ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ४ - सप्टेंबर महिना उजाडला तरी पुरेसा पाऊस पडला नसल्याने राज्यावर पाणीकपातीचे संकट घोंघावत असून कमी पावसाचा फटका पुणेकरांनाही बसला आहे. पुण्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत घेण्यात आला असून येत्या सोमवारपासून म्हणजेच ७ सप्टेंबरपासून या निर्णयाची अमलबजावणी होणार आहे.
आज (शुक्रवारी) पालकमंत्री गिरीश बापट यांची अन्य अधिका-यांसोबत बैठक झाली. चार धरणांत मिळून १४ टीएमसी पाणीसाठा उरला आहे. पाणी संकट भीषण रुप धारण करत असल्याने अखेरीस पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला. सोमवारपासून पुण्यात एक दिवसाआड पाणी येईल, अशी घोषणा गिरीश बापट यांनी केली. पाणीकपातीच्या या निर्णयामुळे पुणेकरांच्या तोंडचे पाणी अक्षरश: पळाले आहे.