उद्धव ठाकरे कडाडले : अजित पवारांनी बादलीभर पाण्यात जीव द्यावा
जळगाव : आमदार सुरेशदादा जैन हे शिवसेनेचे असल्यामुळे त्यांना सरकारकडून त्रास दिला जात आहे. त्यांना जामीनही मिळू देत नाही; तर दुसरीकडे माजी मंत्री पद्मसिंग पाटील हे खून प्रकरणात आरोपी असतानाही मोकाट फिरत आहेत. त्यांनी निवडणूकही लढविली, हा दुजाभाव का? उद्या आमचे सरकार आले तर एकेकाला उंदरासारखे पकडून आत टाकू, असा सडेतोड इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगावात झालेल्या शिवसेना पदाधिकार्यांच्या मेळाव्यात दिला.
सुरेशदादा हे आमचे असून शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे, अशा शब्दात त्यांनी सुरेशदादा व त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला. मेळाव्यापूर्वी, सुरेशदादांच्या निवासस्थानी त्यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशननजीकच्या मैदानावर हा मेळावा झाला. त्या वेळी ठाकरे म्हणाले, सुरेशदादा हे आमचे आहेत. त्यांनी गुन्हा केला असेल तर न्यायालयात जा,तो सिद्ध करा. अन्यायाने का वागतात? सुरेशदादांना आपले म्हणणे मांडू द्या. कृपाशंकरसिंग अनेक प्रकरणांमध्ये अडकले आहेत. पण कारवाईसाठी पोलीस विधानसभा अध्यक्षांची परवानगी मागतात. सिंचन प्रकरणात कोट्यवधींच्या घोटाळ्याकडे कुणी पाहत नाही. सुरेशदादा सेनेचे आहेत म्हणून त्यांना कारागृहात पाठविले, जामीनही मिळू दिला जात नाही.
अतिरेकी पोसण्याचे काम
मुंबईतील चार तरुण आतंकवादी कारवायांसाठी गेले असताना मग काय गृहमंत्री आर.आर.पाटील तंबाखू चोळत होते का? इशरत जहाँला पोलिसांनी एन्काउंटरमध्ये मारले. पण शरद पवारांनी तिची बाजू घेतली. सरकार अतिरेक्यांना पोसत आहे, असेही ते म्हटले.
उपमुख्यमंत्र्यांची खिल्ली
२२ गावांमधील दोन हजार शेतकरी संपावर गेले आहेत. त्यासंदर्भामध्ये अजित पवार यांनी जिल्हा दौर्यावर आले असता जिल्हा प्रशासनाला त्या शेतकर्यांची भेट घेवून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे. पण जिल्हाधिकारी व इतर अधिकारी या शेतकर्यांना भेटलेले नसल्याने ठाकरे यांनी उपमुख्यमंत्र्यांची खिल्ली उडविली. ठाकरे पुढे म्हणाले, गृहमंत्री आर.आर.पाटील म्हणतात प्रत्येक घरात एक पोलीस कर्मचारी नियुक्त केला तरी बलात्कार थांबणार नाहीत. आमचा प्रत्येक घरात शिवसैनिक नियुक्त केला जाईल. ते आया-बहिणींवर कुणाची वाकडी नजर पडू देणार नाही. आघाडीला फक्त खुर्चीची पडली आहे. काँग्रेस आहे म्हणून राज्यात संकट आहे. दुष्काळी स्थिती आहे. दुबार पेरणीचे संकट आहे. शिवसैनिक लढण्यासाठी मैदानात उतरणार नाही तोपर्यंत मेळाव्यांना अर्थ नाही. फक्त भगवा फडकविण्यासाठी लढायचे नाही. शेतकरी, गोरगरीब आपल्याकडे आशेने पाहत आहेत. त्यासाठी मैदानात उतरलो असून, सेनेचे हात मजबूत व्हावेत. उमेदवाराचा प्रतिनिधी म्हणून काम करा. निवडणुकांच्या वेळेस आणि त्यानंतर विजयी मेळाव्यालाही जळगावात येईल, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले. मेळाव्यात विधानसभेतील सेनेचे गटनेते सुभाष देसाई, रामदास कदम, उपनेते गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, शरद पाटील, माजी आमदार आर.ओ.पाटील, कैलास पाटील, दिलीप भोळे, गणेश राणा, रमेशदादा जैन, प्रा.चंद्रकांत सोनवणे, मिलिंद नार्वेकर, जि.प.उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील, सभापती कांताबाई मराठे, जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, किशोर पाटील, महिला प्रमुख इंदिराताई पाटील, महानंदा पाटील, गुलाबराव वाघ, एकलव्य सेनेचे शिवाजीराव ढवळे, अँड.राजेश झाल्टे, युवा सेनेचे प्रीतेश ठाकूर, अतुल सोनवणे आदी उपस्थित होते.
सुरेशदादांच्या कुटुंबीयांना दिला धीर
■ उद्धव ठाकरे यांनी ७, शिवाजीनगर या आमदार सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी भेट देऊन सुरेशदादांच्या पत्नी रत्नाभाभी जैन यांची व कुटुंबीयांची भेट घेतली आणि धीर दिला. तब्बल ४५ मिनिटे ते निवासस्थानी थांबले.
■ आपण स्वत: दादांच्या प्रकरणात लक्ष घातले आहे. मुख्यमंत्र्यांनाही भेटलो होतो. तसेच शासन दरबारी शिवसेनेच्या आमदारांमार्फतही हा विषय मांडला आहे. मात्र यात राजकारण आणले जात आहे. शिवसेना जैन कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.
■ या वेळी शिवसेना व मनपातील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दूर ठेवत उद्धव ठाकरे यांनी केवळ जैन कुटुंबीयांशी चर्चा केली. खाविआचे अध्यक्ष रमेशदादा जैन, सुरेशदादांचे चिरंजीव राजेश जैन, कन्या मीनाक्षी जैन, जैन उद्योग समूहाचे उपाध्यक्ष अशोक जैन, आमदार सुभाष देसाई, रामदास कदम, विनोद चांदसरकर उपस्थित होते.
-------------
नरेंद्र मोदींना जनतेने निवडून दिलेले आहे. असे असले तरी कायद्याची चौकट आहे, हे मोदींनी विसरायला नको. कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना काम करावे लागेल. असेच करायचे असेल तर येथे थारा मिळणार नाही, असा इशाराही ठाकरेंनी दिला. स्वीट डीश नाही म्हणून अजित पवारांनी अधिकार्यावर कारवाई केली, पण इथे आदेश देऊनही जिल्हाधिकारी ऐकत नाहीत. त्यांच्यावर कोणतीच कारवाई नाही. पवार यांनी बादलीभर पाण्यात जीव द्यावा, ते मिळत नसेल तर तुम्ही जसे सोलापूरचे धरण भरणार होता त्या पद्धतीने बादली भरा आणि त्यात जीव द्या, असे टीकास्त्र ठाकरे यांनी सोडले. मध्यंतरी भाजपाची मंडळी येऊन भेटून गेली. महायुती मजबूत राहील, असे भाजपाने म्हटले आहे, असे स्पष्ट करीत ठाकरेंनी महायुती तुटणार नसल्याचे संकेत मेळाव्यामध्ये दिले.