ऑनलाइन टीम
जळगाव, दि. २९ - अनारक्षीत तिकीटावरुन वातानुकूलीत डब्यातून प्रवास करणा-या एका महिलेला टीसीने एक्सप्रेसमधून ढकलून दिल्याची धक्कादायक घटना जळगाव येथे घडली आहे. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून संतप्त जमावाने चोप देत टीसीला पोलिसांच्या हवाली केले आहे.
उज्ज्वला पंड्या ही महिला प्रवासी जनता एक्सप्रेसमधून प्रवास करत होती. पंड्या या जळगावहून खंडवा येथे जात होत्या. पंड्या या वातानुकूलीत डब्यात चढल्या. यानंतर टीसी संपत साळुंखे यांनी पंड्या यांना खाली उतरण्यास सांगितले. तसेच त्यांना धक्का दिला. यात पंड्या गाडीतून खाली पडल्या व या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. यानंतर टीसी साळुंखे घाबरुन एक्सप्रेसमधील दुस-या डब्यात लपून बसले. मात्र यानंतर काही प्रत्यक्षदर्शी प्रवासी व पंड्यांच्या नातेवाईकांनी साळुंखे यांना शोधून काढले. संतप्त नातेवाईकांनी संपत साळुंखे यांना चोपून पोलिसांच्या हवाली केले आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी साळुंखेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.