शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

नवज्योतसिंग क्लीन बोल्ड बाय सिद्धू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2021 06:05 IST

क्रिकेटमध्ये सिद्धू चमकदार सलामीवीर होता; पण तो ‘सुनील गावसकर’ कधी बनू शकला नाही. राजकारणात लोकप्रियतेच्या बळावर त्याने निवडणुका जिंकल्या; पण तो अमरिंदरसिंगांसारखा ‘कॅॅप्टन’ बनू शकला नाही. ठोको ताली!

ठळक मुद्देभारतीय क्रिकेटमध्ये पंधरा-सोळा वर्षं खेळल्यानंतरही सिद्धू कधीच कर्णधार बनू शकला नाही. ना संघातलं स्थान त्याला कधी भक्कम राखता आलं. अमरिंदरसिंग यांची जागा घेण्याची घाई केली, पण फासे असे पडले की त्याला पालखीचं भोई व्हावं लागलं.

- सुकृत करंदीकर

सन १९९४. उत्तर भारतातल्या कडाक्याच्या थंडीचे दिवस. जानेवारीतला अठरावा दिवस. भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्याच सामन्यासाठी लखनौचं मैदान खचाखच भरलेले. कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. मनोज प्रभाकर आणि नवज्योतसिंग सिद्धू ही सलामीची जोडी मैदानात उतरली. फिरकी गोलंदाजी ही श्रीलंकेची ताकद होती. मुथय्या मुरलीधरन या विशी-बाविशीतल्या श्रीलंकेच्या ऑफ-स्पिन गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय पदार्पण करून जेमतेम वर्षच झाले होते; पण तेवढ्यातही मुरलीधरनचे नाव गाजू लागले होते. दुसऱ्या बाजूला नवज्योतसिंग सिद्धूला भारताकडून खेळण्यास सुरुवात करून तोवर दहा वर्षे झाली होती. छातीपर्यंत उसळणाऱ्या, कानाजवळून सुसाट जाणाऱ्या चेंडूंसमोर सिद्धूची बॅॅट फार बोलत नसे; पण फिरकी, मध्यमगती गोलंदाज समोर आले की सिद्धूचे डोळे लकाकत. भारताविरुद्ध पहिलाच सामना खेळणाऱ्या मुरलीधरनला याचा अनुभव लवकरच आला. सिद्धूने त्या सामन्यात १२४ धावा फटकावल्या. त्यात ८ उत्तुंग षटकार होते. यातले सहा षटकार तर त्याने एकट्या मुरलीधरनलाच खेचले होते. क्रिज सोडून पुढे सरसावत जात मुरलीधरनला त्यानं लाँग-ऑन, लाँग-ऑफवरून लांबवर भिरकावले होते. पुढे हाच मुरलीधरन कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल आठशे बळी मिळविणारा जगातला एकमेव गोलंदाज ठरला; पण भारतातला पहिला दौरा तो आयुष्यभर विसरू शकला नाही. ‘षटकार ठोकणारा सिद्धू’ अशीच त्याने त्याची ओळख कसोटी आणि वन-डेतही निर्माण केली होती. भारताच्या दौऱ्यावर आलेल्या शेन वॉर्नने नंतर सांगितले होते, ‘माझ्या गोलंदाजीवर क्रिजबाहेर सरसावत माझ्या डोक्यावरून मला फेकून देणारा सचिन माझ्या स्वप्नात येतो आणि माझी झोपच उडते;’ पण याच वॉर्नला क्रिजबाहेर येत फिल्डरच्या डोक्यावरून फटकावण्याची सुरुवात सिद्धूने आधी केली होती. करिअरच्या सुरुवातीला मात्र सिद्धूला फार चमक दाखविता आली नव्हती. एवढेच काय; पण ‘स्ट्रोकलेस’ अशी त्याची हेटाळणीही झाली. संघातले स्थान त्याला गमवावे लागले. त्यानंतर सिद्धूने खूप मेहनत केली. १९८७ मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या रिलायन्स वर्ल्ड कपमध्ये ती फळालाही आली. या मालिकेत सिद्धूने सलग चार अर्धशतके ठोकली. १९९६ च्या भारतात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वर्ल्ड कपमध्येही सिद्धू एक अविस्मरणीय खेळी खेळून गेला. खरे तर ती फार कोणी लक्षात ठेवत नाही. मैदान होते बंगळुरूचे आणि मुकाबला होता थेट पाकिस्तानशी. दोनच गोष्टींमुळे हा सामना भारतीय क्रिकेटप्रेमींच्या कायमचा लक्षात राहिला. एक म्हणजे अखरेच्या षटकांमध्ये अजय जडेजाने केलेली वकार युनूसची बेदम धुलाई आणि वेंकटेश प्रसादने उद्दाम आमिर सोहेलच्या उडवलेल्या दांड्या; पण हे दोन्ही घडण्यापूर्वी सिद्धू हाच भारताच्या डावाला आकार देणारी ९३ धावांची मजबूत खेळी खेळून गेला होता. त्याच्या जोरावरच भारताने २८७ धावांचा डोंगर उभा केला ज्यापुढे पाकिस्तान नेस्तनाबूत झाला.

