ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - शिवसेना व मनसेच्या प्रचारसभांमधून भाजपला टार्गेट केले जात असतानाच या विरोधातूनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेअध्यक्ष राज ठाकरे एकत्र येऊ शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
जागावाटपावरुन भाजपने शिवसेनेसोबतची २५ वर्ष जूनी युती तोडली आहे. तर लोकसभा निवडणुकीत भाजपने डावलल्याने राज ठाकरेही भाजपवर नाराज आहेत. हाच भाजपविरोध दोन्ही भावांना जोडण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरु शकतो असे सांगितले जाते. राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांनी यासाठी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोघांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे शिवसेनेच्या एका नेत्याने सांगितले.
राष्ट्रीय पक्षांना राज्यातून हद्दपार करण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे असे शिवसेना - मनसेमधील अनेकांना वाटते. यासाठी तामिळनाडूमध्ये एआयडीएमके व डीएमकेच्या प्रयोगाचे दाखलेही दिले जात आहेत. गुजराती भाषिकांची मुंबईच्या राजकीय वर्तुळातील वजन वाढत असून मराठी माणसाच्या भल्यासाठी दोघांनीही एकत्र येणे गरजेचे आहे असे मत मनसेतील एका नेत्याने मांडले आहे. उद्धव ठाकरेंनी प्रचारसभांमधून भाजपवरच जास्त टीका केली असून रविवारी राज ठाकरेंनीही थेट मोदींवरच हल्लाबोल केला. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येतील का याविषयी राजकीय खलबतं सुरु झाले आहे.