उल्हासनगर : शहराला वाढीव पाणीपुरवठा मिळूनही ४० हजार लोकसंख्य्ोचा सुभाष टेकडी परिसर तहानलेलाच आहे. बोअरवेलच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करीत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.उल्हासनगरमध्ये तीव्र पाणीटंचाईमुळे मोर्चे, उपोषण, रास्ता रोको, ठिय्या आंदोलनासह पालिका अधिकारी यांना मारहाण झाली. अखेर पालकमंत्र्यानी मध्यस्थी केल्यावर एमआयडीसीने महिन्याभरात १८ एमएलडी वाढीव पाणी दिले. मात्र सुभाष टेकडी परिसरात परिस्थिती सुधारली नाही. आठवडयातून दोन दिवस तेही जेमतेम अर्धा तास पाणीपुरवठा होतो. यामुळे नागरिकांना पिण्यासाठी बोअरवेलचे पाणी वापरावे लागत आहे.सुभाष टेकडी परिसरात भारतनगर, साईनगर, आम्रपालीनगर, पंचशिलनगर, अशोकवन, अचानकनगर, महात्मा फुले कॉलनी, डिफेन्स कॉलनी, नागसेननगर, दहाचाळ हे भाग येत असून तेथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. काही ठिकाणी १० ते १५ मिनटेही पाणी येत नसल्याने महिला त्रस्त झाल्या आहेत. आमदार निधीतून चार तर पाालिकेने आठ बोअरवेल खोदल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कलई सेलवण यांनी दिली. तसेच परिसरातील जुन्या व नादुरस्त बोअरवेलची दुरस्ती केली जात आहे असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
सुभाष टेकडीला कोरड
By admin | Updated: April 29, 2016 04:22 IST