अकोला : राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता असली, तरी खरे सत्ताधारी ‘बारामती’करच असल्याचा उपरोधिक टोला शेतकरी संघटना तथा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते, माजी आमदार वामनराव चटप यांनी अकोला येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत लगावला.‘विदर्भ मिळवू औंदा’ अशी घोषणा विदर्भ राज्य आंदोलन समितीने केली आहे. त्यानिमित्ताने विदर्भात करण्यात येणाऱ्या आंदोलनाची माहिती त्यांनी दिली. या वेळी बोलताना माजी आमदार चटप यांनी राज्य शासनाच्या कामावर ताशेरे ओढतानाच विदर्भातील पुत्र राज्यातील सत्ताधारी असताना विदर्भावर सर्वच क्षेत्रात होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. मुख्यमंत्री, अर्थमंत्री, वीजमंत्री, आदिवासी विभागाचे मंत्री विदर्भातील असताना पुरवणी अर्थसंकल्पात यवतमाळ आणि चंद्रपूर या दोन आदिवासीबहुल जिल्ह्यांचा उल्लेखही नाही. विदर्भात ५५00 हजार मेगावॉट वीज निर्मिती होत असताना येथील शेतकरी वीज जोडणीसाठी आत्महत्या करतो आहे. दुसरीकडे मेट्रो सिटीच्या नावाखाली मुंबई-पुण्यात झीरो लोडशेडिंग होते, असेही चटप म्हणाले.
राज्यात खरी सत्ता ‘बारामती’चीच!
By admin | Updated: September 30, 2015 02:29 IST