बुलडाणा : जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात ब्लड कॉम्पोनन्ट सेपरेशनची म्हणजेच रक्त विलगीकरणाची सुविधा अद्यापही मिळाली नाही. जिल्हा आरोग्य विभागाकडून गत तीन वर्षापासून ही सुविधा मिळण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे; मात्र मागणी अद्यापही प्रलंबित आहे.
रक्तात पांढर्या पेशी कमी झाल्या की, त्याचे निदान करता येत नाही. त्यामुळे अश्या रुग्णाला तत्काळ रक्त उपलब्ध होत नाही. ताप आणि इतर आजारात रुग्णांना हजारो रुपये खर्च करावे लागतात. बर्यावेळी उपचाराअभावी रुग्णांना मृत्यूही होतो. बर्याच आजारामध्ये जास्त ताप आल्यास यात पांढर्या पेशी कमी होण्याचे प्रमाण वाढते; मात्र रक्तात पांढर्या पेशी कमी झाल्या की नाही, याचे निदान करण्यासाठी उपयुक्त ब्लड कॉम्पोनन्ट सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचार मिळू शकत नाही. अश्या रुग्णांना रक्त पेढय़ातून रक्त देण्याची सुविधा आहे. पांढर्या पेशी कमी झाल्यानंतर रक्तात असलेल्या घटकांना वेगवेगळे करणे आवश्यक असते. त्यातून जो घटक कमी झाला. तेवढय़ाच घटकाचे रक्त रुग्णाला देण्याची आवश्यकता असते; मात्र बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयासह इतरही काही रुग्णालयात अशी मशिनरी अद्यापही उपलब्ध नसल्याने डॉक्टर योग्य निदान लावू शकत नाही. रक्त विलगीकरणाची सुविधा अकोला, जळगाव, औरंगाबाद, वाशिम येथील मोठय़ा रुग्णांलयात उपलब्ध आहे. या ठिकाणी रुग्णांची मोठय़ा प्रमाणात आर्थिक लूट होते. अश्यावेळी बर्याच रुग्णांना बुलडाणा जिल्ह्यातील रक्तपेढय़ातून रक्त मिळू शकत नाही. जिल्हय़ात ही सुविधा नसल्याने पांढर्या पेशी कमी झालेल्या रुग्णांना इतरत्र ठिकाणी सोयीनुसार जावे लागते. शासनाच्या नियमानुसार रक्तदात्याच्या शरीरातून काढलेले रक्त जसेच्या तसेच दुसर्याला देणे हा गुन्हा आहे. त्यासाठी रक्तातील घटक वेगवेगळे करणे आवश्यक असते; मात्र तशी व्यवस्थाच उपलब्ध नसल्याने बहुतांश रक्तपेढय़ातून पूर्ण रक्तच दिले जाते. अगदी शासकीय रक्तपेढय़ातूनही असेच काम चालते. रक्तातील घटक वेगळे करण्याची व्यवस्था सध्या बुलडाणा जिल्ह्यात केवळ खामगावात आहे. या ठिकाणी रक्तातील प्लाझ्मा, प्लेटलेट्स व पॅकेट सेल हे घटक वेगवेगळे केले जातात. पैकी प्लाझा हे जळालेल्या व लिव्हर फेलीवर रुग्णासाठी, प्लेटलेटस निमोनिया, डेंगूच्या रुग्णासाठी तर पॅकेट सेल हे अँनेमियाच्या वृध्द रुग्णांसाठी वापरले जाते. तशी व्यवस्था जिल्ह्यातील इतरही रक्तपेढय़ामध्ये करण्याची गरज आहे. बुलडाणा जिल्ह्यात असलेल्या रक्तपेढयांमध्ये बुलडाणा शहरात दोन रक्तपेढय़ा, याशिवाय मलकापूर मध्ये १, शेगावमध्ये २, खामगाव १ रक्तपेढय़ा आहेत. चिखली आणि मेहकर मध्ये रक्तसंकलन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे; मात्र बर्याच वेळा या रक्तांचा उपयोग जिल्ह्यातील लोकांना कमी प्रमाणात होतो. जालना, औरंगाबाद आणि वाशिम, अकोला जिल्ह्यातील मोठय़ा रुग्णालयाकडून हे रक्त मागविल्या जाते. यामुळे स्थानिक रुग्णांना आवश्यकता पडल्यावर रक्त मिळत नसल्याच्या घटना घडल्या आहेत.