- विशाल सोनटक्के / बाबुराव चव्हाण, उस्मानाबाद
रामगणेश गडकरींच्या पाचही नाटकांत काम केलेल्या अभिनेत्यांपैकी आजघडीला हयात असलेला मी एकमेव अभिनेता आहे. या सगळ्या नाटकांनी खऱ्या अर्थाने समृद्ध केले. आयुष्यात सुख मोजण्याचे परिमाण पैसा नाही. नाटकांतून मिळालेले समाधान शब्दातीत आहे. म्हणूनच आज वयाच्या ८२व्या वर्षीही आपण समाधानी आयुष्य जगत असल्याचे प्रतिपादन ९७व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांनी केले.येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात शनिवारी सायंकाळी अमित भंडारी यांनी जयंत सावरकर यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. संमेलनाध्यक्षपदी आपली बिनविरोध निवड करण्यात आली. हा सर्वात मोठा बहुमान आहे. स्पष्ट आणि महत्वाचे बोलणे कोणाच्याही स्वाभिमानाला न डिवचता आपले मत मांडणे हा माझा स्वभाव आहे. १९९५च्या काळात रंगभूमीशी माझं नातं जुळलं. त्यावेळी मध्यमवर्गीय कुटुंबात नाटकांविषयी बरे बोलले जात नसे. नाटकाचे धंदे करण्यापेक्षा स्वत:च्या पायावर उभे रहा, हा सल्ला पावलोपावली मिळायचा. कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार यांचा नाटकाला विरोध होता. परंतु नोकरी सोडून या क्षेत्रात झेपावलो. नोकरीत मन रमले नाही. राम व्हावे किंवा रावण व्हावे मात्र लोकांच्या तोंडी कायम रहावे, हा मूलमंत्र आजही मी प्रामाणिकपणे जगत आलो आहे. त्याचेच द्योतक म्हणून संतमंडळींचा वारसा असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात संमेलनाध्यक्ष होण्याचा सन्मान माझ्या वाट्याला आला, असे ते म्हणाले.दामू केंकरे हे माझे गुरू. त्यांच्याप्रमाणे अनेकांनी मला मार्गदर्शन केले. मात्र गुरू होण्याचा मान त्यांच्या एकट्याचाच पडद्यामागील कलाकार, पार्श्वसूचक ते चरित्र अभिनेता, अशा अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत इथवरचा पल्ला गाठला आहे. आजवर ११० नाटकांत काम केले. त्याचे किती प्रयोग झाले, सांगता येत नाही. प्रत्येक भूमिकेवर जीवापाड प्रेम केले. त्यामुळे प्रत्येक भूमिकेने मला दरवेळी जगण्याचे बळ दिले. त्यातील नेमकी कोणती भूमिका मनावर गारूड करून आहे, असे विचारल्यास सांगता येणार नाही असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी घनश्याम, कामण्णा, मनोहर या त्यांच्या गाजलेल्या पात्राचे संवाद सादर करून रसिक श्रोत्यांची दाद घेतली. चुकीच्या प्रथांवर ‘हास्यरंगा’तून परखड भाष्य!शहरातील बापूजी लिमये नाट्यमंचावर एकापेक्षा एक दमदार एकपात्री नाटकांचे सादरीकरण झाले. बहुतांश नाटिकांच्या माध्यमातून समाजव्यवस्थेतील चुकीच्या प्रथा, परंपरांवर प्रखड भाष्य करण्यात आले. त्याला रसिक प्रेक्षकांकडूनही भरभरून दाद मिळाली. औरंगाबाद येथील प्रा. विष्णु सुरासे यांनी ‘हास्यरंग’च्या माध्यमातून निवडणुका, लग्नसमांरभ आणि आजच्या शिक्षण पद्धतीवर भाष्य केले. अमरावती येथील रिझवान पटेल या अंधकलावंताने अक्षरश: दहा ते पंधरा मिनिटे रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवले. ‘ये रे-ये रे पावसा’ हे गीत त्यांनी विविध दिग्गज गायकांच्या आवाजात सादर करून रिसिकांची दाद मिळविली. मुंबई येथील कलावंत डॉ. किशोर खुशाले यांनीही जोरदार सादरीकरण केले. सततच्या संकटामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. त्याला तातडीने आधार देण्याची गरज असताना, शासकीय यंत्रणेकडून पिकांचे नुकसान कशाने झाले? किती प्रमाणात झाले? अशा प्रश्नांचा किस पाडला जातो. तोवर शेतकरी पुरता कोलमडून पडतो. त्यामुळे शासनाने आता धुऱ्यावरच कॅमेरे लावावेत, अशा परखड शब्दात त्यांनी भाष्य केले. अमरावती येथील डॉ. राजेंद्र भुडेकार यांनी अंधश्रद्धा, फसवणूक, स्त्रीभ्रृणहत्या अशा ज्वलंत प्रश्नांसदर्भात नाटिकेच्या माध्यमातून प्रबोधन केले.