शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

माध्यम आणि साध्य

By admin | Updated: July 29, 2016 17:23 IST

सातत्याने लिहिती माणसे मरून गेल्याने आणि जुन्या लेखकांचा धाक संपल्याने साहित्य संमेलने राजकारण्यांनी काबीज केली. सोमेगोमे, साळकाया माळकाया उठून लिहू लागल्या आणि कुत्र्याच्या छत्रीसारखी रानावनात प्रकाशन करणारी माणसे उगवली.

 - सचिन कुंडलकर

सातत्याने लिहिती माणसे मरून गेल्याने आणि जुन्या लेखकांचा धाक संपल्याने साहित्य संमेलने राजकारण्यांनी काबीज केली. सोमेगोमे, साळकाया माळकाया उठून लिहू लागल्या आणि कुत्र्याच्या छत्रीसारखी रानावनात प्रकाशन करणारी माणसे उगवली. सामाजिकतेचा गोंगाट खूप वाढला आणि खोटी दिखावू समानता बोकाळली. मी जे आजचे शहरी आयुष्य जगतो, माझे म्हणणे, माझी सुखदु:खे आता मला मराठी सिनेमात, मराठी नाटकात, मराठी पुस्तकात जाणवणार नाहीत हे माझ्या लक्षातयेताच मराठी वाचनाची आवड मी आटोपती घेतली.सुनीता देशपांडे आणि जी. ए. कुलकर्णी यांच्यातील पत्रव्यवहार माझ्यासाठी मराठी आणि इंग्रजी साहित्याकडे आकर्षित होण्यासाठी पुरेसे प्रबळ असे कारण ठरला. मला सुनीता देशपांडे यांच्याविषयी अतीव आदर आणि त्यांच्या बुद्धीचे आकर्षण निर्माण झाले. त्या दोघांनी एकेमकांना लिहिलेल्या पत्रांमध्ये इतक्या विविध प्रकारच्या लेखकांचा आणि पुस्तकांचा उल्लेख आहे आणि तो इतक्या सहजपणे आनंदात केला आहे की वाचताना आपल्याला दडपण न येता पुस्तके वाचण्याच्या सवयीविषयी खूप लोभस आकर्षण तयार होते.एकदा वाचायची सवय लागली तेव्हापासून अंतरीच्या एकटेपणावर फुंकर घालण्याचे माध्यम गवसले. कारण मोठा होत होतो तसा जगापासून तुटल्यासारखा होत होतो. आत मनात, शरीरात काय चालू आहे हे सांगण्यासारखे, समजून घेणारे कोणी आजूबाजूला नव्हते. खूप काही आतल्याआत घडत होते पण ते मूकपणाने सोसावे किंवा चाखावे लागत होते. आपल्या सुखात आणि दु:खात आपल्या सभोवतालीचे कुणीही आता यापुढे कधीच सहभागी होऊ शकणार नाही ही जाणीव शारीरिक पौगंडावस्थेत वाढत होती. त्या काळात मला पुस्तकांनी आणि वाचनाच्या सवयीने खूप मोठी सोबत केली. माझे मराठी वाचन वाढू लागले. मी अशा सांस्कृतिक वातावरणात होतो जिथे तुम्ही काहीही केलेत तरी तुमच्यापेक्षा खूप जास्त केलेली माणसे सभोवताली असतात आणि ती तुम्हाला सारख्या सूचना देत बसतात किंवा तुच्छ लेखत बसतात. अशी माणसे पुण्याच्या पाण्यात मोप पिकत. त्यामुळे आपण पु. शि. रेगे वाचून काढले की ते म्हणत, अरे तू अजून दुर्गा भागवतांचे लिखाण वाचत नाहीस? की आपण ते वाचायचे. ते वाचून झाले की ते म्हणत, ‘काय हे? इरावती कर्वे तुला माहीत नाहीत? अरेरे.’ की आपण लगेच धावत जाऊन इरावतीबाईंची पुस्तके आणायची. सतत तुलनेचे आणि प्रदर्शनाचे वातावरण सभोवताली असल्याने काय मजा विचारता? आमच्या गावात तुमची सोडमुंज होऊनच तुम्हाला बाहेर काढतात. मराठी साहित्याचा जो आखीव आणि ठरावीक परीघ आहे, म्हणजे ज्या लेखकांच्या लिखाणाने मौजचे, राजहंसचे, पॉप्युलरचे, मॅजेस्टिकचे स्टॉल भरलेले असतात, ते लेखक वाचण्यातच माझी अख्खी विशी गेली. कारण श्रीपुंनी, मोठ्या आणि धाकट्या माजगावकरांनी, मोठे भटकळ यांनी, कोठावळे बंधूंनी कामच इतके मोठे आणि चांगले करून ठेवलेले होते की सुबक, सकस आणि उत्तम साहित्यावर माझे पोषण होतच राहिले. दिवाळी अंकांचे अजब आणि प्रचंड विश्व गवसले. त्यात सापडणारे वेगळे नवे ताजे प्रवाह आकर्षित करू लागले. अरुण जाखडे यांच्यासारखे अनेक नवे संपादक सातत्याने काहीतरी नवीन शोधात असतात ते समजून घेण्याची इच्छा तयार झाली. त्या काळात मी नुसता वाचत बसलेला होतो, पुण्यात वाचनाची जणू स्पर्धा चालू असल्यासारखा. कधी काही खेळलो नाही, कुठे मारामाऱ्या केल्या नाहीत. काही फार नव्याने शिकलो नाही. मला जे आवडत नाही ते मोकळेपणाने सांगायचे धाडस त्या काळात माझ्यात नव्हते. मला इतिहासाची आणि महापुरुषांची अजिबात आवड नाही... मला चळवळी करणाऱ्या लोकांचे अनुभव वाचण्यात काडीचाही रस नाही...मला कुसुमाग्रज यांचे लिखाण कधीच आवडले नाही... ते माझ्याशी बोलत नाहीत... मला भावगीते ऐकली की अंगावर शिसारी येते... असे काही मी तेव्हा बोलत नसे. कारण मराठी साहित्य ही फार गांभीर्याने आणि सोवळेपणाने घ्यायची गोष्ट आहे असे मला वाटायचे. आणि आपण या सगळ्यांपुढे फक्त एक सामान्य वाचक आहोत. आपली मते चुकीचीच असणार असेही मला वाटायचे. त्या वेळचा नम्रपणा आणि जिभेचा संयम आठवून मला तर हल्ली हसूच येते. प्रवास करायला लागलो तेव्हा लक्षात आले की आपल्या भाषेतील साहित्य आता आपली भूक भागवू शकत नाही. कारण आपली भाषा ज्ञानभाषा नाही. आपली भाषा आठवणीप्रधान, सामाजिक किंवा भावनिक साहित्य लिहिण्याची भाषा उरली आहे. आपल्या भाषेला फक्त अभिमान आणि आठवण उरली आहे. इतर भारतीय भाषांमधील इंग्रजीमध्ये आलेले साहित्य आपण वाचायला हवे. नाहीतर आपणही मराठीतील वयोवृद्ध माणसांप्रमाणे साठी-सत्तरीचे साहित्य घोळवत बसू. त्यावेळी सातत्याने लिहिती माणसे मरून गेल्याने आणि जुन्या लेखकांचा धाक संपल्याने साहित्य संमेलने राजकारणी माणसांनी काबीज केली. आणि जवळजवळ महाराष्ट्रातील सर्व साक्षर माणसे स्वत:ला लेखक म्हणवून घेतील अशी परिस्थिती येऊ लागली. आणि मराठी साहित्य ही ‘द लॅण्ड आॅफ एक्सेस प्रॉडक्शन’ बनली. सगळे