ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १ - लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा निर्णय घेतला असून आज काँग्रेसचे तीन आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तीन नवीन मंत्र्यांमध्ये अमित देशमुख यांना संधी दिली जाण्याची दाट शक्यता आाहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्यात काँग्रेसने कामराज प्लॅन राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार राज्यातील चार विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. तर त्यांच्याऐवजी तरुण तडफदार आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे. मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेल्या ज्येष्ठ मंत्र्यांना पक्षकार्यात सक्रीय केले जाणार आहे.आज संध्याकाळी काँग्रेसच्या मंत्रिमंडळात बदल केले जाणार आहे. संध्याकाळी चार वाजता राजभवन येथे काँग्रेसचे तीन आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील. यात विलासराव देशमुख यांचे पूत्र अमित देशमुख यांचा समावेश निश्चित समजला जात आहे.
दरम्यान, मंत्र्यांची नावे निश्चित करण्यासाठी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची दिल्लीत बैठक होणार आहे. यात मंत्रिमंडळातून वगळण्यात येणा-या मंत्र्यांची नावेही निश्चित केले जाणार आहे.