नाशिक : गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असणारे महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी आणखी एका वादाला निमंत्रण दिले. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांना अर्थकारणातील काय कळते, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे शेतीच्या आर्थिक तरतुदीवर परिणाम होत असल्याचे म्हटले होते. त्याचे खडसेंनी समर्थन केले. मात्र राजन यांच्या वक्तव्यास रघुनाथ पाटील यांनी विरोध करत त्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. त्याबाबत खडसे यांना विचारले असता ते म्हणाले, पाटील यांना शेतीचे कळत असले तरी, आर्थिक ज्ञान नाही. द्राक्षबागा व फळबागांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना शासनाने दिलेली मदत तोकडी आहे. केंद्राच्या मदतीने बागायतदारांना अधिकचा निधी शासन देणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प तयार करतानाच ओढाताण करावी लागणार आहे. त्यामुळे कृषीसाठी वेगळा अर्थसंकल्प तयार करणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)निर्णय मानेंचा, शासन अंधारातआडत बंदचा निर्णय कृषिमंत्री अथवा सहकारमंत्र्यांना माहिती न देताच स्वत:ची प्रतिमा उंचावण्यासाठी पणन संचालक सुभाष माने यांनी घेतल्याचा गौप्यस्फोट खडसे यांनी केला. वस्तुत: निर्णय शेतकरी हिताचा असला तरी आम्हाला त्याची कल्पना नसल्याने व्यापारी, आडतदारांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागली. निर्णयाला दिलेली स्थगिती लवकरच उठविण्यात येईल, असे खडसे यांनी सांगितले.
अर्थकारणात रघुनाथ पाटलांना काय कळते?
By admin | Updated: December 30, 2014 01:31 IST