शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

आत्मविश्वास हरवलेला व्यावसायिक नितीन

By admin | Updated: October 18, 2014 14:15 IST

व्यवसाय म्हटला की चढउतार हे आलेच; पण त्या लाटेवर स्वार होताना जे स्वत्व हरवू देत नाहीत, अशी माणसं खर्‍या अर्थाने यशस्वी होतात. नितीनची कथाही अशीच. आत्मविश्‍वास परत आला, नियोजनाची कास धरली, योगसाधनेचं बळ मिळालं आणि आयुष्याची गाडी पुन्हा मार्गावर आली.

- डॉ. संप्रसाद विनोद
 
नितीन हा जोशी घराण्यातला पहिला व्यावसायिक. वडील शिक्षक, आई गृहिणी. त्याचा आणि त्याच्या वाडवडिलांचा धंदा-व्यवसायाशी दुरूनही कधी संबंध आला नव्हता. पदवी मिळाली, की सरकारी किंवा खासगी ‘नोकरी’ करणं ही जोशी घराण्याची परंपरा. पण, घरबांधणी अभियांत्रिकीचं शिक्षण घेणार्‍या नितीनचा व्यावसायिक पार्श्‍वभूमी असणार्‍या अनेक विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी जवळून संबंध आला. त्यांचं ऐश्‍वर्य त्याला पाहायला मिळालं. असं ऐश्‍वर्य आपल्याकडे असावं, अशी आकांक्षा निर्माण झाली. मग, जाणीवपूर्वक तो या मित्रांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मानसिकतेचा अभ्यास करू लागला. त्यातून त्याला अनेक गोष्टी नव्याने समजू लागल्या. व्यावसायिक पद्धतीने विचार कसा करतात, याची थोडी तोंडओळख झाली. व्यवसाय ही काही ‘अपने बस की बात नही’ या भ्रमाचा पगडा दूर होऊ लागला. फारसा धोका न पत्करता सामान्य जीवन जगण्याची मध्यमवर्गीय प्रवृत्तीदेखील थोडी कमी झाली.
अभियांत्रिकीच्या अभ्यासाबरोबर त्याचा हा ‘व्यवसाय मनाचा’ जोड-अभ्यास सुरू राहिला. त्यानंतरही ‘व्यावसायिक मानसिकता’ नितीनला काही पूर्णपणे समजली नाही. पण, ती जाणून घेण्याची  तीव्र जिज्ञासा मात्र निर्माण झाली. त्यामुळे, पदविका परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी चालून आली तरी त्याने ती नाकारून ओळखीतल्या एका बांधकाम व्यावसायिकाकडे वर्षभर ‘व्यवसाय प्रशिक्षण’ घ्यायचं ठरवलं. पगार थोडा कमी मिळणार होता; पण लाख मोलाचं ‘व्यावहारिक’ ज्ञान मिळणार होतं. अर्थातच, त्याच्या या निर्णयाने घरातले सगळे नाराज झाले. त्रासले. रागावले. नितीनने नोकरी करावी, लग्न करावं आणि स्थिरस्थावर व्हावं अशी त्यांची ‘धोपटमार्गी’ अपेक्षा होती. आग्रह होता. पण, नितीनला आपण जे करतोय त्याबद्दल पूर्ण विश्‍वास होता. त्यामुळे, तो आपल्या निर्णयावर ठाम राहिला. घरच्यांचा विरोध मग ‘नाईलाजाने’ मावळला. नंतर, व्यवसायात यशस्वी झाल्यावर तर या विरोधाचं रूपांतर ‘कौतुका’तच झालं.
व्यवसाय प्रशिक्षण सुरू झालं. नितीनने वर्षभर अपार कष्ट केले. पडतील ती, सांगतील ती सर्व कामं केली. कुठल्याही कामाची कधी लाज बाळगली नाही. मित्राच्या वडिलांचा विश्‍वास संपादन केला. वर्षाच्या अखेरीस तो त्यांचा एक जवळचा सहकारी झाला. या काळात त्यांच्या व्यक्तित्वाचा, विचारसरणीचा, वागण्या-बोलण्याचा त्याने नीट अभ्यास केला. व्यावसायिक विचारप्रक्रियेचे, योजनांचे बारकावे काळजीपूर्वक समजून घेतले. ‘विचारपूर्वक’ धोका पत्करणं म्हणजे काय हे जवळून पाहिलं. छान शिकून घेतलं. त्यामुळे, त्याचा स्वत:चा असा एक व्यावहारिक दृष्टिकोन विकसित झाला. माणसांची पारख करण्याचं कौशल्य निर्माण झालं.
प्रशिक्षणाचा कालावधी संपला. नितीन आता शेटजींच्या व्यवसायाचा एक महत्त्वपूर्ण घटक बनला होता. अनेक महत्त्वाच्या जबाबदार्‍या तो एकहाती सांभाळत होता. शेटजी त्याच्यावर खूष होते. अनेक कामांसाठी त्यांची त्याच्यावर मदार असायची. कधी कधी तर ते त्याचादेखील सल्ला घ्यायचे. त्याच्याशी  विचारविनिमय करायचे. अमेरिकेत एम. एस. करायला गेलेला त्यांचा मुलगाझ्र नितीनचा मित्र शिक्षण संपवून परत येईपर्यंत ते नितीनवर आणखी बर्‍याच जबाबदार्‍या टाकण्याच्या विचारात होते. 
पण, नितीनचं स्वप्न वेगळं होतं. प्रशिक्षण संपल्यावर तो शेटजींना भेटला. शेटजींचे त्याने मनापासून आभार मानले. स्वत:चा व्यवसाय करण्याची आपली इच्छा शेटजींना सांगितली. शेटजींना थोडा धक्का बसला; कारण त्याच्यावर त्यांची भिस्त होती. त्यांचे चिरंजीव परदेशात असल्याने नितीन हा त्यांची आता ‘व्यावसायिक गरज’ बनला होता. पण, नितीन खाल्ल्या मिठाला जागला. त्याने शेटजींची अडचण समजून घेतली. त्याने स्वत:चा व्यवसाय तर सुरू केलाच; पण त्याचबरोबर शेटजींकडे कामाला असलेल्या एका इंजिनियरला सगळ्या कामाविषयी व्यवस्थित माहिती दिली. त्या इंजिनियरला चांगलं तयार केलं. शेटजींचं काम आपल्या अनुपस्थितीत अडून राहणार नाही, याची शक्य ती सर्व काळजी घेतली. त्यामुळे, शेटजींच्या मनात नितीनविषयी एक आत्मीयतेची भावना-‘गुडविल’ निर्माण झालं.
नंतर, ‘व्यावसायिक अनुभवाची’ पुरेशी शिदोरी घेऊन नितीनने मोठय़ा आत्मविश्‍वासाने आपला बांधकाम व्यवसाय सुरू केला. त्याची सुरुवातीची प्रगती खूपच चांगली झाली. धावपळ मात्र बरीच करावी लागली. दुचाकीवरून तासन्तास उन्हातान्हात प्रवास करावा लागला. खूप कष्ट उपसावे लागले. दगदग झाली. नितीनने या सगळ्याची तयारी ठेवली होती; पण झालेल्या दगदगीचे परिणाम शरीरावर दिसू लागले. रक्तदाब, पाठदुखी सुरू झाली. वजन वाढलं. औषधपाणी केलं. ‘शेवटी’ मग योगाची आठवण झाली. योगसाधना सुरू झाली. त्याचे परिणाम हळूहळू दिसू लागले. आत्मविश्‍वास वाढला. त्यामुळे, आवाक्याबाहेरची ‘आर्थिक उडी’ घेण्याचा मोह झाला. दुर्दैवाने आर्थिक मंदी आली. व्यवसायावर परिणाम झाला. कर्जाचे हप्ते थकले. चिंता वाढली. घरातून कोणी मानसिक, भावनिक आधार देणारं नव्हतं. उलट, ‘तरी आम्ही म्हणत होतो की भलते ‘धंदे’ करू नकोस. धंदा करणं हे काही आपलं काम नाही..’ असं म्हणून घरच्यांनी त्याला नामोहरम, नाउमेदच केलं. नितीन फार निराश झाला. भयग्रस्त झाला. त्याचा आत्मविश्‍वास हरवला. रक्तदाब वाढला. झोप लागेनाशी झाली.
