अतुल जयस्वाल/अकोला : दक्षिण- उत्तर आणि पूर्व-पश्चिम भारताला रेल्वेने जोडण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या मध्य प्रदेशातील इटारसी येथील रुट रिले इंटरलॉकिंग (आर.आर.आय.) यंत्रणेच्या कक्षाला गत महिन्यात आग लागल्यामुळे संपूर्ण यंत्रणाच कोलमडली व या मार्गावरून धावणार्या शेकडो रेल्वेफेर्या रेल्वे प्रशासनाला रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय तर झालीच, रेल्वेचा कोट्यवधी रुपयांचा महसूलही बुडाला. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी अकोला ते इंदूर हा लोहमार्ग अत्यंत उपयुक्त ठरला असता. या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर पूर्ण झालेले असते, तर प्रवाशांची गैरसोय व महसुलाचे नुकसान, या दोन्ही गोष्टी टाळता येऊ शकल्या असत्या. दक्षिण-उत्तर आणि पूर्व-पश्चिम भारताला रेल्वेमार्गाने जोडणारा चतुष्कोन पश्चिम-मध्य रेल्वेच्या इटारसी स्थानकावर आहे. मुंबई-भोपाळ, भोपाळ-नागपूर आणि मुंबई-जबलपूर-अलाहबाद या लोहमार्गावर धावणार्या गाड्यांच्या दृष्टीने हे महत्त्वाचे स्टेशन आहे. गत महिन्यात १७ जून रोजी या स्टेशनच्या इंटरलॉकिंग कक्षाला आग लागल्यामुळे देशभरातील रेल्वे सेवा विस्कळित झाली. दक्षिण भारतातून उत्तरेकडे जाणार्या रेल्वे गाड्या नागपूर-इटारसी-जबलपूर मार्गे जातात. इटारसी येथील यंत्रणा कोलमडल्यामुळे या मार्गावरील अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. या परिस्थितीत मध्य भारतातील अत्यंत महत्त्वाचे स्टेशन असलेले अकोला स्टेशन हा महत्त्वाचा दुवा ठरू शकला असता. रतलाम- इंदूर-खंडवा-अकोला-पूर्णा या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यापैकी अकोला ते पूर्णा हा रेल्वेमार्ग ब्रॉडगेज झाला. तसेच रतलाम ते इंदूरपर्यंंत ब्रॉडगेजचे काम झालेले आहे. या मार्गावरील मधला भाग, खंडवा ते अकोलापर्यंंत ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचे काम गत अनेक वर्षांंपासून रखडलेले आहे. अकोला ते इंदूर हा लोहमार्ग ब्रॉडगेजमध्ये परिवर्तित झालेला असता, तर दक्षिण भारतातून येणार्या गाड्या वर्धा येथून अकोला व तेथून खंडवा-इंदूर मार्गे उत्तर भारताकडे वळविता येऊ शकल्या असत्या. तसेच मुंबईकडून येणार्या गाड्याही भुसावळमार्गे खंडवा व तेथून इंदूर मार्गे उत्तर भारताकडे वळविता आल्या असत्या. इटारसी या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरून जाणार्या मार्गासाठी अकोला-इंदूर-रतलाम हा एक पर्याय रेल्वेकडे उपलब्ध झाला असता; परंतु या मार्गाचे काम अद्याप पूर्ण न झाल्यामुळे दक्षिण भारताकडून नागपूर मार्गे उत्तरेकडे जाणार्या शेकडो गाड्या नाईलाजाने रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय तर झालीच, याशिवाय रेल्वेला कोट्यवधी रुपयांचा फटकाही बसला.
*गेज परिवर्तनाचे काम प्राधान्याने करण्याची गरज
भौगोलिकदृष्ट्या अकोला हे शहर भारताच्या मध्यभागात येते. मध्य रेल्वेचे महत्त्वाचे स्टेशन असलेल्या अकोल्यातून मुंबई-कोलकाता हा लोहमार्ग जातो. तसेच पूर्णा ते महू हा रेल्वेमार्गही शहरातून जातो. महाराष्ट्राला मध्य व उत्तर भारताशी जोडणारा अत्यंत कमी अंतराचा असलेला हा लोहमार्ग ब्रिटिशांच्या काळात बांधून पूर्ण झाला होता. व्यापारीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या मार्गाचे अकोला ते पूर्णापर्यंंतचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यात आले; परंतु अकोला ते खंडवा व तेथून पुढे इंदूर या मार्गाचे गेज परिवर्तन मात्र गत अनेक वर्षांंपासून रखडलेले आहे. या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाल्यास दक्षिणेकडून येणार्या गाड्या अकोला मार्गे थेट मध्यप्रदेशात जाऊ शकतात. त्यामुळे या मार्गाचे तातडीने ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होणे गरजेचे आहे.