सोमेगोमे, सगळ्या साळकाया माळकाया उठून लिहू लागल्या आणि कुत्र्याच्या छत्रीसारखी रानावनात प्रकाशन करणारी माणसे उगवली. सामाजिकतेचा गोंगाट खूप वाढला आणि खोटी दिखावू समानता बोकाळली. त्या नव्या लोकांनी दुसरी बायको आली की जशी पहिली जे करायची ते करते त्या रिवाजाप्रमाणे पुस्तक प्रकाशने, लेखकांच्या मुलाखती, सत्कार, गल्लीबोळातली साहित्य संमेलने यांचा धडाका लावला. त्या सुमारास मी मराठी वाचनाची आवड आटोपती घेतली.मी जे आजचे शहरी आयुष्य जगतो, माझे म्हणणे, माझी सुखदु:खे आता मला मराठी सिनेमात, मराठी नाटकात, मराठी पुस्तकात जाणवणार नाहीत हे माझ्या लक्षात आले. मी शेतकरी नाही, मी दलित नाही, मी बाजीप्रभू किंवा बाजीराव नाही त्यामुळे मराठी पुस्तके किंवा सिनेमे माझे उरलेले नाहीत. मी साधा पांढरपेशा घरातून आलेला, बुद्धिमान आणि संवेदनशील शहरी माणूस आहे. मला या सगळ्या वातावरणाचा कंटाळा येऊ लागला. कारण ‘वाचा वाचा’ असे जे ओरडतात ते सगळे चांगले माझे वाचून झाले होते. लक्ष्या आणि अशोक सराफ यांच्या सिनेमाने मला ओकारी येईल इतके त्या काळात घाण वाटत असे. मला बाबासाहेब पुरंदरे वगैरे माणसांचे कधीच आकर्षण वाटले नाही. मग आपण मराठी आहोत म्हणजे काय आहोत? आपल्या पिढीतल्या महाराष्ट्रातील शहरात जन्मलेल्या माणसांना अमेरिकेत जायचे नसेल आणि इथे राहायचे असेल तर आपण काय वाचूया? काय पाहूया? जे आपल्याशी बोलेल, आपल्याला जवळचे वाटेल? कारण आयुष्याप्रमाणे साहित्यसुद्धा प्रवाही हवे. लहानपणी जे महत्त्वाचे वाटते त्याचा मोठेपणी कंटाळा किंवा राग आला नाही तर आपण मोठे झालोच नाही. आपण असे सहजपणे जरी बोललो घरीदारी तरी लोक आपल्याला वेड्यात काढतील असे मला वाटायचे. विजय तेंडुलकरांनी माझी याविषयीची अपराधीपणाची भावना घालवली. आमची ओळख झाली आणि स्नेह तयार झाला तेव्हा कधीतरी एकदा बोलताना त्यांना मी हे म्हणालो की, ‘मला आता तेच ते मराठी लेखक वाचण्याचा कंटाळा येतो. मिलिंद बोकील सोडून इतर कोणाचेही नवीन लिखाण ताजे आणि आकर्षक वाटत नाही. पुस्तकांच्या दुकानात जावेसे वाटत नाही. जुन्या बाजाराच्या बजबजपुरीत गेल्यासारखे मराठी पुस्तकांचे झाले आहे. मी हे वातावरण समजून घेऊ शकत नाही. मी जसा आहे तसे काहीही या मराठी साहित्यात आता मला सापडत नाही.’ - तेव्हा तेंडुलकर हसले आणि म्हणाले की, उत्तमच वाटते आहे की मग! वाचन आणि लिखाण महत्त्वाचे. भाषा सर्वात कमी महत्त्वाची. भाषा हे माध्यम आहे, साध्य नाही. मराठी भाषा अजिबातच महत्त्वाची नाही. आपल्या आयुष्याचा परीघ उमटवणारे, आपल्याला आतून ओले करणारे साहित्य ज्या ठिकाणी असेल तिथे ते जाऊन वाच. सोपे आहे.