मनोहर कुंभेजकर, मुंबई: एमएमआरडीएच्या बोरिवली - ठाणे ट्विन टनेल प्रकल्पाच्या परिसरातील काही एसआरए प्रकल्प वर्षानुवर्षे रखडलेले आहेत. मागाठाणे येथील या झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनासाठी आता काही विकासक पुढे आले आहेत. मात्र, हे प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन रहिवाशांना हक्काची घर देण्याची हमी एमएमआरडीएने द्यावी, अशी मागणी उद्धव सेनेने काल सायंकाळी एमएमआरडीए आयुक्तांकडे केली.
एमएमआरडीएकडून बोरिवली - ठाणे ट्विन टनेल प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे मागाठाणे येथील रुपवते नगर, फरलेवाडी - त्रिमूर्ती देवीपाडा आणि ९० फूट रोडवरील ५७२ रहिवाशी बाधित होणार आहे. या प्रकल्पाच्या काही भागात त्रिमूर्ती देवीपाडा सोसायटी, महाकाली एसआरए सोसायटी , देवीपाडा एसआरए सोसायटी असे तीन एसआरए प्रकल्प ४ ते ७ वर्षांपासून विकासकांकडून रखडलेले आहेत. विकासकांनी या रहिवाशांचे कोट्यवधी रुपयांचे भाडे देखील थकवले आहे. यातील महाकाली एसआरए प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एका भाजप नेत्याच्या कंपनीने प्रस्ताव दिला आहे. आधीचा अनुभव पाहता रहिवाशांचा एसआरए आणि विकासकांवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे वेळेत घर आणि भाडे मिळवून देण्याची हमी एमएमआरडीएने द्यावी, अशी येथील प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे.
या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उद्धव सेनेचे उपनेते डॉ.विनोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली काल सायंकाळी एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. यावेळी उद्धव सेनेच्या मागणीला संजय मुखर्जी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. एमएमआरडीएकडे उपलब्ध असलेल्या पीएपी घरांची माहिती देऊन कायमस्वरूपी देण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली.
या बैठकीला माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, विभागसंघटक शुभदा शिंदे, विधानसभा निरीक्षक शशिकांत झोरे, वैभवी तावडे, हनुमंत मोरे, अभिलाष कोंडविलकर, सचिन मोरे, माधुरी खानविलकर, तुकाराम पालव, नंदकुमार मोरे, रोहिणी चौगुले यांच्यासह या प्रकल्पामुळे बाधित झालेले रहिवाशी उपस्थित होते.
ट्विन टनेल प्रकल्पाला येथील रहिवाशांचा विरोध नाही. रहिवाश्यांना वेळेत घरे किंवा भाडे मिळवून देण्याची हमी एमएमआरडीएने द्यावी अशी उद्धव सेनेची मागणी आहे. त्याला एमएमआरडीएकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तसेच एमएमआरडीए प्रकल्पग्रस्तांपैकी ज्यांना घराऐवजी रकमेचा पर्याय हवा आहे अशा रहिवाशांसाठी खास कॅम्पेन आयोजित करून त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, ही आमची मागणी देखील मान्य करण्यात आली. यासंदर्भात एसआरएची भूमिका जाणून घेण्यासाठी आम्ही लवकरच एसआरएच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत, अशी माहिती शिवसेना उबाठा गटाचे उपनेते डॉ.विनोद घोसाळकर यांनी दिली.