योगसाधना सुरू केल्यावर याविषयी त्याच्याशी एकदा विस्ताराने बोलणं झालं. त्याची सांपत्तिक स्थिती, घरच्या जबाबदार्‍या, कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता या सगळ्याचा काळजीपूर्वक आढावा घेतला. बँकेचे किती हप्ते भरलेत आणि किती बाकी आहेत हे समजून घेतलं. त्यातून असं स्पष्ट झालं, की एवढी चिंता करण्याचं काहीच कारण नव्हतं. मुख्य म्हणजे, त्याच्या हातात आणखी काही कामं होती. तसंच, इतर काही कामं मिळण्याच्या मार्गावर होती. मग, आमचं असं ठरलं, की प्रथम त्याने त्याच्या हातातल्या कामांविषयी मोकळेपणाने बँकेशी बोलावं. 
बॅंकेने त्याचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्याला कर्ज दिलं, की मंजूर कर्जापैकी ८0 टक्के वापरून कामाला सुरुवात करावी.  हातात घेतलेलं काम यशस्वीपणे पूर्ण करावं. वेळेवर हप्ते भरून कर्ज फेडावं. असं केल्याने बँकेमध्ये पत निर्माण होईल. हे त्याला पटलं. 
याशिवाय, त्याला असंही सुचवलं, की प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्यानंतर त्या कामाविषयी जे काही ‘८0टक्के’ तुझ्या हातात आहे, ते अगदी मनापासून करावं आणि उरलेल्या २0टक्क्यांचा भार शांतपणे त्या अज्ञात शक्तीवर सोडून द्यावा. नीट विचार केल्यानंतर त्याला माझं म्हणणं पटलं आणि जणू काही त्याला यशाची गुरुकिल्लीच मिळून गेली. ‘८0-२0’चा मंत्र त्याच्या बाबतीत इतका छान लागू पडला, की त्याच्या सगळ्या समस्या हळूहळू सुटायला लागल्या. व्यवसायात पुन्हा एकदा स्थैर्य आलं. आधीचं कर्ज फिटलं. नवीन प्रकल्पासाठी कर्ज मिळालं. पुन्हा हाच मंत्र वापरून बँकेने देऊ केलेल्या कर्जापेक्षा २0 टक्के  कमी कर्ज घेऊन त्याने ‘शांतपणे’ नवीन प्रकल्पाची सुरुवात केली. हा प्रकल्पही दोन वर्षांत पूर्ण केला.
नितीन आता एक यशस्वी व्यावसायिक म्हणून नावारूपाला येऊ लागलाय. कामाचा उत्तम दर्जा आणि जागेचा ताबा दिल्यानंतरही योग्य ती सेवा पुरवून तो आता ग्राहकांचा विश्‍वास संपादन करू लागलाय. आता बँक त्याला आपणहून हवं तेवढं कर्ज द्यायला तयार आहे! 
तो मात्र जेवढं त्याच्या आवाक्यात आहे, तेवढंच कर्ज घेऊन ‘दमादमाने’ पण ‘निश्‍चितपणे’ प्रगती साधतो आहे. नियमितपणे सुरू असलेल्या ‘अभिजात योगसाधने’मुळे त्याचं आरोग्य छान राहतंय आणि मला खात्री आहे, की पुढेही ते तसंच छान राहणार आहे. 
त्यामुळे, आणखी काही वर्षांनी ज्या वेळी त्याच्याकडे भरपूर ऐश्‍वर्य असेल, त्या वेळी त्याच्यावर ‘चणे आहेत पण ते खायला दातच नाहीत’ असं म्हणण्याची वेळ नक्कीच येणार नाही!! 
(लेखक हे महर्षी न्यायरत्न विनोद यांचा विशुद्ध अध्यात्माचा आणि अभिजात योगसाधनेचा वारसा चालविणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगगुरू आणि योगोपचारतज्ज्ञ आहेत.)