१९९६ मध्ये मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारत इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला. दौरा चालू असताना मधूनच सिद्धू महाशय स्वत:चे किट उचलून निघाले आणि कोणालाही न सांगता थेट भारतात परतले. असा प्रसंग यापूर्वी कधीच न घडल्याने बीसीसीआयने चौकशी समिती नेमली. तेव्हा सिद्धू एकच सांगत राहिला ते म्हणजे, ‘मेरी गलती मैं मानता हूँ.’ पण दौरा अर्धवट टाकण्याचा वेडगळपणा का केला, हे त्याने कधीच सांगितले नाही. बहुधा चूक मान्य केल्याने त्याला वेस्टइंडीज दौऱ्यावर नेण्यात आले. त्या दौऱ्यात पोर्ट ऑफ स्पेनला सिद्धूने सलग अकरा तास फलंदाजी करून द्विशतक ठोकले. त्यानंतर मात्र फार काळ तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टिकला नाही. त्याचे क्रिकेट करिअर चढ-उताराचे; पण चमकदार राहिले. कसोटीतली ४२ ची आणि वनडेतली चाळीसला टेकणारी त्याची सरासरी वाईट अजिबातच नाही. त्याच्या रूपाने भारताला एक चांगला सलामीवीर मिळाला होता; पण १९९८-९९ च्या न्यूझीलंडविरुद्धच्या सुमार कामगिरीमुळे त्याला पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतून वगळले. त्यानंतर १९९९ मध्ये त्याने ‘नो रिग्रेटस्’ म्हणत क्रिकेटला तडकाफडकी रामराम ठोकला. निवृत्त होताना त्याला इंग्लंड दौऱ्यातल्या ‘त्या’ घोडचुकीबद्दल विचारणा झाली त्यावेळी त्याचे उत्तर होते, ‘मी भूतकाळाचा किंवा भविष्याचा फार विचार करीत नसतो.’ सिद्धूच्या व्यक्तिमत्त्वातला हाच दोष असावा. सिद्धूच्या संघ सहकाऱ्यांचा अनुभव असा की सिद्धू बऱ्यापैकी अबोल आणि एकलकोंडा होता. सिद्धूने आणि त्याच्या मित्राने १९८८ मध्ये रस्त्यावरच्या भांडणात एका वयस्क माणसाला बॅॅटने इतके मारले की त्यात त्याचा मृत्यू झाला. सदोष मनुष्यवधाच्या आरोपावरून सिद्धूला तीन वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला. नंतर तो जामिनावर सुटला. क्रिकेट समालोचक म्हणून २००१ मध्ये माइक हाती घेतलेला नवाच सिद्धू जगासमोर आला. मंदिरा बेदी-सिद्धू या जोडगोळीने क्रिकेट कॉमेंट्रीचे स्वरूपच बदलून टाकले. क्रिकेटपेक्षा जास्त चाहते सिद्धूने त्याच्या अखंड बडबडीतून मिळविले. या लोकप्रियतेच्या बळावर २००४ मध्ये तो भाजपाचे कमळ हाती घेऊन अमृतसरमधून खासदार झाला; पण १९८८ मधल्या खून प्रकरणात दोषी आढळल्याने त्याने २००६ मध्ये राजीनामा दिला. सर्वोच्च न्यायालयाने त्याची शिक्षा स्थगित केल्यावर पुन्हा २००७ मध्ये पोटनिवडणूक जिंकली. २००९ मध्ये अमृतसरमधून विजयाची पुनरावृत्ती केली.

