वसई : तत्कालीन सोपारा ग्रामपंचातीची धोकादाक अवस्थेत असलेली दुमजली इमारत मुसळधार पावसाच्या तडाख्याने आज पहाटे कोसळली. त्यामुळे आजूबाजूच्या घरांचे थोडेफार नुकसान झाले असले तरी या इमारतीखाली नेहमी झोपणारे इसम पावसामुळे इतरत्र गेल्याने मनुष्यहानी मात्र टळली आहे.सोपारा बाजारातील डॉ. समेळ मार्गावर ग्रामपंचातीच मालकीची दुमजली इमारत आहे. १९८१ साली उभारण्यात आलेल्या या इमारतीत पोस्ट आॅफिस, ग्रामपंचायत आणि तलाठी सजा अशी महत्वाची कार्यालये होती. त्यामुळे शेकडो लोकांची या इमारतीत उठबस असायची. मात्र, डागडुजी न केल्यामुळे ती धोकादायक झाली होती. त्यामुळे वसई विरार महापालिकेने नोटीस बजावून ३ वर्षांपूर्र्वीच ती रिकामी केली होती.आज पहाटे ४.३० वाजण्याच सुमारास या इमारतीचा वरचा भाग शेजारी राहणाऱ्या हेमंत गोडे यांच्या घरावर आणि रस्त्यावर उभ्या असलेल तीन चाकी टेम्पोवर कोसळला. त्यामुळे गोडे यांच्या घरावरील पत्रे तुटले तर दिनेश गोडांबे यांच्या टेम्पोचेही नुकसान झाले. सुदैवाने पावसाळा असल्याने याठिकाणी आश्रयाला असलेल्या लोकांनी दुसरीकडे स्थलांतर केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. विशेष म्हणजे इमारती शेजारी असलेल्या रस्त्यावर बुधवारी आणि रविवारी पहाटे पासून आठवडे बाजार भरतो. या बाजारात जीवनावश्यक वस्तूंपासून, अन्न-धान्य आणि खाद्य पदार्थ विकले जातात.त्यामुळे या बाजारात तुडुंब गर्दी असते. सुदैवाने बाजाराच्या आदल्या दिवशी ही इमारत कोसळली त्यामुळे कोणतीही जीवीतहानी झाली नाही. दरम्यान, महापालिकेचे नगर अभिंयता पाचंगे यांनी इमारतीची पाहणी करून ती जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)>इमारतीच्या आजूबाजूला घरेही होती. मात्र, धोकादायक इमारत तीन वर्षांपूर्वी रिकामी करून सुध्दा ती पाडून टाकण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेक बेघर, गरीब मजूर या इमारतीच्या खाली रात्री झोपत होते. तरीही पालिकेने इमारत पाडण्याची कोणतीच कार्यवाही केली नव्हती.
सोपारा ग्रामपंचायतीची इमारत कोसळली
By admin | Updated: June 29, 2016 03:15 IST