अकोला: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २0१४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात अमरावती विभागात वाशिम जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले आहे. बुलडाणा जिल्ह्याने द्वितीय स्थान मिळवले असून अकोला जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी सर्वात कमी आहे.
जिल्ह्याची टक्केवारी जरी कमी असली तरी अवनी खोडकुंभेने ९९.२0 टक्के गुणांसह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. बुलडाण्याच्या प्रणय तरपेला ९९ टक्के गुण तर वाशिमच्या वेदश्री जोशीने ९८.६0 टक्के गुण मिळवले आहेत. दहावी परीक्षेचा निकाल आज १७ जून रोजी जाहीर झाला. निकालात वाशिम जिल्हा ८८.0१ टक्के निकालासह अमरावती विभागात प्रथम क्रमांकावर आला आहे. वाशिममधील राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेची विद्यार्थिनी वेदश्री श्रीपाद जोशी ही सर्वाधिक ९८.६0 टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. वाशिम जिल्ह्यातून यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी १८,६५0 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी १८,५६0 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १६,३३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बुलडाणा जिल्हा व्दितीय बुलडाणा जिल्ह्याने यावर्षी दहावीच्या परीक्षेत विभागात व्दितीय क्रमांक पटकावला असून, एकूण ८६.५८ टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्यातून देऊळगाव राजा येथील प्रणय गोपाळराव तरपे याने ९९ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ३८ हजार ६0७ विद्यार्थी परीक्षेसाठी नोंदविल्या गेले होते. प्रत्यक्षात ३८ हजार ४१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये ३३ हजार २६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८५.१0 एवढे असून, मुलींची टक्केवारी ८८.४५ टक्के एवढी आहे. अकोला जिल्हा माघारला अमरावती विभागात सर्वात कमी ८0.७५ टक्के निकाल अकोला जिल्ह्याचा लागला आहे. जिल्ह्यातील ४१८ शाळेचे २६,७१0 विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज दाखल केले होते. प्रत्यक्षात २६,६३३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यात १३,९२४ मुले आणि १२,७0९ मुली होत्या. २१,५0५ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ७७.४३ असून ८४.३७ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात ४१ शाळांचा निकाल १00 टक्के लागला आहे.