श्रीगोंदा : कुकडी, घोडचे आवर्तन व वीज प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील घारगाव येथे गुरुवारी सकाळी भाजपाच्यावतीने नगर-दौंड मार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कुकडी, घोडमधून तात्काळ दोन आवर्तने न सोडल्यास श्रीगोंदा येथील कुकडीच्या विभागीय कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा भाजपा किसान सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी दिला. आघाडीच्या नेत्यांनी कुकडी व घोडच्या पाण्याचे राजकारण करुन शेतकर्यांना वेठीस धरले आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही आघाडीला हद्दपार केले जाईल, असा विश्वास म्हस्के यांनी दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र सन २०१२ पर्यंत भारनियमनमुक्त करु ही केलेली घोषणा फसवी ठरली आहे. साकळाई योजनाही शासनाला मार्गी लावता आली नाही, असे सांगून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष लगड यांनी आघाडी शासनाच्या कार्यपध्दतीवर टीका केली. भाजपचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडीक,भूषण बडवे यांचीही भाषणे झाली. (तालुका प्रतिनिधी)
आवर्तनासाठी रास्ता रोको
By admin | Updated: May 30, 2014 09:07 IST