भाजपानं २०१४ मध्ये अरुण जेटलींसाठी सिद्धूला तिकीट नाकारलं. एव्हाना अनेक कॉमेडी शो, रिऍलिटी शो यातून सिद्धू ‘टीव्ही स्टार’ बनला. या लोकप्रियतेनं त्याची महत्त्वाकांक्षा वाढवली. भाजपानं त्याला राज्यसभा दिली पण त्यानं तो समाधानी नव्हता. भाजपामध्ये नरेंद्र मोदींशी त्याचं जुळलं नाही. आपमध्ये अरविंद केजरीवालांशी संधान साधण्याचा प्रयत्न असफल ठरला. ‘आवाज-ए-पंजाब’ ही आघाडी काढून पाहिली आणि लगेच गुंडाळलीही. सिद्धुचे वडील भगवंतसिंह पंजाब काँग्रेसचे नेते होते. शेवटी त्यानं वडलांचा पक्ष जवळ केला आणि कॅॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या ‘टीम’मधे पंजाबचा मंत्री झाला. पण तिथंही मांड पक्की बसण्याआधीच त्याला सिंहासन खुणावू लागलं. भारतीय क्रिकेटमध्ये पंधरा-सोळा वर्षं खेळल्यानंतरही सिद्धू कधीच कर्णधार बनू शकला नाही. ना संघातलं स्थान त्याला कधी भक्कम राखता आलं. अमरिंदरसिंग यांची जागा घेण्याची घाई केली, पण फासे असे पडले की त्याला पालखीचं भोई व्हावं लागलं. संयम, दूरदृष्टीचा अभाव, उतावीळपणा आणि प्रसंगी माघार न घेण्याचा हट्टीपणा यामुळं सिद्धूचं राजकीय भवितव्य अस्थिरतेच्या गर्तेत आहे. अमरिंदरसिंग यांनी जाहीर केलेल्या व्यक्तिगत वैराची त्यात भर पडली आहे. त्यामुळं पंजाब कॉंग्रेसला घेऊन सिद्धू बुडणार की कॉंग्रेस आणि सिद्धू स्वतंत्रपणे बुडणार ही उत्सुकता आता आहे. क्रिकेटमध्ये ‘हिट विकेट’ असते. यात फलंदाज स्वत:च्याच चुकीनं यष्ट्या उद्ध्वस्त करतो आणि त्याला तंबूत परतावं लागतं. सिद्धूनं राजकारणात तेच केलं आहे. क्रिकेटमध्ये सिद्धू चमकदार सलामीवीर होता, पण तो ‘सुनील गावस्कर’ कधी बनू शकला नाही. राजकारणात लोकप्रियतेच्या बळावर त्यानं निवडणुका जिंकल्या, पण तो अमरिंदरसिंगांसारखा ‘कॅॅप्टन’ बनू शकला नाही. ठोको ताली!

(सहायक संपादक, लोकमत, पुणे)