अकोला: जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत राज्यात अवघ्या ९ महिन्यात ६५ गुन्हे दाखल झाले आहेत. राज्याच्या विविध भागांमध्ये अंधश्रद्धेच्या नावाखाली लूट करणार्या बाबू- बुवाविरोधात छळाचे, बलात्काराचे व नरबळीचे गुन्हे दाखल करण्यात आले. यात सर्वाधिक ६ गुन्हे एकट्या नाशिक जिल्ात नोंदविल्या गेलेत.नरबळी देणे, पैशाचा पाऊस पाडणे, मूल होत नाही म्हणून जादू करणे अशा प्रकरणांमध्ये जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर करणी, भानामती, जादूटोणा, भूत उतरवण्याच्या बहाण्याने अंगाला चटके देणे, जबरदस्तीने मानवी विष्ठा तोंडात कोंबणे, मारहाण करणे, चमत्काराचा दावा करून स्त्रियांचे लैंगिक शोषण करणे, गुप्तधन काढण्याच्या बहाण्याने अघोरी प्रथांचा अवलंब करणे, दैवी शक्तीचा दावा करून महिलांना नग्न पूजा करण्यास भाग पाडणे, इत्यादी अमानुष घटनांमध्ये गुन्हे नोंदवले गेले आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर राज्य सरकारने जागे होऊन महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक मूळ उच्चाटन कायदा २०१३ चा वटहुकूम लागू केला. पहिला गुन्हा २६ ऑगस्ट रोजी भाग्यनगर पोलिस स्टेशन नांदेड येथे दाखल झाला. हिवाळी अधिवेशनात या वटहुकूमाचे कायद्यात रूपांतर झाले. तेव्हापासून आतापर्यंत ६५ गुन्हे वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झाले आहे. राज्यात याआधीही असे मोठे गुन्हे झालेले आहे; मात्र कायदा नसल्यामुळे ते लोकांसमोर आले नाही. अनेक ठिकाणी अशा प्रकरणांमध्ये पोलिसांपुढे कोणत्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवायचा, असा पेच निर्माण होत असे; मात्र कायदा लागू झाल्यानंतर ही मोठी अडचण दूर झाली. आता लोकही पुढे येऊन झालेल्या प्रकाराची माहिती देत आहेत. काही ठिकाणी मांत्रिकांना अटक करण्यात आली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ९ महिन्यात कायद्याचा प्रचार मोठ्या प्रमाणात केला. त्यामुळे पीडित गुन्हे नोंदवण्यासाठी पुढे येताना दिसून येत आहे.
** येथे घडलेत गुन्हे!वसईमध्ये आजारपणावरील उपचारापोटी शेजारच्या कलावती रामआसरे या महिलेचा मांत्रिकाने बळी घेतला. अशाच नरबळीच्या प्रयत्नात असलेल्या नाशिक येथील भालेराव कुटुंबाला रंगेहात पकडले. जादूटोणा करण्याच्या संशयावरून महादेव भागडकर यांची ब्रापुरी चंद्रपूर येथे हत्या करण्यात आली. तरुणीला पूजाविधीसाठी कर्नाटकवरून पंढरपुरात आणून खून करणार्या मांत्रिक मिलिंद कांबळे याचा शोध पोलिस घेत आहेत. पुणे येथे संपत्तीप्राप्तीसाठी नग्न पूजा करत नरबळीचा प्रयत्नात असलेल्या सय्यद आलम या मांत्रिकाला अटक करण्यात आली. याखेरीज इतर पाच बळी हे अंधश्रद्धेतून झाले आहेत का, याचा तपास पोलिस करत आहेत.
** हा कायदा विशिष्ट धर्मासाठी असल्याचा आरोप खोटा ठरला आहे. कायदा सर्व धर्मासाठी लागू आहे. काही ठिकाणी अजूनही दक्षता अधिकार्यांच्या नेमणुका झालेल्या नसतानाही हे गुन्हे कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे दाखल झाले आहेत. इतर राज्यातील लोक महाराष्ट्रत आल्यावर घटना घडल्यामुळे त्यांनाही कायद्याचा आधार मिळाला आहे. महिलांचे जास्तीत जास्त शोषण झाले आहे. त्यामुळे महिलांच्या दैववादातील शोषणमुक्तीचा हा कायदा आहे. - कृष्णा चहाणगुडेकार्याध्यक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नाशिक
** जादूटोणाविरोधी कायद्याला महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा १५० वर्षांचा उज्ज्वल वारसा लाभला आहे. तो वारसा पुढे नेण्यासाठी हा कायदा त्या दिशेणे टाकलेले एक चांगले पाऊल आहे. अंधश्रद्धा ही विकासाला अडथळा असते म्हणून या कायद्यामुळे किमान अघोरी आणि अमानुष प्रकारच्या अंधश्रद्धा घालवायला मदत होणार आहे. म्हणून या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. - अविनाश पाटील कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती