होम प्लॅटफार्म ओसाड : अजून पाच वर्षे प्लॅटफार्मची गरज नसल्याचा खुलासाआनंद शर्मा - नागपूररेल्वेस्थानकावर होम प्लॅटफार्मसाठी रेल्वे प्रशासनाने नऊ कोटी रुपये खर्च केले. बदली होण्यापूर्वी तत्कालीन ‘डीआरएम’ बृजेश दीक्षित यांनी या प्लॅटफार्मचे लोकार्पणही केले. परंतु या प्लॅटफार्मवरून सुटणारी एकमेव दुरांतो एक्स्प्रेसही शेड नसल्यामुळे पावसाळ्यात बंद करण्यात आली. आता हा प्लॅटफार्म ओस पडला असून येथून भविष्यात जमले तर रेल्वेगाड्या चालवू, सध्याच या होम प्लॅटफार्मची गरज नव्हती, असे धक्कादायक विधान सध्याचे ‘डीआरएम’ ओ. पी. सिंह यांनी केले आहे.नागपुरातून सुटणाऱ्या आणि दपूम रेल्वेच्या गाड्यांसाठी आठवा होम प्लॅटफार्म साकारण्यात आला. काही दिवस दुरांतो एक्स्प्रेस येथून सोडल्यानंतर पावसाळ्यात शेड नसल्यामुळे ही गाडीसुद्धा दुसऱ्या प्लॅटफार्मवरून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या होम प्लॅटफार्मवरील लँडस्केपिंग, वॉटर पॅनलचे नुकसान होत आहे. येथे असामाजिक तत्त्वांच्या हालचाली वाढल्या आहेत. या बाबींची रेल्वे प्रशासनाने कुठलीच दखल घेतली नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या प्लॅटफार्मवरून रेल्वेगाड्या सोडण्यासंबंधी कुठलीच नोंद रेल्वेकडे नसल्याचा खुलासा सध्याचे ‘डीआरएम’ ओ. पी. सिंह यांनी केला आहे. परंतु तत्कालीन ‘डीआरएम’ बृजेश दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत होम प्लॅटफार्मवरून गाड्या सोडणार असल्याचे सांगितले होते. भविष्यात सेवाग्राम थर्डलाईन, कळमना डबलिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर होम प्लॅटफार्मवरून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या गाड्या सोडण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. सध्याचे ‘डीआरएम’ ओ. पी. सिंह यांचा खुलासा आश्चर्यजनक आहे. त्यांच्या मते होम प्लॅटफार्मवरून रेल्वेगाड्या सोडण्याची कुठलीच नोंद रेल्वेकडे नसल्याने तेथून रेल्वेगाड्या सोडण्याचा कुठलाच कार्यक्रम सध्या नाही. भविष्यात होम प्लॅटफार्मवरून गाड्या सोडण्याचा विचार केला जाऊ शकतो. होम प्लॅटफार्मची अजून पाच वर्षे गरज नसल्याचे धक्कादायक विधानही त्यांनी केले.
कोट्यवधींचा खर्च कशासाठी?
By admin | Updated: July 28, 2014 01:27 IST