नागपूरमधून लडाख फिरायला गेलेल्या महिलेने आपल्या १२ वर्षांच्या मुलाला गावातच सोडून सीमेपल्याड पाकिस्तानात पळून गेलेल्या महिलेला आता पाकिस्तानी रेंजर्सनी भारतात परत पाठवले आहे. मात्र, भारतात परतल्यानंतर आता ही महिला कायद्याच्या कचाट्यात अडकली आहे. भारतीय सुरक्षा दलाने सुनीताला नागपूर पोलिसांकडे सोपवले असून, आता तिला पोलिसांनी औपचारिकरित्या अटक केली आहे.
बुधवारी रात्री सुनीताला विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असतं, तिला २ जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. अमृतसर पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून, सदर प्रकरणाचा तपास सध्या कपिलनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सुरू आहे. झोन ५चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी यासंदर्भात माहिती दिली.
अमृतसरहून नागपूरपर्यंतचा प्रवाससुनीता जमगडे यांना अटक केल्यानंतर नागपूर पोलिसांच्या चार सदस्यीय पथकाने अमृतसर पोलिसांकडून ताबा घेतला. सुनीताला घेऊन हे पथक मंगळवारी रात्री ट्रेनने दिल्लीमार्गे नागपूरकडे रवाना झाले. तत्पूर्वी, शनिवारी पाकिस्तान प्रशासनाने तिला अटारी सीमेवरून भारतीय सुरक्षा दलाच्या स्वाधीन केले होते.
पोलिसांचा संशय आणि तपासाचा फोकसतपासातील अधिकाऱ्यांनुसार, सुनीताने पाकिस्तानात वास्तव्यास असताना काही व्यक्तींशी संपर्कात राहत, विविध प्रकारची माहिती शेअर केली असण्याची शक्यता आहे. विशेषतः झुल्फिकार आणि पास्टर या पाकिस्तानी नागरिकांशी झालेल्या संवादाबाबत चौकशी करण्यात येणार आहे.
नागपूरहून कारगिल ते पाकिस्तानचा प्रवाससुनीता जमगडे ही नागपूरच्या संत कबीरनगर परिसरातील रहिवासी असून, तिने ४ मे रोजी आपल्या १२ वर्षीय मुलासह कारगिल फिरण्याची योजना बनवली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, १४ मे रोजी तिने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केला. विशेष बाब म्हणजे सीमा ओलांडण्यापूर्वीच तिने तिच्या मुलाला मागे सोडले होते. पाकिस्तानात प्रवेश केल्यानंतर सुनीताला तिथल्या सुरक्षा दलाने पकडले. अधिकृत कारवाईनंतर सुनीताचा ताबा भारताकडे सोपवण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात आणखी काही नावं समोर येण्याची शक्यता असून, जमगडे यांच्याशी संपर्कात असलेल्यांची चौकशी होणार आहे. पाकिस्तानात गेल्यानंतर सुनीताने कोणाशी संपर्क साधला, किती काळ तिथे राहिली, आणि त्या काळात काय घडले, याची चौकशी होणार आहे.