महाड : रायगड किल्ल्यावर आलेल्या पुण्याच्या २८ वर्षीय आयटी इंजिनीअर असलेल्या पर्यटकाचा गडाच्या कड्यावरून कोसळलेल्या दगडाने शनिवारी रात्री बळी घेतल्यानंतर गडावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे रायगड किल्ल्याच्या डागडुजीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्यानेच गडदर्शनासाठी येणाऱ्या शिवभक्त पर्यटकांचे बळी जाण्याच्या दुर्घटना घडत असल्याचा आरोप पर्यटकांकडून केला जात आहे. आणखी किती बळी गेल्यावर निद्रिस्त असलेल्या पुरातत्त्व विभागाला जाग येणार, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.शनिवारी रात्री पथमार्गाने पायऱ्या उतरणाऱ्या अजयप्रतापसिंह प्रदीपसिंह सिकरवार या ट्रेकरच्या अंगावर पथमार्गाच्या कडेलाच असलेल्या कड्यावरून दगड कोसळून त्याचा मृत्यू झाला होता. गेल्यावर्षी देखील गड उतरणाऱ्या एका पर्यटकाच्या अंगावर दगड कोसळून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी या दगडी कोसळणाऱ्या कड्याला संरक्षण जाळ्या बसवण्याची मागणी पर्यटकांकडून करण्यात आली होती. मात्र पुरातत्त्व विभागाने पर्यटकांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेतली नाही. गड दर्शनासाठी येणारे हौशी पर्यटक रोप-वेऐवजी पायऱ्यांनी चढून गडावर जातात. मात्र या पायऱ्यांच्या मार्गाची अत्यंत दुरवस्था झालेली असून बाजूूंचे कठडे देखील अनेक ठिकाणी कोसळलेल्या अवस्थेत आहेत. कोसळलेल्या पायऱ्यांवरून तोल जावून पर्यटक पडून गंभीर जखमी होण्याच्या घटना नियमितपणे घडतात, तर दोन वर्षांपूर्वी कोसळलेल्या पायऱ्यांवर घसरून पडलेल्या एका सहलीबरोबर आलेल्या शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. पायऱ्यांच्या मार्गाने गडावर जाणाऱ्या शैक्षणिक सहलीतील विद्यार्थी पडून गंभीर जखमी होण्याच्या घटना नियमित घडतात. मात्र कोसळलेले कठडे व पायऱ्यांची दुरुस्तीकडे पुरातत्त्व विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे येथील दुरवस्थेवरून लक्षात येते.रायगड महोत्सवाचा निधी गड संवर्धनासाठी उपयोगी आणावयास हवा होता, अशी अपेक्षा शिवभक्तांनी या घटनेनंतर व्यक्त केली. (वार्ताहर)>सुरक्षेची काळजी घ्यावीया दुर्घटनेत मरण पावलेल्या अजयप्रतापसिंह यांची बहीण मनीषा सिंह यांनी आपल्या भावाच्या मृत्यूच्या दु:खातून स्वत:ला सावरत किमान यापुढे तरी गडावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी पुरातत्त्व विभागाने घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. माझा भाऊ गमावला आहे. मात्र भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटनेत कुणाला जीव गमावण्याची वेळ पुरातत्त्व विभागाने आणू नये, असे मनीषा सिंह यांनी भावुकपणे सांगितले.
पर्यटकांची सुरक्षा धोक्यात !
By admin | Updated: June 28, 2016 02:35 IST