कल्याण - विद्युत क्षमता वाढवण्याच्या अनुषंगाने रोहित्र बदलण्याचे काम केले जाणार असल्याने शहापूर तालुक्यातील वीजपुरवठा ८ ते १० मे या कालावधीत खंडित केला जाणार असल्याची माहिती महावितरणच्या कल्याण परिमंडळाने दिली. यामुळे पाण्याच्या वितरणावरही परिणाम होण्याची शक्यता असल्याने संबंधित ग्रामपंचायतींनी योग्य त्या प्रमाणात पाणीपुरवठा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.महावितरणच्या १०० केव्ही शहापूर (कांबारे) उपकेंद्राची अति उच्चदाब रोहित्र क्षमता ५० एमव्हीएवरून १०० एमव्हीए इतकी वाढवण्याच्या दृष्टीने काम केले जाणार असून उपकेंद्रातून वीजपुरवठा होणार्या आसनगाव, धसई, आटगाव, डोळखांब, किन्हवली, भातसा, वैतरणा, मोडकसागर, कसारा, आटगाव औद्योगिक परिसर, पडघा आणि शहापूर शहर आदी उच्चदाब वाहिन्यांवर ८ मे रोजी रात्री १० वाजेपासून ते १० मे दुपारी १२ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे. नळपाणीपुरवठा आणि अत्यावश्यक सेवा यांचाही विद्युतपुरवठा बंद राहणार असल्याने संबंधित वाहिन्यांवरील ग्रामपंचायतींनी योग्य तो पाणीपुरवठा करावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. महावितरण कंपनीकडून आळीपाळीने आवश्यकतेनुसार या उच्चदाब वाहिन्यांवर भारनियमन केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली़(प्रतिनिधी)
शहापूर तालुक्यात तीन दिवस वीज नाही
By admin | Updated: May 7, 2014 21:00 IST