कायदा तातडीने अंमलात आणण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आधी विरोध होता. त्यांचे म्हणणे होते की यामुळे अधिकार्‍यांना व सरकारला अर्मयाद अधिकार मिळतात. त्यामुळे त्याचा दुरुपयोग झाला तर.? मात्र तो होणार नाही याची खात्री पटल्यावर त्यांनी त्यास मान्यता दिली. हा कायदा आपल्याकडे होता; पण त्याची कधी गरजच पडली नाही म्हणून त्या कायद्याच्या अंमलबजावणीचे नियमच तयार केलेले नव्हते. मान्यता मिळताच सरकारने तातडीने त्याचे नियम तयार केले आणि 14 मार्च रोजी ते प्रकाशित केले. कायदा अंमलात आला. आता सरकार त्याआधारे काहीही करू शकते. अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊ शकते. मात्र लोकांना अप्रिय वाटणारे निर्णय न घेता गेले काही दिवस मुख्यमंत्री ठाकरे सतत स्वत:हून ‘घरी बसा’ असे आवाहन लोकांना करत आहेत. लोकांनी ते ऐकले नाही तर मात्र सरकारला अवघे राज्य बंद करावे लागेल अशी स्थिती आहे. 

पहिल्यांदाच घडताना..
कोणतीही नैसर्गिक, सामाजिक आपत्ती निर्माण झाली की प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता, मंत्नी सतत बोलताना दिसतो. कोरोनाच्या आपत्तीनंतर मात्र महाराष्ट्रात पहिल्यांदाच एक चित्न स्पष्टपणे दिसले ते म्हणजे कोणीही, कुठेही, उगाचंच बडबड करताना दिसत नाही. ज्या त्या खात्याचे मंत्नी फक्त आणि फक्त आपल्याच खात्यापुरती विधाने करताना दिसत आहेत. एकमेकांच्या कामात हस्तक्षेप करताना ते दिसत नाहीत आणि त्याचबरोबर कुठेही, कसेही फिरताना ते दिसत नाहीत. विरोधकदेखील ज्या संयमाने शांत बसलेले आहेत ते पाहता या सर्व गोष्टी नक्की वाखाणण्याजोग्या आहेत. राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी किती संयमाने वागले पाहिजे याचा हा वस्तुपाठ महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही घालून दिला आहे. अर्थात, याला काही अपवाद आहेतच. देवेंद्र फडणवीस सत्तेत असते तर ते अभ्यास करत बसले असते अशी पोरकट विधाने सोशल मीडियातून सुरुवातीला फिरवली गेली, तर उद्धव ठाकरे यांना प्रशासनाचा अनुभव नाही, ते परिस्थिती हाताळू शकत नाहीत अशी विधाने भाजपच्या जबाबदार आमदाराने केली. ही वेळ लढाईची आहे, आपापसातील राजकीय शत्नुत्व दाखवण्याची नाही, सगळ्यांनी थोडा संयम बाळगला तर या परिस्थितीवर आपण मात करू शकू हे समजण्याएवढा सूज्ञपणा राजकारण्यांनी दाखवला आहे. 

मुख्यमंत्री कार्यालयाने काय काय केले?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्यालय यासाठी सतत काम करत आहे. त्यांनी मुंबईत येणार्‍या प्रवाशांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यासाठी तीन चार मोठय़ा हॉटेल्सशी करार केला. त्यामुळे प्रवाशांना कमी दरात हॉटेलचे बिल भरून आयसोलेशनमध्ये राहता येईल अशी व्यवस्था केली गेली. स्वत: उद्धव ठाकरे यांचे अनेक बड्या डॉक्टरांशी असणारे संबंध यावेळी कामी आले. त्यांनी कतार, ओमान, यूएई, कुवैत हे चार देश तपासणीच्या यादीत घ्यायला लावले. राज्यभरातील जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याशी सतत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या साहाय्याने बैठका घेतल्या. स्वत: सगळे मॉनिटरिंग सुरू केले. तपासणीचे कीट केंद्राकडून तातडीने मिळावेत यासाठी पाठपुरावा करणे सुरू केले. 

परिस्थिती बिघडली तर काय काय लागेल.?
रुग्णांची संख्या वाढली तर रुग्णांसाठी मोठय़ा प्रमाणावर खाटा, व्हेण्टिलेटर्स, मास्क मोठय़ा प्रमाणावर लागतील. डॉक्टरांना विशिष्ट प्रकारचे बंदिस्त कपडे (पर्सनल प्रोटेक्टिव्ह कीट) लागतील. 
राज्यातील 18 सरकारी मेडिकल कॉलेजसाठीच कोणत्या वस्तू किती लागतील याची ही यादी.

थ्री लेअर मास्क-     26,46,500 
डॉक्टरांचे बंदिस्त कपडे-    90,700
एन 95 मास्क-    2,45,100
सॅनिटायझर-    1,06,500
    
सरकारने आज तातडीने हॅण्ड सॅनिटायझर, फ्यूमिगेशनसाठीचे साहित्य, डिसइन्फेक्टंट यांची खरेदी करण्याची गरज आहे; पण त्यासाठी गती येताना दिसत नाही. दुर्दैवाने आपण तिसर्‍या आणि चौथ्या टप्प्यात गेलोच तर या गोष्टी अत्यंत कमी पडतील असे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.
आपल्याकडे 31 मार्चपर्यंत घराबाहेर पडू नका असे का सांगितले जात आहे? तर त्यामागे जगभरातील आकडेवारीचा आधार आहे. न्यू यॉर्क, फ्रान्स, इराण, इटली, स्पेन आणि भारतात पहिल्या तीन ते चार आठवड्यात कोरोनाचे रुग्ण कसे वाढत गेले हे यावरून लक्षात येईल.
देश          1 आठवडा     2 आठवडा     3 आठवडा     4 आठवडा     5 आठवडा 
न्यू यॉर्क    2                         105                 613                --                  --
फ्रान्स       12                       191                  653               4499            --
इराण         2                         43                  245               4747          12,729
इटली         3                       152                 1036              6362          21,157
स्पेन           8                       674                 6043                --                 --
भारत         3                         24                      151               --                  --

atul.kulkarni@lokmat.com
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत वरिष्ठ सहायक संपादक आहेत. )

Web Title: Preparing for 'Corona'!..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.