तुम्ही राजकारणात कसे आलात?- राजकारणात आल्याशिवाय समाजसेवा करणे, जनतेच्या अडीअडचणी सोडविणे किंवा आवश्यक असलेली विकासकामे, मोठे प्रकल्प आणून परिसराचा विकास करणे शक्य नाही या जाणिवेतून राजकारणात उडी घेतली. राज ठाकरे यांनी संधी दिली. त्याचे सोने केले. नगरसेवक म्हणून निवडून आलो. महापालिकेत मनसेचा गटनेता म्हणून जबाबदारी सांभाळली. नगरसेवक म्हणून जी कामे केली त्यावर विश्वास ठेवून विक्रोळीकरांनी मला आमदार म्हणून निवडून दिले. त्यामुळे आत्मविश्वास वाढला आणि पुढेही अशीच समाजसेवा कायम ठेवण्याचा दृढनिश्चय करून रिंगणात उतरलो.कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचार करता आहात?- नगरसेवक, आमदार म्हणून लादीकरणापासून उड्डाणपूल, थीमपार्क, आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव यासारख्या मोठ्या प्रकल्पांपर्यंत जी कामे मी केली तीच जनतेसमोर मांडतो आहे. जनतेने पुन्हा संधी दिली तर मी माझे व्हिजन निश्चित केले आहे आणि मी जी वचने, आश्वासने देतो ती पूर्ण करतो, हे विक्रोळीकरांना माहीत आहे.पाच वर्षांतले तुमचे रिपोर्ट कार्ड काय सांगते?- प्रजा फाउंडेशनने शहरातील ३६ आमदारांच्या कामावरून एक रिपोर्ट कार्ड तयार केले होते. त्यात सर्वात कमिटेड आणि पॉप्युलर आमदार म्हणून माझी निवड झाली होती. केलेल्या कामांची जंत्री मोठी आहे. कांजूर डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी आंदोलन केले. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सतत पाठपुरावा करून विक्रोळीचे फाटक बंद करून घेतले आणि दरवर्षी सुमारे तीनशे जणांचे प्राण वाचविले. पर्यायी मार्ग म्हणून उड्डाणपूल मंजूर करून घेतला. या कामासाठी ठेकेदाराची नेमणूकही झाली आहे. पादचारी पूल, त्यावर सरकता जिना बसवून घेतला. माझे जग हे थीम पार्क, महात्मा फुले रुग्णालयात अद्ययावत डायलिसीस सेंटर, सुपरस्पेशालिटी रुग्णालय, अनेक वर्षे रखडलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्वीमिंगपूलचे काम सुरू केले. ३६ कोटी खर्चून कन्नमवार नगर, टागोर नगरात मलनिस्सारण वाहिन्या बदलल्या. पालिकेत गटनेता असताना बिल्डरांच्या घशात चाललेले अनेक भूखंड वाचविले.
विक्रोळीकरांचा माझ्यावर विश्वास
By admin | Updated: October 11, 2014 06:11 IST